Pratibha Mahajan - Maliमृत्युंजय ही मराठीतील एक अजरामर कलाकृती आहे.
2005 ला डी.एड् ला असताना वाचली होती... पण आता परत वाचावीशी वाटली... 1800 पानांचे हे हस्तलिखित पूर्णत्वास नेण्यासाठी लेखकांना 7 वर्षांचा कालावधी लागला.प्रचंड मोठा आवाका असणारे मराठी भाषेतील अग्रगण्य लेखक शिवाजी सावंत.... लेखकांच्या अफाट मेहनतीला,तळपत्या लेखनीला व वाचकाला खिळवून ठेवणार्या लेखनशैलीला मानाचा मुजरा!!!
कर्णकथा,दानशूर कर्ण,ज्येष्ठ कौतेय,राधेय सूर्यपूत्र कर्ण ! कर्ण ! कर्ण !
त्याचा त्याग,त्याने भोवलेल्या यातना,सोसलेले कष्ट,सूर्यपूत्र असूनही त्याला आयुष्यभर सूतपुत्राची अवहेलना सहन करावी लागली,त्याचे निव्वळ मित्रप्रेम,त्याचा आदर्शवाद.....कादंबरी मधील पात्रांचे आत्मकथन सारं काही खिळवून ठेवणारं आहे.
Vishwanath Joshi`कर्णा`, तु `मृत्युंजय` नव्हतास!
काही पुस्तकं मनावर गारूड करतात , सहजासहजी अशी गारुडं मग खाली उतरवता येत नाहीत . त्या पुस्तकातील काही व्यक्तिरेखाही मनावर प्रभाव करतात . एकुणच ते पुस्तक वाचून झाल्यावरही आपण त्या पुस्तकाच्या धुंदीतच असतो!
माझ्या वाचनात अशी फार पुस्तके आली नाही पण काही पुस्तकांनी माझ्यावर विलक्षण प्रभाव टाकला . त्यातीलच एक पुस्तक म्हणजे `मृत्युंजय`!!
कै. `शिवाजीराव सावंत` यांची अजरामर साहित्यकलाकृती! साधारणपणे ज्यांना मराठी साहित्याची गोडी नाही त्यांना मृत्युंजय वाचायला द्यावी . मराठी भाषेची गोडी सहज लागेल . आज मराठी वाचकांमध्ये असे क्वचित वाचक असतील ज्यांनी मृत्युंजय वाचली नाहीये .
`वि. स. खांडेकरां`च्या `ययाति`नंतर इतकं शब्दसौदर्य असलेली कादंबरी म्हणजे मृत्युंजय होय!
इथेच एक प्रांजळ कबुलीजबाब देऊ इच्छितो की इतिहासाच्या दृष्टीकोनातून विचार केल्यास मृत्युंजयचे स्थान हे शुन्य आहे . व्यासांच्या महाभारतात काही प्रसंग नाहीच आहेत जे मृत्युंजयमध्ये आहेत . त्यामुळे मृत्युंजय मधील शब्द अन शब्द खरा आहे असा गैरसमज करुन घेऊ नये! मृत्युंजयची ओघवती भाषा , सावंतांची ती अनोखी शब्दरचना , निसर्गांचं केलेलं वर्णन , या सर्व बाबींचा मात्र विचार केला तर मृत्युंजयचे स्थान फार वरचे आहे हे निश्चित! काही पुस्तकं अशी असतात जी वाचायला घेतल्यावर खाली ठेवावी असं वाटतच नाही , मृत्युंजय अशांमधीलच एक आहे! मृत्युंजय या कादंबरीमुळे मराठी भाषेला एक संजीवनी मिळाली . मराठी भाषेचे वाचक वाढले . लोकांना पुन्हा एकदा कादंबर्यांनी भुरळ घालायला सुरुवात केली असे अनेक फायदे मृत्युंजयचे आहेत पण तेवढेच तोटे देखील आहेत .
मृत्युंजय ही `महाभारत`कालीन महारथी `कर्णा`ची भावस्पर्शी कथा आहे .
इथे एका वेगळ्या दृष्टिकोनातून आपण ती कादंबरी वाचत जातो . सुरुवातीला स्वत: कर्ण आपली कथा सांगायला सुरुवात करतो . त्याच्या त्या गावाचं - `चंपानगरी`चं तर वर्णन इतकं सुरेख आहे की इथुनच ही कादंबरी आपल्या मनावर पकड घेते . मग `कुंती` कर्णाविषयी सांगते . खरं सांगायचं तर वैयक्तिकपणे कुंतीचं सांगणं मला वाचायला कंटाळा देणारं होतं! पण कर्णाची जन्मकथा आपल्याला कुंतीच सांगते आणि त्यावेळी सावंतांनी तीथे अगदी प्रसंगानुरूप लेखणी वापरल्यामुळे कर्ण भाव खाऊन जातो! कर्णाची पत्नी `वृशाली` ही देखील कर्णाविषयी सांगते आणि कर्ण आणि वृशाली दोन्ही सहानुभूती मिळवतात.
स्त्रीचं जीवन म्हणजे पतीच्या चरणांवर भक्तिभावानं आणि श्रद्धेनं समर्पित केलेलं एक कमलपुष्प असतं! पतीचं सौख्य तेच तिचं सौख्य . पतीच्या जीवनाची अर्धी बाजु सावरण्याची पवित्र शपथ तिनं सप्तपदीच्या मंगल वेळी अग्निनारायणाला साक्ष ठेवून घेतलेली असते .
अशा वाक्यांमुळे माझ्या मनात वृशालीने एक वेगळाच आदर मिळवला . शिवाय `शोण`, `दुर्योधन` यांची मनोगतं देखील भारावून टाकणारी होती . शेवटचं `श्रीकृष्णा`चं मनोगत वाचताना मध्येच डोळे डबडबलेले होते! शेवटी मृत्युंजय वाचून पुर्ण केलं! मृत्युंजय वाचल्यावर एक वर्णनविलक्षण भावना मनात चेतवली गेलेली होती .
मृत्युंजय वाचल्यावर `कर्ण` आमच्यासाठी `हिरो` झाला होता . एक कर्ण आणि दुसरा `दिलीप कुमार` हे त्या काळातील आमचे हिरो होते .
मृत्युंजय मधल्या अनेक वाक्यांनी मनावर जबरदस्त पकड घेतली होती . "तारुण्य म्हणजे ज्वलंत धमन्यांचं अविरत स्पंदन" यांसारख्या वाक्यांनी मनाचा तळठाव व्यापला होता .
मृत्यंजयमधील काही प्रसंग वाचल्यावर मनामध्ये एक विषण्णता जाणवली . जन्म झाल्यावर त्याला आईनेच आपल्यापासून दूर केलं होतं . `गुरु द्रोणां`चा आदर करुनही द्रोणांनी त्याच्या पदरी उपेक्षाच टाकली होती .
तो ब्रह्मास्त्र मिळवण्यासाठी महेंद्र पर्वतावर `भार्गव परशुरामां`कडे गेला आणि त्याने सर्वस्व पणाला लावले पण पुन्हा एकदा त्याच्या पदरात जळजळीत निखारेच पडले आणि एक धगधगता शाप! शेवटी अंगावर धारण केलेली कवच - कुंडलेही इंद्राने दान म्हणून मागीतली आणि त्याच्यासोबत छळ केला आणि हे सगळं झाल्यावर कुंती त्याच्यासमोर आली! कुंतीसाठी त्याने एकाच म्हणजे फक्त अर्जुनालाच वधेन बाकीच्यांचा वध करणार नाही असं वचन दिलं! `गंगापुत्र भिष्मां`ची अवज्ञा होईल म्हणून हा रणधुरंधर पहिले दहा दिवस रणांगणात उतरला नाही!
अर्जुनासाठी राखुन ठेवलेली `वैजयंती` त्याला `घटोत्कचा`वर सोडावी लागली . शेवटी नखं नसलेल्या सिंहासारखी त्याची अवस्था झाली होती!
