SAPTAHIK SAKAL 16-06-2018इतिहासाला उजाळा...
केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर सबंध देशाच्या शैक्षणिक संस्कृतीसाठी महत्त्वाची मानली जाणारी संस्था म्हणून पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजकडे पाहिले जाते. या संस्थेच्या स्थापनेपासूनच्या इतिहासाला उजाळा देणारा दस्तऐवज म्हणून डॉ. वि. मा. बाचल यांनी लिहिलेल्या व डॉ. राजा दीक्षित यांनी संपादित केलेल्या ‘वाटचाल फर्ग्युसनची’ या ग्रंथाचा विचार करता येईल. केवळ शैक्षणिक संदर्भानेच नव्हे, तर ऐतिहासिक, सामाजिक आणि सांस्कृतिक संदर्भानेही ‘फर्ग्युसन’ आणि हा ग्रंथ आपल्याला आपल्याच भागाची एक वेगळी ओळख करून देऊ शकतो. ग्रंथाच्या उपशीर्षकामध्ये असणारे ‘फर्ग्युसन’च्या १२५ वर्षांच्या प्रदीर्घ वाटचालीचा अभ्यासपूर्ण मागोवा...’ हे शब्द या ग्रंथाची एक भारदस्त प्रतिमा वाचकांच्या मनात उभी करतात. संस्थेच्या स्थापनेपासून ते सद्यस्थितीपर्यंतच्या इतिहासाचा आपण पदोपदी अनुभव घेत आहोत, याची जाणीव हा ग्रंथ आपल्याला पानापानांमधून सातत्याने करून देत राहतो. ग्रंथाच्या मुखपृष्ठापासून मलपृष्ठापर्यंत पसरलेले ‘फर्ग्युसन’च्या मुख्य इमारतीचे रंगीत छायाचित्र आपल्याला नकळत इतिहासात घेऊन जाते. ग्रंथाच्या सुरुवातीच्या पानांमध्येच असलेली विष्णुशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, महादेव बल्लाळ नामजोशी, कॉलेजचे पहिले प्राचार्य वामन शिवराम आपटे, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे पहिले अध्यक्ष राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि सोसायटीचे पहिले आश्रयदाते सर जेम्स फर्ग्युसन यांची कृष्णधवल छायाचित्रे शैक्षणिक इतिहास अधिक रंजक बनविण्यासाठी पूरकच ठरतात.
तीन भागांमधून विभागलेली या ग्रंथाची मांडणी ‘फर्ग्युसन’ आणि त्याच्याशी निगडित असलेल्या व्यक्ती, संस्था आणि त्यांचे कार्य व्यवस्थितपणे जाणून घेण्यासाठी उपयुक्त ठरते. लेखकाने आपल्या मनोगतामधून संस्थेविषयीच्या भावना व्यक्त करतानाच संस्थेविषयीचे तीन खंड लिहिण्याची इच्छा दर्शविली होती. याच तीन खंडाचे प्रतिबिंब एकत्रितपणे आपण ग्रंथाच्या या तीन वेगवेगळ्या भागांमधून अनुभवू शकतो. स्थापना ते सुवर्णमहोत्सव, सुवर्णमहोत्सव ते शताब्दी आणि शताब्दी ते शतकोत्तर रौप्यमहोत्सव अशा तीन कालखंडामध्ये विभागलेला इतिहास मांडत या ग्रंथाचे लेखन करण्यात आले आहे. संस्थेचा इतिहास, व्यक्तिगत अनुभवातून समोर आलेली संस्थेची वेगवेगळी रूपे, आठवणी आणि अहवालात्मक लिखाणाद्वारे लेखकाने संस्थेचे ऐतिहासिक अंतरंग उलगडून दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. विविध घटनांविषयी पूरक माहिती, संदर्भ देण्यासाठी पुस्तकात ठिकठिकाणी तळटीप देण्यात आल्या आहेत. संपादकीय मनोगतामधून डॉ. दीक्षित यांनी या ग्रंथाच्या निर्मितीप्रक्रियेबाबत सविस्तर भाष्य केले आहे. भारतामधील खासगी शिक्षण संस्थांच्याय उभारणीच्या प्रयोगामध्ये असणारा ‘फर्ग्युसन’चा वाटा या ग्रंथाच्या सुरुवातीच्या काही पानांमध्येच आपल्याला जाणून घेता येतो. विष्णुशास्त्री चिपळूणकरांच्या प्रेरणेतून स्थापन झालेली न्यू इंग्लिश स्कूल, पुढच्या टप्प्यामध्ये कॉलेज सुरू करण्यासाठी म्हणून झालेली डेक्कन एज्युकेशन सोसायटीची निर्मिती आणि त्यानंतर २ जानेवारी, १८८५ रोजी शनिवार पेठेतील गद्रेवाड्यामध्ये फर्ग्युसन कॉलेजची झालेली स्थापना हे ‘फर्ग्युसन’च्या सुरुवातीच्या काळातील महत्त्वाचे टप्पे आपण अलगदच ओलांडून पुढे जातो.