पण तरिही मनामध्ये अदम्य जिद्द ठेवून हा रणमार्तंड सेनानायक रणांगणात उतरला आणि पांडवांचे दुर्दै़वाचे दशावतार दिसु लागले . शेवटी कृष्णाच्या सांगण्यावरुन अर्जुनाने त्याच्यावर बाण चालवला आणि एक वादळ शांत झाले! कुरुक्षेत्रावर सुर्यास्त झाला!! `कर्ण`पर्व समाप्त झाले होते!!
कर्णाचं गारुड मनावर ठेवूनच मग पुन्हा एक दोनदा मृत्युंजय पूर्ण वाचुन काढलं . पुन्हा पुन्हा कर्णाने माझ्या मनात वादळ उठवलं! मधल्या काळात माझं वाचन वाढलं . विविध दृष्टीकोनातून मी महाभारत वाचु लागलो . प्रत्येक वेळी कर्ण वेगळा वाटत गेला असला तरीही मृत्युंजयमुळे मी भारावून गेलो होतो . मग पणशीकरांचं `कर्ण कोण होता?` हे पुस्तक वाचनात आलं . नंतर परम पुज्य `वरदानंद भारती` यांचे कर्णावरचे लेख वाचनात आलं . या दोन्ही पुस्तकांमध्ये कर्णाविषयी नकारात्मकता वाचायला मिळाल्यामुळे संदर्भासहित महाभारत वाचायला घेतले आणि कर्णविषयी सत्य हळुहळू समजत गेले . बुद्धीला ते सत्य पटत होते मात्र मनाला पटत नव्हते . मग मात्र मृत्युंजय मधील अवास्तव , काल्पनिकतेवर असलेला भर हे सगळं स्पष्ट झालं मग कर्णापेक्षा कितीतरी पटीने मला इतर व्यक्तिरेखा भावल्या . विशेषतः भीष्मांनी माझ्यावर विलक्षण प्रभाव टाकला . कर्ण हा कुणी महात्मा /वीरपुरुष नसुन तो खलपुरुष होता हे देखील मला चिंतन केल्यावर समजु लागलं . शेवटी माझ्या मनावर दीर्घ काळ राज्य करणारा कर्ण माझ्या मनातुन अखेर हद्दपार झाला!!
सुरुवातीला कर्णाच्या कृतींचं आम्ही समर्थन करायचो . आता मात्र तसं करताना स्वता:हाचीच लाज वाटु लागली . द्रौपदीला तो भर सभेत वेश्या म्हणाला असं वाचताना पुर्वी आम्हाला काही विशेष वाटलं नव्हतं पण आता मात्र तो विचार करतानाही मन धजवत होतं! भार्गव परशुरामांना असत्य सांगुन अंधारात ठेवणार्या कर्णाची प्रवृत्ती किती हिणकस असावी असं वाटु लागलं . गरीब ब्राह्मणाची गाय मारुन कर्णाला काय मिळालं?
स्वता:हाच्या धनुर्विद्येच्या टिमक्या मिरविणारा कर्ण गांधर्व युद्धात निष्पभ्र का ठरला ? असे अनेक प्रश्न मनात निर्माण झाले आणि कर्ण हा माझ्या मनात इतिहासजमा होवुन बसला!
आजही मी मृत्युंजय वाचतो पण कर्णासाठी नाही तर त्यातील अमोघ भाषेसाठी . साहित्य कलाकृतींमध्ये मृत्युंजय फार वर आहे मात्र त्यात इतिहास मिसळला गेला तर अज्ञानाचं प्रदुषण पसरतं. `श्रीमान योगी`/`छावा` किंवा मृत्युंजय या कादंबर्या अवश्य वाचाव्यात पण त्यातील काल्पनिकता ही खरी मानु नये . किमान सुज्ञ आणि विवेकी वाचकाने ही गोष्ट नोंद करुन घ्यावी!
कर्णाशी माझं काहीच वैर नाही . तो पराक्रमी होता , त्याने अनेक दिग्वीजयही केले , त्याच्या दानशुरपणाला तोड नाही हे सगळं खरं पण तो अराजक प्रवृत्तीला पाठिंबा देणारा अधर्मी होता असं व्यासांनी म्हटलयं . आम्ही नाही!!
आज एकुणच कर्णाकडे वळुन पाहताना जास्त काही म्हणावसं वाटतं नाही . दोन ओळीच खुप आहेत ,
कर्णा , तु मृत्युंजय नव्हतास रे! मृत्युंजय नव्हतास!!
धन्यवाद!
Datta Shinde Patilएक वेळ अवश्य वाचावं असं पुस्तक
Somnath Rathod
आज जेव्हा शिवाजी सावंत यांची लोकप्रिय कादंबरी मृत्यूंजय वाचून समाप्ती झाली तेव्हा कळाले.
"अंगराज कर्ण. सुतपुञ कर्ण. कौरव दिग्विजयी सेनापती कर्ण .जेष्ठ कौंतिया कर्ण. राधेय कर्ण . साक्षात इंद्रदेवाला आपल्या दारात याचक म्हणून उभा करणारा दानवीर कर्ण
आपला मिञ दुर्योधन व कौरव पराभूत होणार माहीत असताना मिञाला दिलेल्या शब्द खातीर शेवट पर्यंत जिगरांने लढणारा कर्ण.
मृत्यू च्या दारात उभा असताना याचक वृद्ध ब्राम्हणाला स्वतःचे दोन सोन्याचे दात दगडाने तोडून देण्याचे मुलाला आदेश देणारा दानविर कर्ण
प्रत्येक माणसात एक कर्ण असतोच..!
१० दिवस डोक्यात गरागरा फिरणारा कर्ण आज डोक्यासह शांत झाला.!
कादंबरी कार शिवाजी सांवत ना कोटि कोटि प्रणाम.
Yogesh Kokilहे पुस्तक आत्ताच वाचून संपवले आणी अक्षरशः झपाटल्यासारखे झाले आहे. हे पुस्तक आहे की तत्वज्ञान आहे, कादंबरी आहे की काव्य आहे समजत नाहीये. शिवाजी सावंतांनी गुंफलेली ही कर्णाची चरित्रगाथा मनाचा ठाव घेऊन जाते.भाषेची सर्वांगसुंदर मांडणी आणी उच्च संस्कार मूल्य यांनी नटलेली ही कादंबरी म्हणजेच साहित्याला मिळालेली एक सर्वोत्कृष्ट देणगी आहे असा मला वाटतं. कादंबरीची कथा ही सर्वश्रुत आहे परंतु इथे कर्ण फार फार वेगळा भासतो. तो दानशूर आहे, महापराक्रमी आहे, तत्त्वनिष्ठ आहे, दुर्योधनाचा/अश्वत्थाम्याच्या परममित्र आहे हे तर जाणवतेच पण लक्षात राहते ते हे की तो किती दुर्देवी आहे, परिस्थितीने पिचलेला आहे. क्षत्रिय असूनही सूतपुत्र म्हणून आयुष्य घालवायला लागलेल्या कर्णाची घुसमट बेचैन करायला लावणारी आहे.शिवाजी सावंतांची अतिशय रसाळ आणी ओघवती भाषा पूर्ण कादंबरी भर आपल्याला गुंतवून ठेवते.कादंबरीत अनेक सौन्दर्यस्थळे आहेत जी मनावर कोरली जातात.नीलवर्णी अशा श्रीकृष्णाचे विराटरूप दर्शन, कर्णाचे गंगा नदी मधले दररोजचे अर्घ्यदान, कर्णाची दिग्विजय यात्रा, कवचकुंडलाचे इंद्राला दान आणी कुरुक्षेत्र वरची अखेर हे कादंबरीतील परमोच्च बिंदू आहेत असं मला वाटते .शिवाजी सावंतांनी वापरलेले अनेक शब्द हे प्रसंगी जड आहेत परंतु कथे बरोबरच्या प्रवाहात अतिशय आवश्यक आणी चपखल बसलेली आहेत.जागोजागी पेरणी केलेली तत्त्वज्ञान उजळून टाकणारी वाक्य फार गर्भित अर्थ सांगून जातात.
आज मराठी भाषा दिनाच्या दिवशी ही कादंबरी वाचून मी पूर्ण करू शकलो याचा मला फार अभिमान वाटतो आणी आनंद ही...
जरूर वाचा 🙏
Nit Niteshही कादंबरी आहे मृत्यूच्या भीतीवर जय मिळवणाऱ्या पण अखंडित संभ्रमित असणाऱ्या कर्णाची. सर्वपरिचित अशी कादंबरी... तब्बल ३७ ग्रंथातील संदर्भ घेऊन, त्याचं चिंतन, मनन करून शिवाजी सावंत यांनी अलंकारिक भाषेत ही कादंबरी लिहली. आणि या कादंबरीने साहित्यविश्वातील अनेक विक्रम मोडले.
कादंबरीची सुरवातच अशी आहे की "आज मला काही बोलायचं आहे." कालवश माणसं केव्हा बोलतात तर, जेव्हा जेव्हा हाडामांसाची जिवंत माणसं मृतांसारखी वागतात तेव्हा तेव्हा मृतांना जिवंत होऊन बोलावं लागत. या वाक्यातच किती जिवंतपणा आहे. मनाच्या सखोल, गहनगंभीर गाभाऱ्यातून कर्णाला एक आवाज स्पष्ट ऐकू येतो. आणि त्यानुसार आयुष्याच्या भात्यातील विविध घटनांचे बाण मोकळ्या मनाने त्याला सर्वांना दाखवायचे, आपली जीवनकथा सर्वांना सांगावी असे म्हणून सुरवात होते.
महाराज शत्रुघ्नच्या पुण्यवान नगरात, मथुरेत आपलं बालपण जगेलेली पृथु. पुढे तिचे वडील मथुरेचे यादवराज शुरसेन यांनी त्याचा भोजपुर नगरातील आतेभाऊ कुंतीभोज याला दिलेला शब्द पाळून तिला त्याच्या स्वाधीन करतात. आणि ती भोजपुर नगरात राहू लागते. त्यांच्या नावावरून तिला ते कुंती या नावाने आणि आजही हे जग तिला कुंती याच नावाने ओळखते. एकेका घटनेत माणसाला नखशिखान्त बदलण्याचं किती प्रचंड सामर्थ्य असतं हे तिने तिथे राहून सिद्ध केले.
भोजपुरात एक महायज्ञ करण्याच्या हेतूने हिमालयात घोर तपश्चर्या करून, मनाचं दिव्य सामर्थ्य मिळवून ऋषी दुर्वासा आले होते. आर्यवर्ताच्या सर्व कोपिष्ट ऋषींचा कोप ज्यांच्या कमंडलूत सहज सामावला असता असे ऋषी दुर्वास. "जिथं वैभवाचा विलास असतो तिथं आत्म्याचा विनाश असतो." असं म्हणून राजवड्याबाहेर ते परणकुटीत यज्ञ करतात. त्या दरम्यान कुंतीभोज राजाची मानसकन्या कुंती, जी शुरसेन राजाची कन्या होती, ती त्यांची सेवा करते. त्या सेवच फळ म्हणून तिला मंत्र देतात. "सगळं जग तुला यापुढं वीरांची जननी म्हणून ओळखेल. ज्या ज्या शक्तींची स्मरण करून तू हे मंत्र म्हणशील ती ती शक्ती मानवरूपात क्षणात दासासारखी तुझ्या समोर उभी राहील आणि तुझ्या पोटी आपल्यासारखाच तेजस्वी पुत्र निर्माण करून निघून जाईल. ही दुर्वासाची वाणी आहे."
काही दिवसांनी तेजस्वी सूर्याला पाहून तिच्या मनात एक विचित्र विचार येतो. त्या मंत्राचं सामर्थ्य पाहण्यासाठी, तिच्या दृष्टीने अशक्य म्हणून त्या तेजस्वी शक्तीचं, सूर्याचं स्मरण करून ती मंत्र म्हणते. दुर्वासाची वाणी व्यर्थ जाणारी नव्हती. ती गरोदर राहते.
मातृत्व हा स्त्रीला मिळणारा सर्वात श्रेष्ठ वर असला तरी कौमार्यावस्थेत माता होणं हा एक शापासारखा असतो.
"वीरांनी विजयाच्या धुंदीत जगावं आणि विरकन्यांनी शीलासाठी मरावं." हे तिच्या वडिलांचे अमृताचे बोल ती विसरली नव्हती. वैदराजाना सांगून दुर्वासा ऋषींच्या यज्ञाची सांगता करण्यासाठी जगातलं सगळ्यात दाहक विष मला आणून दे म्हणून आज्ञा करते. आणि प्राशन करते. पण मृत्यूसुद्धा आपली कृपादृष्टी माणसावर हवी तेव्हा वळवायला कुठे तयार असतो ?
एका मध्यरात्री प्रसूतीवेदनेच्या मुशीतून तापून निघालेलं, उगवत्या सुर्यासारखं, देखण रूप तिच्या झोळीत पडलं. पण त्याचा त्याग केल्याशिवाय तिला गत्यंतर नव्हतं. प्रेम आणि व्यवहार, कर्तव्य आणि भावना, वास्तवता आणि ममता या द्वंदात सापडून तिची शारीरिक आणि मानसिक कोंडी झाली. आणि त्याला एका पेटीकेत टाकून उजाडण्यापूर्वी अश्वनदीच्या पात्रात सोडून दिले. ती पेटीका अश्वनदीतून चर्मवती, यमुना, गंगा असा प्रवास करत करत प्रयगराज च्या पुढे अंगदेशातील चंपानगरी जवळ गेली. ती एक सारथ्यान बाहेर काढली. तेव्हापासून कर्ण तिथे सर्थ्याचा पुत्र म्हणूनच वाढला.
चंपानगर या गावी आपला भाऊ शोण आणि आई बरोबर राहत असताना, गावातील बरेच निसर्गानुभवांचे दाखले दिले गेलेत. जे त्याच्या जीवनाशी अत्यंत निगडित आहेत. कर्ण गावातील वटवृक्षाखाली पक्षी पाहत असताना भगदत्त नावाचा त्यांचा शेजारी येऊन त्याला म्हणतो, "पक्षी पहायचे असतील तर अरण्यात अशोकाच्या वृक्षाजवळ जायला हवे. या वटवृक्षावर फक्त कावळेच असतात, असलाच तर चुकून एखादा कोकीळ तोही कोकिळेच्या धुर्तपणामुळे." ती धूर्त कल्पना जरी खोटी नसेल, तरी वसंत ऋतूचा योग्य काळ येताच त्याची सप्त स्वरातील तान इतर पक्षांना ओरडून सांगतेच सांगते की मी कोकीळ आहे. कर्णाच्या बाबतीत किती भावुक उदाहरण आहे हे...
त्याचप्रमाणे हस्तिनापूरच्या नगरात फिरत असताना, कुंतीच्या रथाखाली येता येता शोण ने वाचवलेलं मांजरीचं पिल्लू. ते दृश्य पाहताना... आपल्या पोराला एकटं टाकून ती मांजर कुठं भटकत होती...?? हा कर्णाच्या मनात आलेला प्रश्न. तसेच कुंतीच्या रथाला सहा घोडे जोडण्याची निट व्यवस्था असतानाही केवळ पाचच घोडे जोडले होते..!! एका घोड्याची जागा तशीच का मोकळी सोडली होती. ते पाहताना... राजवड्यावरचे घोडे संपले की काय..?? असे स्वतःशीच पुटपुटणारा कर्ण. अशी अनेक उदाहरणं या कादंबरीत आहेत, ज्यात कर्णाच्या मनःस्थितीची घालमेल जाणवते.