‘स्थापना ते सुवर्णमहोत्सव’ या पहिल्या भागामध्ये ‘फर्ग्युसन’च्या स्थापनेची पूर्वपीठिका, कॉलेजचा शुभारंभ, प्लेगच्या साथीदरम्यानची ‘फर्ग्युसन’ची वाटचाल, रँग्लर परांजपेंच्या कालखंडातील फर्ग्युसन कॉलेज आपण जाणून घेऊ शकतो. सुवर्णमहोत्सवापर्यंतच्या वाटचालीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे संस्थेचे सेवक आणि त्या दरम्यानच्या काळातील माजी विद्यार्थ्यांच्या आठवणींचाही या भागामध्ये समावेश करण्यात आला आहे.
देशसेवेच्या प्रेरणेतून शैक्षणिक संस्था स्थापन करण्यापासून ते राजकीय हितासाठी म्हणून शैक्षणिक संस्थांचा आसरा घेण्यापर्यंतचा प्रवास आपल्याकडील शैक्षणिक संस्थाचालकांनी केला आहे. त्यातील अलीकडच्या काही दशकांचा काळ सोडला, तर त्यापूर्वीचा काळ हा प्राचार्यांच्या आणि शिक्षकांच्याच नावाने ओळखल्या जाणाऱ्या शिक्षणसंस्थांचा होता. या कालखंडाचे प्रतिबिंबही आपण या ग्रंथामधून अनुभवू शकतो. ‘सुवर्णमहोत्सव ते शताब्दी’ आणि ‘शताब्दी ते शतकोत्तर रौप्यमहोत्सव’ या दोन भागांमधून आपण फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य आणि संबंधित प्रचार्याच्या कार्यकाळादरम्यानची फर्ग्युसन कॉलेजची वाटचाल हा ग्रंथ उलगडून सांगतो. ‘फर्ग्युसन’मधील वेगवेगळ्या इमारती, त्यांची निर्मिती आणि वैशिष्ट्ये, विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठीची वसतिगृहे, प्रयोगशाळा, वाडिया अम्फिथिएटर, प्राध्याप्रकांनी बांधलेले ‘फर्ग्युसन’मधील निवासी बंगले, सुरुवातीच्या काळामध्ये डेक्कन कॉलेजसोबत होणारी ‘फर्ग्युसन’ची तुलना, संस्थेमधील पदाधिकाऱ्यांच्या राजकीय भूमिका आणि तत्कालीन इंग्रज सरकार, विद्यार्थी आणि राजकारणाशी निगडित तत्कालीन परिस्थिती अशा वेगवेगळ्या मुद्द्यांचा आढावा या ग्रंथामधून घेण्यात आला आहे. कॉलेजमधून निघणाऱ्या मॅगेझीनविषयीची सखोल माहितीही या ग्रंथामधून मांडण्यात आली आहे. माजी विद्यार्थ्यांच्या आठवणींमधून विठ्ठल रामजी शिंदे, कॉलेजची पहिली विद्यार्थिनी असलेल्या डॉ. कृष्णाबाई केळवकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, आचार्य प्रल्हाद केशव अत्रे आदींनी ‘फर्ग्युसन’विषयी केलेले गौरवोल्लेख आणि त्यांच्या विद्यार्थीदशेतील फर्ग्युसन कॉलेज आपल्यासमोर उभे राहते. एकुणात हा ग्रंथ राज्याच्या आणि देशाच्या शैक्षणिक इतिहासामध्ये एक मैलाचा दगड असलेल्या फर्ग्युसन कॉलेजची ऐतिहासिक घोडदौडच वाचकांपुढे मांडण्यात यशस्वी ठरत आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
–योगेश बोराटे
MAHARASHTRA TIMES 08-10-2017ज्ञानवृक्षाचा दस्तावेज...
पुण्यातील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या फर्ग्युसन कॉलेज या सव्वाशे वर्षांपेक्षाही जुन्या आणि नामांकित शिक्षणसंस्थेच्या इ.स. २०१० पर्यंतच्या वाटचालीचा मागोवा घेणारा एक ग्रंथ मेहता पब्लिशिंग हाऊसने अलीकडेच प्रकाशित केलेला आहे. ‘वाटचाल फर्ग्युसनची : १८८५-२०१०’ या नावाच्या या ग्रंथाचे अभ्यासपूर्ण लेखन डॉ. वि. मा. बाचल यांनी केलेले असून त्याचे कौशल्यपूर्ण संपादन डॉ. राधा दीक्षित यांनी केलेले आहे.