हस्तिनापूर मध्ये झालेल्या योद्धयांच्या परीक्षेत विजयी होऊनही, तो सुतपुत्र म्हणून हिनवला जातो. त्याचा पराक्रम पाहून पांडवांना कोण थोपवू शकणार असेल तर तो कर्णच होता हे अचूक ओळखून, त्या परिस्तिथीचा फायदा घेऊन, पांडवांचा काटा काढायचा या उद्देशाने तो तेजस्वी आणि पराक्रमी कर्णाला अंगदेशाचा अभिषिक्त राजा करतो. आणि कर्ण दुर्योधनाला वचन देतो की, "ज्या मेरूपर्वताच्या धेर्यांनं आज तू मला सावरलंस त्याच धेर्यांनं मी आजन्म तुझ्या पाठीशी राहीन ! प्राण गेला तरी कधीही परतणार नाही !
दुर्योधन पांडवांना महाराज पांडुचे पुत्र मानतच नव्हता, एकतर ते कौंतेय असू शकतात पण पांडव नाहीत. किंदम ऋषीच्या शापामुळे त्यांना पुत्र होऊच शकत नाही असा त्याचा दृढ समज होता. म्हणूनच त्यांनी मथुरेला जाऊन श्रीकृष्णाबरोबर भांडावं, या हस्तिनापुरात ते उद्धत अधिकारान आपलं तोंड का खुपसत आहेत असा त्याच्यासमोर प्रश्न होता. आणि म्हणूनच वारणावताच्या जंगलात हवापालटासाठी आणि वनविहारासाठी गेलेल्या पांडवांना कुंतीसहित, लाक्षागृह तयार करून त्यांना जाळून मारण्याची योजना आखतो. आपल्या निकट सहायकाला, पुरोचनाला ती जबाबदारी देतो. ते मनोरथ पूर्ण झाल्याची बातमी घेऊन पुरोचनाचा दूत येतो.
पांचाल देशाची युवराज्ञी याज्ञसेनी, द्रुपद राजाची रूपवर्गीता कन्या द्रौपदीच्या स्वयंवराची वार्ता ऐकून दुर्योधनाच्या मनाची कारंजी उफाळून उधळू लागतात. स्वयंवरात द्रुपदानी मांडलेला पण हे अर्जुन आणि कर्णच पूर्ण करू शकतात याची त्याला खात्री होती. म्हणूनच तो पण कर्णानी आपल्यासाठी जिंकावा असे सांगून तो कर्णासह तिथे गेला. कारण अर्जुन तर आता हयात नाही असा त्याचा समज होता. तिथेही द्रौपदी कर्णाला सुतपुत्र म्हणून तुला भाग घेता येणार नाही, मी सारथ्याची पत्नी होऊ इच्छित नाही असे अपमानित करते. आणि ब्राम्हण वेशातील अर्जुन तो पण जिंकतो. अर्जुनाची ओळख पटल्यामुळे कर्ण आणि अर्जुन यांच्या झालेल्या युद्धाचे कर्णाचा पुत्र सुदामन मारला जातो. ते हस्तिनापूरला माघारी येतात.
काही दिवसानी पांडवही येतात. पांडवांना हस्तिनापूरात न राहू देता त्यांना खंडाववनात जाण्यास सांगितले जाते. तिथे त्यांनी इंद्रप्रस्थ राज्य निर्माण केलं. हस्तिनापूर हे पूर्वज्यांच्या पराक्रमाचं तर इंद्रप्रस्थ हे पांडवांच्या स्वकर्तृत्वाचं राज्य होतं. पांडवांनी राजसूय यज्ञ केला तेव्हा सर्वांना आमंत्रित केले होते. इंद्रप्रस्तातील राजवाड्याच्या भिंतीवर चितारले अनेकोनेक भावप्रसंग होते. त्यातील कुंतीने खासकरून मथुरेचे चित्रकार आणवून रेखाटून घेतलेला एक प्रसंग (जो की कर्ण जन्मवेळचा होता) पाहून कर्ण पुन्हा संभ्रमित होतो. त्या चित्राचा त्याला काही केल्या अर्थबोध होत नाही. पण त्यातील आर्तता, गुढरम्यता, असहायता त्याचे कुतूहल वाढवत होती. त्यात चितारलेल्या पेटीत काय होते या प्रश्नच उत्तर देताना, कुंतीदेवी म्हणाल्या होत्या की ते एकट्या ऋषी दुर्वासाना माहीत आहे. अशी माहिती त्याला अमात्यांनी दिली.
पूर्ण राजवाडा पाहून ते शेवटच्या मायावी दालनात गेले. तिथे दुर्योधन पाण्यावर काढलेल्या फसव्या रांगोळीवर पाय टाकतो आणि पाण्यात तोंडघशी पडतो. तेवढ्यात दुर्योधनावर तिरस्काराचा कटाक्ष टाकून आपल्या सखींना उद्देशून द्रौपदी खोचकपणे म्हणते, " अंध पित्याचे पुत्रही अंधच असतात म्हणायचे..!!" दुर्योधनावरचा तिचा क्रोध तिनं त्याचा असा अंधपित्याचा नैसर्गिक व्यंगचा मर्मभेदक उल्लेख केल्याने, त्या कुत्सित आणि खोचक उद्गाराची कर्णाला किळस येते. तिच्या कुशेष्ठेने बिथरलेला दुर्योधन कडाडून तिला म्हणतो, "अंध पित्याचे पुत्र डोळस असतात हे प्रसंग येईल तेव्हाच तुला कृतीनं दाखवून देईन."
पुढे यज्ञाची सुरवात होताच, शिशुपाल आपल्या आसनावरून उठून युधिष्ठिरावर नजर रोखुन म्हणतो, "कुरुंच्या श्रेष्ठ कुलात जन्मलेल्या युधिष्ठिरा, एका गवळ्याच्या पोराला या महान यज्ञाचा यज्ञवेत्ता करून तू इथं या आर्यावर्तातल्या समस्त शूर क्षत्रियांची आमंत्रण देऊन कुचेष्टा मांडली आहेस काय ? जरासंधाचा सेनापती म्हणून आणि रुक्मिणीचा विवाहपूर्व अयशस्वी वर म्हणून त्याला श्रीकृष्णावर प्रतिशोध घ्यायचा होता. श्रीकृष्णाची कुणी कधी केली नसेल आणि ऐकली नसेल अशी असह्य अवहेलना त्याने केली. सागराच्या भरतीलाही फुगण्याची एक सीमा असते. त्याचे शंभर अपराध पूर्ण होण्याची वाट पाहत असलेल्या श्रीकृष्णाने ते पूर्ण होताच, आपल्या सुदर्शन चक्राने क्षत्रियत्वाच्या खोट्या अहंतेने उन्मत्त झालेल्या शिशुपालाचे शीर धडापासून वेगळे करतो. सत्य आणि किमयेच्या संभ्रमात पडलेल्या कर्णाला त्या दाहक चक्राने आणि श्रीकृष्णाच्या वृद्धिंगत होणाऱ्या शरीराबरोबर आपले शरीर का तप्त झाले असा प्रश्न पडतो.
हस्तिनापुरात आलेला दुर्योधन तिथे घडलेल्या अप्रिय घटना विसरू शकत नव्हता. त्याचा बदला घेण्यासाठी मामा शकुनी द्युताच्या चार पट्ट्यात केवल पांडवच नाही तर पांचाली आणि कुंतीदेवीलाही गुंडाळण्याची अत्यर्क स्वप्न दाखवतो. त्यासाठी राजसूय यज्ञापेक्षा भव्य विष्णुयाग यज्ञासाठी पांडवांना आमंत्रित करतो. यज्ञ मंडपात समिधा पडण्याऐवजी राजसभेत शकुनी मामा आणि युधिष्ठिर फासे टाकतात. ज्याला कर्णाने द्वंदात जीवदान दिले अशा भिमवधीत जरासंधाच्या हाडाच्या कवड्या द्यूतासाठी मामा शकुनी वापरतो. त्यांच्या आवाजाने त्या थरथरत असल्यामुळे कर्णाला योजनापूर्वक यज्ञासाठी गंगेकिनारी सूर्याला अर्ध्य देण्यासाठी पाठवतात. युधिष्ठिर द्यूतात सर्व हरतो.
द्रौपदीला दासी करून भर राजसभेत तिचा अपमान केला जातो. तिला विवस्त्र करून दुर्योधन आपल्या मांडीवर बसवण्याची आज्ञा दुःशासनाला करतो. कितीतरी तीव्र इच्छा असली तरी जीवन कुणालाही कधीच मागे नेता येत नाही. ते दिसेल तसं बघावं लागतं. असेल तसं जगावं लागतं. सभागृहातल्या सर्व सभासदांना ती आक्रोशात हाकारत होती. हंबरड्याच्या आर्ततेने सारेच दचकले पण कोणीही तिच्या याचनेची दखल घेतली नाही. तोच दुर्योधनाचा एक भाऊ विकर्ण उठतो, आपल्यापेक्षा वडील असलेल्या दुःशासनाला अधिकारवाणीने म्हणतो की, "दुःशासना अनेक महाराण्यांनी भूषविलेली ही राजसभा आहे. पांचालीच्या शरीराला स्पर्श करू नकोस." पण विकर्णाला मूर्ख ठरवून, "पांचाली पाच पतींशी रमणारी विलासिनी, कलंकिनी, वारांगना, कुलटा आहे. अशा स्त्रीला पाच पेक्षा एकशे पाच पतीच प्रिय असतात. ती सवस्त्र सभागृहात आली काय आणि विवस्त्र आली काय, सारखीच !" असे विषारी बोल यथेच्छ मद्य प्यालेल्या धुंद मद्यप्यासारखा कर्ण बोलतो. असा हा सूड भावनेनं ग्रासलेला... सदा संभ्रमित असलेला कर्ण. तिथे सर्वांनी शरीराचे डोळे मिटले असावेत पण मनाचे डोळे कसे मिटता आले हा प्रश्न आहे. असो... तिथे श्रीकृष्णाने द्रौपदीची वस्त्र राखली.
झाल्या प्रकारानंतर पांडव वनवासाला निघून गेले. कर्ण दिग्विजयासाठी बाहेर पडतो. सहा महिन्यांनी कर्ण दिग्विजयी योद्धा होऊन परततो. कुरुंच्या राज्याला अफाट कीर्ती मिळवून देतो. पण दुर्योधनाला कर्ण अर्जुनाला मात देईल की नाही ही शंका असते. तसा तो, दुःशासन आणि मामा त्याला मद्य पिऊन चिथवतता. कर्णही मग तेवढ्यात तुमचं समाधान होत नसेल तर मि दानधर्माने माझी पुण्याई वाढवेन असं म्हणून दानशूर होतो. आणि इंद्र ब्राह्मण वेशात येऊन त्याची कवच आणि कुंडले दान म्हणून मागतो. त्याची पूर्वकल्पना असूनही तो ते दान करतो. दुर्योधनाला त्याचा धक्का बसतो. "आता कवच कुंडलाशिवाय कर्ण म्हणजे, फण्याशिवाय भुजंग ! आयाळीशिवाय सिंह! शिखरशिवाय हिमालय ! आता अर्जुनासमोर तू युद्धात कसा काय उभा राहणार ?
तो गुरू द्रोणाकडे त्याला ब्रह्मस्त्र शिक्षा घेण्यास सांगतो. गुरू द्रोण त्याला क्षत्रिय नाही म्हणून ती शिक्षा देत नाहीत. म्हणून तो महेंद्र पर्वतावर निवासीत भगवान परशुराम यांना, मी भृगु कुळातला असून माझं नाव भार्गव आहे असं खोटं बोलून शिक्षा घेत असतो. त्याचदरम्यान तो मृगयेसाठी जंगलात गेला असता त्याच्या अमोघ बाणाने गाय मारली जाते. तेव्हा "योद्धा योद्धा म्हणून गाईवर बाण टाकणाऱ्या अधमा, तुझ्या रथाचं चक्रही ऐन युद्धाच्या वेळी भूमीत रुतून बसेल." असा शाप आपल्या गाईच्या मस्तकात घुसलेल्या बाणाकडे पाहून एक वृद्ध ब्राह्मण त्याला देतो. त्या शापाने सगळं जीवनच कुठेतरी रुतून बसलंय असं त्याला वाटते.
पुढे त्याला सामर्थ्यशाली ब्रह्मस्त्राची विद्याही भगवान परशुराम स्वाधीन करतात. आणि त्याला त्यांच्याबरोबर कलिंग राज्यात येण्यास सांगतात. यावेळेस मात्र त्याला नाकारता येत नाही. वाटेत ऋषींना काही वेळ विश्राम करण्याची इच्छा होते. त्यांच्या मस्तकाखाली आधारासाठी जेव्हा ते पाषाण मागतात तेव्हा कर्ण त्यांचे मस्तक आपल्या मांडीवर ठेवतो. तेव्हा ते त्याला अभिमानानं सांगतात, "भार्गव, हीच तुझी गुरुदक्षिणा मानतो मी ! पण निद्रा पूर्ण झाल्याशिवाय मला उठवू नकोस ! निद्रा आणि वचन कधीच अपूर्ण राहू देऊ नयेत!"
काही क्षणातच एक तीक्ष्ण दाताचा काळा कीटक कर्णाची मांडी करकचून चावू लागतो. निर्धाराने तो सहन करतो, पण उष्ण रक्ताच्या स्पर्शाने ऋषी खडबडून जागे होतात. त्या किटकाने त्याची मांडी पूर्णपणे पोखरून त्याच्या भवीतव्यालाच छिद्र पाडलं होतं. "इतकी सहनशीलता ! तू ब्रह्मकुमार नाहीस. खर बोल तू कोण आहेस ?" तेव्हा कर्ण आपली ओळख देतो सुतपुत्र कर्ण म्हणून... आणि असत्य बोलून विद्या घेतली म्हणून भगवान परशुराम त्याला म्हणतात, "लक्षात ठेव असत्य हे असत्यच ! ज्या ब्रह्मस्त्रासाठी तुला, मला ही असत्य सांगण्याची दुर्बुद्धी झाली ते ब्रह्मस्त्र तुला ऐन युद्धप्रसंगी स्मरणार नाही." नियतीचा खेळ कसा असतो ! कीटकाच्या रुपानं त्यानं कर्णाच्या दिग्विजयला, दानशूरत्वाला पोखरलं होतं. शापित विद्या आणि भग्न हृदय घेऊन कर्ण हस्तिनापुरात परततो.
पांडवांकडून संधीचा प्रस्ताव घेऊन श्रीकृष्ण हस्तिनापुरात येतो. त्याआधीच कर्ण दुर्योधनाला तो प्रस्ताव अस्वीकार करून पांडवांना युद्धाचं आमंत्रण देण्यास सांग अशी इच्छा प्रकट करतो. श्रीकृष्ण येऊन पांडवांना अर्ध राज्य देऊन भावीतव्यातील विध्वंसाचा विराट वणवा विझवून टाक असा प्रस्ताव मांडतो. पण पांडवांना अर्ध काय पण सुईच्या अग्रावर थरथरत राहणाऱ्या धुळीकना एवढेही राज्य, कधीच युध्दाशिवाय मिळणार नाही, असे दुर्योधन ठणकावून सांगतो. आणि कृष्णाचा भर सभेत अपमान करतो.
युद्ध ! युद्धानं कुणाचेही प्रश्न मिटणार नाहीत. युद्ध हा मानवी कौर्य उखडून काढण्यासाठी योजावा लागणारा, पण तेवढाच कठोर अंतिम उपाय आहे. असं म्हणून या युद्धात मी शस्त्र उचलणार नाही असा पण घेऊन श्रीकृष्ण तिथून कर्णाला घेऊन जातो. कर्ण कोण आहे हे त्याला सांगून तू पांडवांचा जेष्ठ भाऊ या नात्याने पांडवाकडे ये, म्हणजे युद्ध होणार नाही असे सांगतो. कौरवांच्या अन्यायी पक्षाला साथ देऊन पूर्ण आर्यावर्ताला युद्धाच्या खाईत लोटण्यासाठी, खोट्या आदर्शाना स्वतः जळून इतरांना दग्ध करण्यासाठी, तेजाचा पुत्र असून अंधारात अंत पावण्यासाठी नकार देऊ नये असे श्रीकृष्णाला वाटत होते पण व्यर्थ. धुळीत पडला तरी हिरा काही काळ्या अंधाराची किरणं परिवर्तित करत नाही याची कर्णाला खात्री असते.