प्रस्तुत ग्रंथात या वाटचालीच्या इतिहासाची विभागणी १) स्थापना ते सुवर्णमहोत्सव (१८८५-१९३५) २) सुवर्णमहोत्सव ते शताब्दी (१९३५-१९८५) आणि ३) शताब्दी ते शतकोत्तर रौप्यमहोत्सव (१९८५-२०१०) या तीन भागात करण्यात आली असून हा इतिहास एकूण अठरा प्रकरणांमधून विस्तृतपणे मांडण्यात आलेला आहे. या ग्रंथाच्या संपादकांनी या ग्रंथाच्या सुरुवातीस दिलेल्या त्यांच्या निवेदनात म्हटल्याप्रमाणे थोडे संदर्भसाधनीकरण, थोडा इतिहास, थोडा अहवाल, थोडे आत्मकथन आणि थोड्या आठवणी असे या ग्रंथाचे संमिश्र स्वरूप आहे.
ग्रंथामध्ये भारताच्या स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातील समाजमनाचे आणि सामाजिक संस्कृतीचे स्वच्छ प्रतिबिंब उमटलेले आहे. ग्रंथाच्या पहिल्या भागात स्वातंत्र्यपूर्व काळातील समाजधुरिणांच्या समाज, संस्कृती आणि शिक्षणाबाबतच्या विचारधारांचं दर्शन घडतं. दुसऱ्या आणि तिसऱ्या भागात फर्ग्युसन कॉलेजच्या या वृक्षाला ज्ञानाच्या, कलेच्या आणि संस्कृतीच्या शाखा कशा फुटत गेल्या त्याचे नेमके विवेचन टिपणांच्या स्वरूपात आलेले आहे.
या सहाशे पानांच्या दीर्घ आणि विस्तृत ग्रंथात सुमारे शंभरच्या वर दुर्मिळातील दुर्मीळ चित्रे / छायाचित्रे समाविष्ट केलेली आहेत. लेखक डॉ. बाचल यांचा या संस्थेशी असलेला परिचय तब्बल पासष्ट वर्षांचा होता. त्यामुळे या संस्थेशी त्यांची नाळ अगदी घट्टपणे जुळलेली होती. असे असले तरीही ही इ.स. २००६ पासून म्हणजेच स्वत:च्या वयाच्या पंच्याहत्तरीच्या दिशेने वाटचाल चालू झालेली असतानाही फर्ग्युसनच्या वाटचालीचा इतिहास लिहिण्याचा डॉ. बाचल यांनी घेतलेला ध्यास केवळ अलौकिकच म्हणावा लागेल.
लेखकाने कणाकणाने गोळा केलेला मजकूर साक्षेपाने निवडणे, त्याची संगतवार मांडणीच्या दृष्टिकोनातून काटेकोर तपासणी करणे, ग्रंथाविषयाच्या व्याप्तीत राहून आणि सादरीकरणातल्या मर्यादांचे भान ठेवणे, त्यातल्या तपशिलांचा कुठेही विपर्या अथवा गळती होऊ न देणे आणि लेखकाच्या लेखनहेतूशी कुठेही प्रतारणा न होऊ देता संपादन करणे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हे सर्व करत असताना आवश्यक असलेला संयम आणि अलिप्तता यांच्याशी कुठेही फारकत न घेणे, हे मोठे अवघड काम डॉ. राजा दीक्षितांसारखा एक अभ्यासू संपादक आणि व्यासंगी साहित्यिकच करू जाणे.
यातील मांडणीमध्ये इतक्या घटना, इतकी माणसे, इतक्या घडामोडी अंतर्भूत असूनही त्यांच्या संदर्भातले वारंवार आलेले तपशील वाचताना आपल्याला कुठलीही संदिग्धता वाटत नाही, कुठेही हरवल्यासारखे वाटत नाही वा कुठेही तपशिलांमध्ये दोष विंâवा तफावती आढळत नाहीत, हे या ग्रंथाचे मोठेच वैशिष्ट्य म्हणावे लागेल. या ग्रंथाचे आणखी एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे हा संपूर्ण इतिहास वाचकांपुढे मांडताना लेखक आणि संपादक या द्वयीने कुठेही घटनांच्या अथवा विचारसरणींच्या चिकित्सेचा अभिनिवेश दाखवलेला नाही. तसंच यात अनावश्यक आकडेवारीचा भडिमार केलेलाही आढळत नाही. आजपावेतो लोकमान्य, लोकप्रिय आणि लोकोत्तर अशा अनेक व्यक्तिमत्त्वांच्या जडणघडणीत फर्ग्युसन या शिक्षणसंस्थेचा मोठा हातभार लागलेला आहे, हे सर्वज्ञातच आहे. ग्रंथाच्या पहिल्या भागात संस्थेशी वेगवेगळ्या कालखंडात अध्ययनाच्या, अध्यापनाच्या अथवा अन्य कारणांनी संलग्न झालेल्या अनेक व्यक्तिमत्त्वांच्या आठवणी, तसेच अनेक व्यक्तींच्या संस्थेतील कारकिर्दीबाबतचे किस्सेही समाविष्ट केलेले आहेत.