जेव्हा कुंती कर्णाला भेटण्यासाठी येते आणि त्याला सोबत येण्यासाठी म्हणते, तेव्हाही तो त्याच मतावर ठाम राहतो. शेवटी कुंती त्याला म्हणते की माझ्या पाच पुत्रांना अभय दे ! कर्ण म्हणतो की, "मी युद्धात अर्जुनाशिवाय कुणालाच वधनार नाही. अर्जुन मारला गेला तर मला धरून तुझे पाच पुत्र राहतील आणि मी मारला गेलो तर तुझे पाच पुत्र तसेच सुरक्षित राहतील. हे अभय नाही, दान नाही, वचन आहे." विश्वाच्या या अफाट पसाऱ्यात कोण कुणाला आणि कसलं दान करू शकणार ?
युद्धात श्रीकृष्ण कौरवांच्या बाजूने असावाच अशी कर्णाची इच्छा असते. त्यासाठी तो दुर्योधनाला मथुरेस पाठवतो. पण त्याचा राजकीय धुर्तपणा ओळखून श्रीकृष्ण दुर्योधनाला मोहवीत करणारा प्रश्न करतो. "एकीकडे निःशस्त्र मी आणि दुसरीकडे सशस्त्र अशी बलदंड सैनिक योद्धयांची सात अक्षौहिनी सेना यापैकी काय पाहिजे तुला ?" कर्णाच्या सर्व सूचना दूर करून शेवटी दुर्योधन यादवसेना स्वीकारतो. पुढे जाऊन सेनापती पदासाठी कर्ण स्वतः भीष्म पितामह यांना सेनापती करण्याचा आग्रह करतो. कर्ण हा जेष्ठ पांडुपुत्र आहे हे भीष्मांना माहीत असल्यामुळे त्याने युद्धात भाग घेऊ नये म्हणून तो दिग्विजयी योद्धा असूनही त्याला अर्धरथी म्हणून सर्वात शेवटचे स्थान देतात. कर्णाला ती गोष्ट खटकते आणि जोपर्यंत भीष्म पितामह रणांगणावर आहेत तोपर्यंत मी युद्धात भाग घेणार नाही असे सांगून युध्दाबाहेर राहतो.
युद्ध सुरू होऊन नऊ दिवस झाले होते. प्रेतांचे ढिगारे हिमालयाची उंची मोजू लागले होते. बऱ्याच सैन्य रचना आखून हाणून पडल्या होत्या. युद्ध सुरू झाल्यापासून दहाव्या दिवशी पितामह भीष्म पडतात. इच्छामरण असलेल्या भीष्मांना, शिखंडीला पुढं घालून अर्जुन बाण शय्येवर पाडतो. कर्ण त्यांना भेटण्यासाठी जातो. पितामह त्याला त्याच्या जीवनाचे सत्य सांगून पांडवांकडे जाण्यास सांगतात. " माझ्या मृत्यूबरोबरच हा वैरत्वाचा विनाशी वणवा विझू दे ! तू गेलास की दुर्योधन प्रत्यंचा तुटलेल्या धनुष्यासारखा निष्प्रभ होईल. लक्ष लक्ष योध्यांचे अकारण प्राण वेचणारं हे महायुद्ध इथेच थांबेल." पण कर्ण त्यांना म्हणतो, "माझा मार्ग चुकला आहे, आता तो तसाच चालत जाणं याशिवाय माझ्या हाती काही नाही."
कर्णाने श्रीकृष्णाला नकार दिला, राजमातेला परत पाठवलं, पितामहांची अंतिम इच्छा दूर सारून तो रणांगणात उतरतो. पितामह बाजूला झाल्यावर युद्धात नियम वैगरे काही राहत नाहीत. दिवस रात्र फक्त संग्राम. चक्रव्यूहात सापडलेल्या अभिमन्यूवर कर्णासहित सहा महारथी एकाच वेळी चालून जातात. त्यात जयद्रताच्या कौर्याचा वृत्तांत अर्जुनाला कळताच, तो त्याला सूर्यास्तापूर्वी मारण्याची नाहीतर स्वतः अग्निप्रवेश करण्याची प्रतिज्ञा करतो. खग्रास सुर्यग्रहनाच्या साहाय्याने अर्जुन त्याला कंठस्नान घालतो.
घटोत्कच कौरव सेनेत हाहाकार माजवतो. चिंताक्रांत दुर्योधनाच्या सांगण्यावरून कर्णाजवळ असलेले एकमेव वैजयंती अस्त्र भीमपुत्र घटोत्कचावर चालवून त्याचा वध करतो. आणि कर्णाचं जीवन अक्षरशः रित्या भात्यासारखं होतं.
अफाट सेनेतील गर्जनारं युद्ध म्हणजे गुरू द्रोण. अश्वत्थामा नावाचा हत्ती पडल्यावर, फक्त अश्वस्थामा पडला याची युधिष्ठिर ग्वाही देतो. आणि पुत्रवियोगाच्या दुःखाने ध्यान धरलेल्या गुरू द्रोण यांचे मस्तक धृष्टद्युम्न धडावेगळे करतो. कौरावांचे सेनापती गुरू द्रोण आता राहिले नसताना, युद्धाच्या सोळाव्या दिवशी दुर्योधन कर्णाला सेनापती करतो. घनघोर युद्ध चालते. भीम प्रतिज्ञेप्रमाणे पांचालीच्या पवित्र प्रावरणाला स्पर्श करणारा हात उखडून टाकतो आणि दुःशासनासा वध करतो.
भीम, कर्ण, अर्जुन या तिघांनीच लाखो योद्धे यमसदनाला धाडले होते. कर्ण सर्वांना नमवून शेवटी अर्जुना समोर जातो. पुढे चिखलाची दलदल पाहता कुशल शल्य जो कर्णाचा त्या वेळी सारथी होता तो म्हणतो की, "राधेया, आजचा दिवस अर्जुनाशी युद्ध करण्यासारखा नाही ! या दलदलीत रथ घालण्यात धोका आहे. पण कर्ण त्याचे ऐकत नाही. कर्ण आणि अर्जुनाचा सर्वसंहाराक संग्राम चालू होतो. त्या संग्रामात दोन्ही सेना ग्रीष्मात विताळणाऱ्या हिमालयासारख्या क्षीण होऊ लागतात. सोळा दिवसात झालेल्या युध्दापेक्षा त्यांचं एक दिवसाच युद्ध कुरुक्षेत्रालाही पाहवत नव्हतं. ते धर्मक्षेत्रही भेदरलं होतं.
तोच पुढे येऊ पाहनाच्या कर्णाच्या रथाचे डावे चक्र जमिनीत रुतून बसतं. मावळतीस क्षितिजाजवळ जाणाऱ्या सुर्यासारखा कर्ण त्या रथाचे चक्र बाहेर काढण्यासाठी खाली उतरतो. त्याला निःशस्त्र पाहून त्यावर शस्त्रफेक कशी करायची म्हणून अर्जुन आपलं गांडीव धनुष्य खाली घेतो. पण श्रीकृष्ण अर्जुनाला त्यावर अर्धचंद्राकृती अंजलीक बाण मारण्यास सांगतो. जेव्हा अर्जुन बाण मारण्यासाठी धनुष्य उचलतो तेव्हा कर्ण त्याला म्हणतो, " निःशस्त्र पदस्थावर शस्त्र फेकण हा युद्धधर्म नाही." तेव्हा कृष्ण म्हणतो " धर्म ! राधेया, धर्माचा अर्थ तुला माहीत तरी आहे काय ? सुतपुत्रा, कुरुंच्या प्राचीन सभागृहात पांचालीला वारांगना म्हणताना तुझा हा दिव्यधर्म कुठे गेला होता ? पाचही पुत्रांसह वनात अनवाणी जाणाऱ्या कुंतीदेवीला पाहताना तुझा धर्म कुठं लपला होता ? लाक्षागृहात पांडवांची राख झाली ही वार्ता ऐकताना तुझा धर्म आक्रोशला नाही ? सोळा वर्षाच्या कोवळ्या अभिमन्यूला तुम्ही सहजणांनी घेतलात तेव्हा तुला तुझा आठवणारा धर्म का आठवला नाही ? अर्जुना, वेध साध "
आणि अर्जुनाच्या धनुष्यातून झंकारात निघालेला सुसाट अंजलीक बाण त्याच्या भरगच्च कंठाचा भेद करून त्याच्या कंठात रुतून बसतो. त्या शेवटच्या क्षणी मरणाआधी सुद्धा तो एक वृद्ध याचकला, त्याच्याजवळ काही नसल्याने त्यावेळी आपले सोन्याचे दात पाडून चित्रसेनाला देण्यास सांगतो. मरणाच्या दारातील ते त्याचं शेवटचं दान ठरतं.
#कुरुक्षेत्र #धर्मयुद्ध
कुरुक्षेत्रावरच्या महासंग्रामात असंख्य जीवांच्या जीवनाचं द्यूत खेळलं गेलं. तो एक जीवनयज्ञच होता. त्या कुरुक्षेत्रावरच्या मातीत काय काय म्हणून निर्माण होऊन वाढलं नाही ? दुर्योधनाची राजनीती, अश्वत्थाम्याच्या आत्म्याचं सखोल तत्वज्ञान, शकुनी मामाचं कपट, दुःशासनाचा अविचार, भीष्म पितामहांची विवश तटस्थता, गुरू द्रोणांची सामाजिक आदर्शाची भ्रांत कल्पना, महाराज धृतराष्ट्राच्या अंध डोळ्यांआड लपलेला डोळस स्वार्थ, विदुरांचा अयशस्वी संन्यास, कर्णाचा जीवनभराचा संभ्रम, पांडवांच कर्णाविषयी अज्ञान, राजमाता कुंतीचं हृदय पिळवटनारं दुःख, गांधारीने ठरवून मिटलेले नेत्र, कुरुंच्या आणि पांडवांच्या सेनांतून शस्त्र हाती घेऊन उभ्या ठाकलेल्या प्रत्येक सैनिकाची असीम राजनिष्ठा, मित्रनिष्ठा वा तत्वनिष्ठा, श्रीकृष्णातून प्रकट पावलेलं अद्वितीय क्षात्रतेज हे सर्व त्या मातीतूनच वाढलं होतं.
कर्णाचा पराक्रम मोठा होता, त्याग मोठा होता, त्याची लोकप्रियता मोठी होती आणि या सर्वांहून त्याची सुर्याराधना मोठी होती. पण, पण पांचालीच्या धवल पवित्र्यावर त्यानं भरसभेत उडविलेल्या राळीत ते सर्व माखून गेलं होतं. दुर्योधनामुळे नव्हे तर पांचालीमुळेच कर्णाचं जीवन खऱ्या अर्थानं अनुकंपनिय झालं होतं. मानवतेचा अपमान एक वेळ क्षम्य ठरू शकतो पण ज्या स्त्रीच्या कुशीतून मानवता जन्म घेते त्या स्त्रीत्वाचा एवढा निर्घृण अवमान कधीच क्षम्य नसतो. ज्या समाजात आणि राष्ट्रात स्त्रीत्व लज्जित होतं तो समाज आणि ते राष्ट्र विनाशाच्या खोल गर्तेच्या काठावर आपसूक जाऊ शकतं. भरसभेत पांचालीची विटंबना करून ओढवून घेतलेलं पाप हे क्षम्य नव्हतंच.
हे धर्मयुद्ध होतं अखिल मानवजातीसाठी, शरीरा शरीरांचे विविधढंगी आणि अगणित कुंभ धारण करून राहणाऱ्या अमर आत्मतत्वासाठी.
Vinietaa Chandorkarसध्या शिवाजी सावंत यांचे मत्युंजय पुन्हा वाचायला घेतले आहे... लहानपणी त्याचे उतारे च्या उतारे पाठ होते..आज मात्र अर्था कडे लक्ष जातं आहे... स्वतः च्या शोधाची ही कथा आहे.. मी कोण हा शोध कळत नकळत आपण करत असतो... म्हणून कर्णाशी जोडले जातो असं मला वाटतं..।
गौसीम राजामला खिळवून ठेवलेली कादंबरी `मृत्युंजय`
बोम्बल्या फकीरलेखकाचं महत्व किती आहे एखाद्या ऐतिहासिक व्यक्तिरेखेत हे या कादंबरीनं अधोरेखित केलं :)
महाभारत आणि कर्ण हे समीकरण माहिती नसणाऱ्या कित्त्येकांचा कर्ण हिरो बनतो हे पुस्तक वाचून.
अफाटच लिखाण केलंय शिवाजीराव सावंतांनी.
Parag Jagtap या कांदबरी पासुनच मला वाचनाची आवड निर्माण झाली...
Yogesh Malkhede ह्या पुस्तकातुन रंगविलेला कर्ण आणि आता पर्यंत सेरिअल च्या माध्यमातून दाखविलेला कर्ण ह्यात खूप फरक आहे.. उपेक्षित पणा काय असतो आणि आलेल्या कुठल्याही परिस्थिती मध्ये संकटाना धैर्याने कसे सामोरे जायचे आणि आपल्या दिलेल्या शब्दांना, मूल्याना कसे निभवायचे ह्याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे कर्ण... मैत्रीची परिभाषा एक उच्च स्थरावर नेऊन ठेवणारा महान योद्धा म्हणजे कर्ण...
Mahendra Kasode सुंदर आहे .
Sagar Salunke बरीचशी पुस्तके अशी असतात की, एकदा वाचायला सुरुवात केली की वाचतचं बसावं..
हे त्यातलंच एक .
प्रसाद चौगुलेवाचनाचं वेड लावणारी कादंबरी...👌
सुनिल शांताबाई सूर्यवंशी असे पुस्तक होणे नाहिच् !!
Kiran Pagar खुपच सुंदर पुस्तक आहे .
Samir Yadav अतिशय... छान पुस्तक आहे.
Sharad Patil भाऊ असावा तर शोण सारखा , आई असावी तर राधेमाते सारखी आणी मित्र असावा तर कर्ण सारखा खूप काही सांगून जातात ही व्यक्ति चित्र.
Sagar Kadam आज मृत्युंजय ही कादंबरी वाचून हातावेगळी करतोय. सर्वप्रथम इतकी रोमहर्षक साहित्यकृती घडविणाऱ्या शिल्पकाराला प्रा. शिवाजी सावंतांना हे अक्षय दान पदरात टाकण्यासाठी शतशः धन्यवाद!! आपल्या सिद्धहस्त लेखणीने हजारो वर्षांपूर्वीचा इतिहास आम्हाला डोळ्यांसमोर घडतो आहे असा जिवंत करुन त्यांनी दाखविला.
आता कादंबरीतुन डोक्यात शिरलेल विचारांच अन प्रश्नांच वादळ काही शमायच नाव घेत नाहीये. कर्ण म्हणजे नियतीन अट्टहासाने छळन्यासाठीच बनविला होता काय असा प्रश्न पडतो? अन या प्रश्नाला काही उपपश्नांची जंत्री बळकटी देते. जसे, साऱ्या जगाला प्रकाश देणाऱ्या सूर्यदेवाचा पुत्र आपल्या जन्मदात्या पित्याच नाव न समजता अंधाराच का जगला? कवचकुण्डलं जर काढुनच घ्यायची होती तर मग आयुष्यभर त्यांचं ओझ वागवायला त्याला का दिली होती? त्याने चुकून केलेला आवाजाचा लक्ष्यभेद शाप बनून त्याच्याच जिव्हारी का लागावा? दोन वर्षे अखंड सेवा करुन मिळवलेल ब्रम्हास्त्र दोन घटकांमध्ये शापदग्ध व्हाव? अखंड आर्यावर्तात ज्याच्या विजयांचे वारु चौखुर उधळले त्याला पितामह भीष्मांनी अर्धरती का म्हणून म्हणांव? बर, आपला आजन्म शत्रु असलेल्या अर्जुनाला मारण्यासाठी ठेवलेल वैजयंती अस्त्र देखील कुरुंच्या रक्षणासाठी करूंनी दान म्हणून मागव? जीने आयुष्यभर मौन धारण केल ती कुंती , आपल्या पुत्रांच जीवनदान मागण्यासाठी याचक बनून त्याच्याकडे गेली... तिने कर्णाच्या जीवनदानासाठी कृष्णाकडे का नाही दान मागितल?