दुर्दैवाने हा ग्रंथ प्रकाशित स्वरूपात पाहण्याआधीच, लेखक डॉ. बाचल यांचे जानेवारी २०१३मध्ये निधन झाले. म्हणजेच, संपादक डॉ. राजा दीक्षित यांनी त्यानंतरही सलग चार वर्षं या ग्रंथाच्या संपादनासाठी जे कष्ट नेटाने उपसले आहेत त्याला तोड नाही. या ग्रंथात सर्वांत शेवटी समाविष्ट केलेल्या तब्बल एक्केचाळीस पानांच्या शिल्पा मिलिंद सबनीस यांनी तयार केलेल्या विस्तृत उल्लेख सूचीने या ग्रंथाच्या उपयोगितेत मोठी भर घातलेली आहे. हा ग्रंथ गेल्या शतकातील सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय स्थित्यंतरांचा संशोधनार्थ मागोवा घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी एक मार्गदर्शक ग्रंथ ठरेल, यात तीळमात्रही शंका नाही. थोडक्यात हा ग्रंथ तब्बल सव्वाशे वर्षे इतक्या प्रदीर्घ कालखंडाला व्यापून राहिलेल्या फर्ग्युसन कॉलेजच्या इतिहासाची लिखित स्वरूपात साक्ष देणारा एक मोलाचा दस्तावेज आहे.
-अपर्णा साठे
गणेश बाळकृष्ण भूमकर‘वाटचाल फर्ग्युसन’ची हे पुस्तक वाचताना प्रत्येक वेळी बाचल सरांची आठवण येत होती.
बाचल सरांचा मला विशेष अभिमान वाटतो कारण त्यांचा फर्ग्युसनशी व डेक्कन एज्युकेशन सोसायटीशी इतका दीर्घ व नजीकचा संबंध आला आणि याचं उत्तरदायित्व म्हणून त्यांनी हे पुस्तक तीन खंडात सादर केलं. हे मेहता सर तुमच्या विशेष प्रयत्नामुळे.
SAHITYA SUCHI, AUGUST 2017मराठी साहित्यात इतकेच काय एकूणच भारतीय साहित्यात संस्थात्मक चरित्रे अभावानेच आढळतात. शैक्षणिक क्षेत्रातील संस्थांचा विचार करता आत्तापर्यंत ‘बखर मुंबई विद्यापीठाची – डॉ. अरूण टिकेकर, ‘पुणे विद्यापीठाचा इतिहास’ – डॉ. राजा दीक्षित आणि ‘सिम्बायोसिस – एका संकल्पनेची चरित्रगाथा’ – डॉ. शां. ब. मुजुमदार अशी काही मोजकी चरित्रे सोडली तर बाकी फारशी दिसत नाहीत. यात बखर मुंबई विद्यापीठाची हे ललित अंगाने जाणारे लेखन सोडले तर इतर पुस्तके माहितीपर किंवा नोंदी स्वरूपातील आहेत. यामध्ये मोलाची भर घालत आता पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयाचे चरित्र सांगणारे पुस्तक आले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेल्या या महाविद्यालयाला जागतिक स्तरावर मान आहे. भारतातील सर्वोत्कृष्ट दहा महाविद्यालयांमध्ये याचा समावेश होतो. एकशे बत्तीस वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या महाविद्यालयाच्या एकशे पंचवीस वर्षांचा आढावा घेणारे हे पुस्तक ‘वाटचाल फर्ग्युसनची’ डॉ. वि. मा. बाचल यांनी अत्यंत परिश्रमाने हा सगळा मागोवा घेतला आहे. डॉ. राजा दीक्षित यांनी त्याचे संपादन केले आहे.
कोणताही देश पुढे जायला हवा असेल तर तिथे काय शिक्षण मिळते हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असतो. आज आपण जागतिक स्तरावरील चित्र पाहिले तर सर्वच मुलांना परदेशी जाऊन शिक्षण घेणे आवडते. आपला देश सोडून परदेशात जाऊन शिकणे हे महत्त्वाचे का वाटत असावे? याचा विचार केलाय का कधी कुणी? शिक्षणाने देश पुढे जाऊ शकतो. प्रगती करू शकतो हे सत्य आहे. पूर्वी पारतंत्र्यात असलेल्या आपल्या देशातही हे जाणून त्यावर काम करू इच्छिणारे काही गट होतेच. काहींना वाटत होते आधी स्वातंत्र्य मिळवावे नंतर सुधारणा करता येतील, तर काही सुधारकांचे मत होते आधी जनतेला सक्षम करू या, मिळालेले स्वातंत्र्य उपभोगायची, जपायची क्षमता तिच्यात निर्माण करू या आणि मग स्वातंत्र्याच्या मागे लागू या. याच विचाराने भारलेल्या काही मराठी तरुणांनी एकत्र येऊन १ जानेवारी १८८० रोजी ‘न्यू इंग्लिश स्कूल’ची सुरुवात केली. विष्णूशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक, आगरकर आणि नामजोशी या सर्वांनी ही शाळा सुरू केली तसेच २४ ऑक्टोबर १८८४ ला ‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’ या शैक्षणिक संस्थेची स्थापना केली. शाळा तर सुरू केली, पण महाविद्यालयीन शिक्षणाचे काय? तेही उपलब्ध व्हायला हवेच. यासाठी मग २ जानेवारी १८८५ ला ‘फर्ग्युसन महाविद्यालया’ची स्थापना करण्यात आली.
कोणतीही संस्था म्हटले की तिला स्वतंत्र कायदेशीर व्यक्तिमत्त्व असते. भावनिकदृष्ट्या तर ते असतेच असते. जे लोक ती संस्था सुरू करतात ते त्यात मनाने अतिशय गुंतलेले असतात. आपल्या अपत्याची घ्यावी तशी काळजी ते संस्था वाढावी म्हणून घेतात. त्या संस्थेत काम करणारे कर्मचारी तिला जेव्हा आपली समजतात तेव्हा तिची प्रगती आणखी वेगाने होते. शैक्षणिक संस्था असेल तर तिथले विद्यार्थी तिच्या लौकिकात भर घालतात.
१८८२ला आलेल्या हंटर आयोगापुढे साक्ष देताना वामन शिवराम आपटे यांनी अतिशय मुद्देसूद विवेचन करून नव्या खासगी आर्ट्स कॉलेजची निकड विशद केली होती. न्यू इंग्लिश स्कूलचे, त्यासाठी संस्थापकांनी केलेल्या धडपडीचे कौतुक हंटर आयोगाने केले होते. त्या पार्श्वभूमीवर ‘जेम्स फर्ग्युसन’ या तत्कालीन मुंबई प्रांताच्या गव्हर्नरने या प्रस्तावाला अनुमोदन दिले व बक्षीसासाठी रु. एक हजार दोनशे पन्नासची मदत देण्यापासून शक्य ते इतर सहकार्यही केले. याकरिता त्यांचेच नाव या महाविद्यालयाला देण्याचे निश्चित झाले. अशा रीतीने फर्ग्युसन जन्माला आले.
कोणत्याही शिक्षणाचा मूळ हेतू असतो : माहितीचे ज्ञानात रूपांतर करणे, असलेल्या ज्ञानात भर घालणे, त्या ज्ञानाचा उपयोग करून आपल्या व इतरांच्या आयुष्याला अर्थ प्राप्त करून देणे. अशाच उदात्त हेतूने शिक्षणसंस्था स्थापन केल्या जात असत, हल्ली मात्र चित्र बदलले आहे असे वाटते. शिक्षण हा व्यवसाय झाला आहे. शैक्षणिक संस्थेच्या नावाखाली सरकारकडून सर्वांत आधी अत्यल्प किमतीत अथवा नाममात्र भाडे करारावर जाग पदरात पाडून घेणे, तसेच भरपूर अनुदान, इतर काही सोयी-सवलतीही मिळवणे आणि नंतर भरपूर शुल्क आकारून विद्यार्थ्यांना प्रवेश देणे. शैक्षणिक संस्था चालवणे हे अवघड काम झाले आहे हे मान्यच आहे. पूर्वी फक्त तीन शाखा असणाऱ्या शिक्षणात आज असंख्य उपशाखा तयार झाल्या आहेत. समाजाच्या वाढत्या गरजेनुसार आणखी नव्या नव्या शिक्षणशाखा निर्माण होत आहेत. या पार्श्वभूमीवर कोणतीही संस्था फक्त सरकारी अनुदानावरच चालत नाही / चालू शकणार नाही याचे भान बाळगणेही गरजेचे आहे. अशावेळी या दोहोंचा सुवर्णमध्ये गाठणे ज्यांना शक्य होते, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील नाते जिथे छानपैकी जोपासले जाते त्या संस्थेची भरभराट होणे अशक्य नसते. अशीच भरभराट फर्ग्युसनची झाली आहे.
‘फर्ग्युसन कॉलेज म्हणजे शिक्षणक्षेत्रातील वैचारिक उदारमतवाद, स्वार्थत्याग, जिद्द यांची सांगड घालण्याचा अभिनव प्रयोग आहे. या प्रयोगातील वैचारिक मतभेद, शासनाशी संघर्ष, आर्थिक आणि प्रशासकीय आव्हाने, संस्थेची प्रतिष्ठा जपण्यासाठी केलेली धडपड, शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी शिक्षकांचे योगदान, विविध क्षेत्रांत लौकिक संपादणाऱ्या कष्टाळू विद्यार्थ्यांचे प्रयत्न व त्यांचे संस्थेविषयीचे प्रेम, त्याचा आविष्कार, अर्थकारण, राजकारण, समाजकारण, साहित्य आणि कला इत्यादी क्षेत्रांतील भरारी, जनमताने दिलेली अखंड साथ यांचा आढावा घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न या पुस्तकात केला आहे’ या ब्लर्बवरील मजकुराशी वाचक सहज सहमत होऊ शकेल. एकशे बत्तीस वर्षे पूर्ण करणाऱ्या या महाविद्यालयाने आजपर्यंत अनेक उत्तमोत्तम विद्यार्थी देशाला दिले आहेत, ज्यांनी जगभरात भारताचे नाव उज्ज्वल केले आहे. यात विठ्ठल रामजी शिंदे, स्वा. विनायक दामोदर सावरकर, अर्थतज्ज्ञ सी.डी. देशमुख, कुंदनमल फिरोदिया, काकासाहेब कालेलकर, राम गणेश गडकरी, शकुंतला परांजपे इत्यादी अनेक मान्यवरांचा समावेश आहे. गडकरींनी तर याच आवारात आपले स्मारक असावे अशी इच्छा व्यक्त केली होती, त्याप्रमाणे येथील ग्रंथालयात त्यांचा पुतळा उभारला आहे. खूप मोठ्या आणि निसर्गाने नटलेल्या या परिसरात हल्लीच्या झेड ब्रिजचा पूर्वज ठरावा असा एक पूल होता त्याला ‘उसाशाचा पूल’ असे नाव पडले होते. सगळ्या काळात महाविद्यालयीन जीवन सारखेच...
येथे अभ्यासावर भर देतानाच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वेगवेगळे उपक्रम राबवले गेले. आविष्कार, इनर्सिक यांसारख्या उपक्रमांनी, स्पर्धांनी देशपातळीवर आपले महत्त्व सिद्ध केले होते. सगळ्याच पातळ्यांवर नावाजल्या गेलेल्या या महाविद्यालयाला अनेक नामवंतांनी भेट दिली, येथील प्राध्यापक आणि प्रशासकांसह विद्यार्थ्यांचेही मनापासून कौतुक केले. भारताचे पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू, राजीव गांधी, मोरारजीभाई देसाई, राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद, प्रतिभाताई पाटील यांनीही याला भेट दिली. तीन पंतप्रधान व दोन राष्ट्रपती यांनी भेट दिली असे महाराष्ट्रातील बहुधा हे एकमेवच महाविद्यालय असावे. या सर्वांनीच आपल्या भाषणातून फर्ग्युसनच्या संस्थापकांचा गौरवपूर्ण उल्लेख करत त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाचे कौतुक केले. कोणतीही सुविध उपलब्ध नसताना एवढा मोठा व्याप उभा करणे आणि तो अधिकाधिक सक्षमतेने चालवत ठेवणे हे खरोखरच अवघड काम आहे, याची जाण या साऱ्यांना होती असे दिसून येते. आपल्या भाषणात नेहरूंनी नव्या युगातील विद्यार्थ्यांची कर्तव्ये सांगितली तर राजीव गांधींनी सामान्य माणसाच्या दर्जावरून देशाचा दर्जा ठरतो हे अधोरेखित करताना फर्ग्युसनने प्राप्त केलेल्या दर्जाचा गौरव केला. असे दर्जेदार ठरल्यानेच फर्ग्युसनला स्वत:च्या नावाचे टपाल तिकीट निघण्याचा सन्मानही मिळाला.
स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला श्रीमती वातुमल या, उच्चशिक्षणासाठी हुशार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊन मदत करणाऱ्या, दानशूर महिलेने मांडलेले विचार आजही तितकेच लागू पडतात. ‘भारतातील विद्यापीठांचा दर्जा उंचावून ती परदेशी विद्यापीठांच्या तोडीची बनवायला हवीत, त्यासाठी जास्त निधी वापरला पाहिजे’ असे त्यांचे मत होते.
या साऱ्या माहितीबरोबर अजूनही खूप काही पुस्तकात वाचायला मिळते. ही एकशे पंचवीस वर्षांची वाटचाल मांडताना यात माहिती मिळवण्याचे कष्ट जाणवतात. मात्र चरित्रात्मक न होता हे पुस्तक बरेचसे अहवालात्मक झाले आहे. यामध्ये संस्थापकांपासून ते आढाव्याच्या शेवटच्या म्हणजे एकशे पंचविसाव्या वर्षातील प्राध्यापक, विद्यार्थी यांच्यापर्यंत ठळक ठरलेल्या सर्वांची माहिती आली आहे. एखाद्या शाळेचे व कॉलेजचे वार्षिक वृत्त असावे तसे हे एकशे पंचवीस वर्षांचे वृत्त आहे. यात कॉलेजशी संबंधित सर्व महत्त्वाच्या घटनांचे विवरण आहे. कोणत्या वर्षी कुणी काय मिळवले? कशाकशात यश प्राप्त केले इथपासून युद्धकाळात काश्मीरमध्ये असलेली सहल, पानशेत पुराच्या वेळी लोकांना केलेली मदत अशा अनेकानेक गोष्टी इथे आढळतात. मग यात प्राध्यापकांच्या नव्या जबाबदाऱ्या, नवे शिक्षण यांचे उल्लेख आहेत. तसेच शैक्षणिक यशासह कला, क्रीडा, नाट्य अशा विविध प्रांतात उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे नामोल्लेखही आहेत. अगदी अपघातात मृत्यू पावलेल्या विद्यार्थ्यांना श्रद्धांजलीही आहे. सुरुवातीच्या काळात फर्ग्युसनमध्ये शिकून नंतर परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पत्राचे मजकूरही पुस्तकात उद्धृत केले आहेत. त्यावरून त्या काळात आपल्या व परदेशातील शिक्षण पद्धतींमधील फरक समजून घेण्यास मदत होते. काही वादग्रस्त मुद्देही त्या काळात होते त्याबद्दल पुस्तकात वाचायला मिळत नाही मात्र संपादकीयमधून उलगडा होतो त्याप्रमाणे लेखकाने थोडे बचावात्मक लिहिले असले तरी संदर्भ मूल्य वाढावे यासाठी काही भर डॉ. दीक्षित यांनी घातली आहे.
या पुस्तकातील मला भावलेली सर्वांत मोलाची गोष्ट म्हणजे पुस्तकाच्या शेवटी असणारी उल्लेखसूची. सूचीशास्त्राचा उत्तम नमुना असणारी ही सूची पूर्ण पुस्तकात उल्लेख झालेल्या व्यक्तींचा संदर्भ पुस्तकाच्या कोणत्या पानावर आहे हे दाखवते.
दस्तावेजीकरणासाठी महत्त्वाची ठरणारी ही माहिती. आता ही माहिती वाचकांनी का वाचावी? तर एखादी संस्था उभी करताना, वाढवताना, चालवताना, कोणकोणत्या अडचणी येतात हे सामान्य माणसाला सहसा माहितीच नसते. आपापल्या परीने जो तो फक्त समोर येणाऱ्या कमतरतांवर बोलत राहतो, नावे ठेवत राहतो. अशी पुस्तके वाचून या अवाढव्य पसाऱ्याची तोंडओळख जरी करून घेतली तरी मग वेळ आल्यावर बोलताना विचारपूर्वक बोलावे असे वाचकाला वाटेल. असे घडले तरी अत्यंत परिश्रमपूर्वक तयार केलेल्या या पुस्तकाचे चीज होईल, पुस्तक तयार करणाऱ्यांच्या कष्टाला मिळालेले हेच खरे फळ म्हणावे लागेल.
-आरती देवगांवकर
DAINIK SAKAL 18-06-2017फर्ग्युसन महाविद्यालय हे केवळ एका महाविद्यालयाचं नाव नाही, तर अनेक रथी-महारथी जिथं शिकले, जिथं त्यांनी राजकारणापासून साहित्यापर्यंत अनेक प्रेरणा मिळवल्या असं ते स्थान आहे. या महाविद्यालयाच्या स्थापनेला सव्वाशे वर्षं पूर्ण झाल्यानिमित्त डॉ. वि. मा. बाचल यांनी त्याचा सांगोपांग इतिहास लिहिला आहे. या महाविद्यालयाच्या वाटचालीचे अनेक टप्पे आहेत. डॉ. बाचल यांनी या टप्प्यांची तीन भागांमध्ये मांडणी केली आहे. स्थापना ते सुवर्णमहोत्सव (१८८५-१९३५), सुवर्णमहोत्सव ते शताब्दी (१९३५-१९८५), शताब्दी ते शतकोत्तर रौप्यमहोत्सव (१९८५-२०१०) अशा तीन भागांमध्ये त्यांनी फर्ग्युसनची वाटचाल मांडली आहे. डॉ. राजा दीक्षित यांनी संपादन केलं आहे.
DAINIK LOKMAT 07-05-2017फर्ग्युसनच्या वाटचालीचा ऐतिहासिक पट...
पुण्याच्या इतिहासात फर्ग्युसन महाविद्यालय हे त्या शहराची ओळख म्हणून सांगितले जावे, इतके महत्त्वाचे आहे. फर्ग्युसन महाविद्यालयाने तीन-चार वर्षांपूर्वीच शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वाटचाल पूर्ण केली. भारतीय स्वातंत्र्याच्या काळात लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर आदींच्या प्रेरणेतून स्थापन झालेल्या फर्ग्युसनचे ऐतिहासिक महत्त्व वेगळे आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुरू झालेल्या या संस्थेने अनेक स्थित्यंतरे, शिक्षणातील चढउतार, नवे बदल, आधुनिकीकरणाचे वारे अशा विविध गोष्टी अनुभवल्या आहेत. या महाविद्यालयाने तर स्वायत्त होण्यासाठीदेखील सातत्याने प्रयत्न सुरू ठेवले असून, येत्या काळात निश्चितपणे ती स्वायत्तता प्राप्त होईल.
फर्ग्युसनच्या १२५ वर्षाच्या वाटचालीचा मागोवा घेणे व बारीकसारीक सारे तपशील अचूकतेने देणे हे खऱ्या अर्थाने शिवधनुष्यच होते; परंतु ज्येष्ठ अभ्यासक डॉ. वि. मा. बाचल यांनी ते पेलले. तब्बल ३ खंडांमध्ये त्यांनी या साऱ्या वाटचालीचा मागोवा लिहून काढला. सुरुवातीला ३ खंडांत हे पुस्तक काढायचे होते, ते नंतर पुस्तकरूपाने काढायचे ठरले. हे सारे लेखन जसेच्या तसे छापणे शक्य नव्हते, तसेच त्यातील बरेचसे लेखन अहवालस्वरूपात असल्याने वाचनीयता कशी राखणार, हा प्रमुख मुद्दा होता. म्हणून त्याच्या संपादनाची धुरा डॉ. राजा दीक्षित या अभ्यासू व जाणकार व्यक्तिमत्त्वाकडे देण्यात आली आणि त्यांनी ती यशस्वीरीत्या पेललीदेखील. त्यांच्या संपादनाचा आणि प्रतिभेचा हात त्यात निश्चितपणे जाणवतो. इतके असूनही लेखनशैली भिन्न असल्याने बाचल यांच्या मूळ लेखनाला फारसा हात न लावल्याचेही डॉ. दीक्षित यांनी प्रांजळपणाने लिहिले आहे. मात्र, त्याची नेटकेपणाने मांडणी करून त्याचा गाभा आणि महत्त्वाचे ऐतिहासिक संदर्भ हरवू न देता त्याची वाचनीयता जपणे हे अवघड काम डॉ. दीक्षित यांनी केले आहे.
या पुस्तकाची मांडणी तीन भागांमध्ये केलेली आहे. पहिल्या भागात स्थापना ते सुवर्ण महोत्सव, दुसऱ्या भागात शताब्दीपर्यंतची वाटचाल व तिसऱ्या भागात शतकोत्तर रौप्य महोत्सव इथपर्यंतचा प्रवास मांडण्यात आला आहे.
फर्ग्युसन महाविद्यालयाची भव्य वास्तू मुखपृष्ठावर आहे. प्लेगच्या आपत्तीचे दशक, माजी विद्यार्थ्यांच्या आठवणी, प्राचार्य महाजनी, प्राचार्य कर्वे व प्राचार्य कोगेकर आदी मान्यवरांचा कालखंड, त्यातील महत्त्वाचे संदर्भ या साऱ्यांची मांडणी अभ्यासपूर्ण पद्धतीने केलेली आहे.
तत्कालीन सामाजिक, राजकीय, शैक्षणिक परिस्थिती या पुस्तकाच्या वाचनातून उलगडते. काळाच्या प्रवाहात कसे बदल होत गेले, डेक्कन एज्युकेशन सोसायटी व फर्ग्युसनने काळाची पावले ओळखत आधुनिकतेची कास कशी धरली, या साऱ्यांचा मागोवा या पुस्तकातून मिळतो. १८८५ ते २०१० या काळातील स्थित्यंतराचा एक पटच या पुस्तकाच्या निमित्ताने आपल्यासमोर खुला होतो. इतिहासाचे अभ्यासक, शिक्षणप्रेमी, विद्यार्थी, पुण्याच्या ऐतिहासिक वाटचालीविषयी जाणून घेण्यात रस असणारे अशा साऱ्यांसाठीच हे पुस्तक म्हणजे एक मौलिक दस्तऐवज ठरेल, यात अजिबात शंका नाही.
-पराग पोतदार