या प्रश्नांना काही आध्यात्मिक, राजकीय किंवा तार्किक उत्तरं असतीलही पण या प्रश्नांनी कर्णाचा आयुष्यभर छळ केला हे सत्य आहे. काहीही असो, हे महारथी कर्णा तू महान होतास..शतशः प्रणाम आहेत तुझ्या सहनशक्तिला, संयमाला ; तुझ्या उदात्त, धीरोदात्त अन महापराक्रमी मनाला.. आयुष्यभर संकटांच ग्रहण तुझ्याभोवती कडं करुन होतं पण तू तुझं तेज ढळू दिलं नाहीस...मग जेव्हा देवाधिदेव इंद्र याचक बनून कवचकुण्डलांचं दान मागायला आला तेव्हाही अन श्रीकृष्णाने तुला तुझ्या जीवनाच कटु सत्य सांगितल्यावरही...
असो, माझ्यासाठी मृत्युंजय म्हणजे अखंड वादळात लाटांच्या थप्पडा खात निर्धाराने, स्वतःच तेजोहरण न होऊ देता आपली होडी वल्हवणाऱ्या एका महान नायकाची गौरवगाथा आहे. जर महाभारत ही नियतीच्या आणि कर्मगतीच्या चक्रात सापडलेल्या महान अशा योग्यतेच्या मानवाची कथा असेल तर कर्ण हा त्या कथेचा निर्विवाद महानायक आहे!!
जेव्हा जेव्हा आयुष्यात संयम, कुचंबना आणि धैर्याची परीक्षा घेणारे प्रसंग येतील तेव्हा तेव्हा शिवाजी सावंतांचा हा कर्ण वाचकांच्या डोळ्यांसमोर ऊभा राहील हे मात्र नक्की.
जयतु कर्ण!! जयतु कर्ण!! जयतु कर्ण!!
Sudhir Modak हि कादंबरी महाभारतातील कर्णाच्या जीवनावर आधारित आहे. अप्रतिम आहे आणि अत्यंत लोकप्रिय आहे.
Shuchita Nandapurkar Phadke My all time favourite
Yogini Kulkarni Deshpande Khup Chan pustak
Prasad Vichare sunder pustak
Ashwini Pendharkarअतिशय सुंदर पुस्तक वाचनीय.
Yuvraj Hanchanale खूपच छान आहे। वाचताना प्रत्यक्ष अनुभवत असल्याची प्रचिती येते। शिवाजी सावंत, he is great!
Palikchand Bisane पानापानात सुविचार रसग्रहण अप्रतिम...
Abhi Kamble AK maze aawadte pustak...
Kishor Khuspe मस्त
Parag Jagtapमला हवं होतं दानशूर कर्णाची जिवंत अशी कांदबरी मृत्युंजय .आता ही मिळतात बाजारात नवीन आवृत्ती असलेली पण दुर्मिळ अस काही असत शिवाजी सावंत यांच्या लेखनिनी पावन झालेली आणि दीनानाथ दलाल यांच्या चित्रांनी जिवंत पणा आणलेली ही मृत्युंजय म्हणजे न्यानपीठ पुरस्काराला ही लाजवेल अशी आहे..माझी कांदबरी वाचण्याची ची आवड या पासूनच झाली आज माझ्या संग्रही आहे हे भाग्य..पुस्तक त्यामधील जिंवत पात्रे..
Priydarshani KalambeMazzhi aavdate pustak
Digvijay Sulochana Yadaorao More मस्त
Ashwini Pendharkarअतिशय सुंदर पुस्तक वाचनीय, जरूर वाचा.
Vrushali Borawakemilestone पुस्तक आहे हे.
R B Patilछान पुस्तक.
Omkar DevasthaliRead it four times. Everytime discovered a new aspect of karna`s life.
Ashwini Honrao Dudwadkar My all time favourite.....
Virochan Prabhuबऱ्याच वर्षांपूर्वी .... म्हणजे कॉलेजात असताना हि कांदबरी वाचली होती .... त्यामुळे सगळंच काही आठवत नाही पण माझाही परिस्थिती हि तुमच्यासारखीच झाली होती ... इतके सगळे भोगणाऱ्या कर्णाला योग्य न्याय का बरे नसेल मिळाला हा प्रश्न तेव्हा पडला होता , पण आज त्याचा विचार करताना वाटत कि ज्या रंगाच्या चष्म्यातून जग बघायला जाल त्या रंगाचे जग दिसेल .
प्रत्येक व्यक्तीला स्वतःची अशी एक बाजू असते आणि त्या बाजूने तो वावरत असतो त्याच्यासाठी त्याची ती बाजू योग्यच असते ... पण शेवटी समाजाच्या नजरेतून काय योग्य ? एकूणच नीतिमूल्यांच्या मापाने योग्य अयोग्य ठरवले जाऊ शकते असे माझे तरी मत आहे.
Vishakha Kulkarni Mrutyunjay wachtana pratyek patra apanach aslyacha feel yeto...apan tya yugat vavrat ahot...asa bhas hoto,itki hi kadambari vachakala aplasa karun ghete
Pranali Kumavat Khup Chan ahe
कर्ण याच्यासारखे कोणीच नाही
He is great.......
"राधेय" पण खुप छान आहे
त्यात कर्णाचे पूर्ण जीवन आहे
Suraj Sabale खुप छान आहे म्रूत्युंजय.. रणजीत देसाईची `राधेय` पन खुप छान आहे
Sambhaji VaidyaI READ THIS . IT TOUCHES EVERY POINT OF HUMAN LIFE. RELATIONSHIP. POLITICS.KINGDOM, JEALOUSY philosophy. RICHNESS IN HEART,WAR & ITS DISADVANTAGES LARGER THAN LIFE MANS CHARACTER.
Rohini Bangare Khup khup chhan
Rajendra More मला आठवतय मी दहावीत असताना मृत्युंजय वाचताना/ वाचली असताना कर्ण या पाञाने इतका प्रभावीत झालो होतो की मी कर्णासारखे सुर्याकडे पाहत राहण्याचा वेडेपणा काही दिवस करत होतो.वेडेपणाच तो!
Ramdas Karadकर्णाच्या दानशूरत्वाला तोड नाही, एक योद्धा म्हणूननही कर्णाला महाभारतात जोड नाही,
कर्ण हा सत्य होता आणि तो स्वतः म्हणायचा कि सत्याला समर्थनाची गरज नसते,
मिञ असावा कर्णा सारखा, भाऊ असावा कर्णा सारखा, लढाई लढावी ती सुद्धा नितीनं कर्णा सारखी... कर्नाकडे कुठलीही दैवी शक्ती नसताना महाभारतातील पांडव काही दिवस लपून फिरत होते ते फक्त कर्णाच्या भीती पोटी, अनेक उपाधी आणि विशेषणे कर्णाला देता येतील कर्ण स्वतः तितका श्रेष्ठही होता, याउपर त्याच्या एवढं कुणी श्रेष्ठ नाहीच असं मी तरी म्हणेन, ग्रंथराज श्री.शिवाजी सावंत यांनी आपल्या समृद्ध लेखणीतून तेजोस्पर्शी वर्णन कर्णाचे केलं आहे.
Vrushali Borwake म्रुत्युंजय वाचुन हळहळ वाटत राहते कर्णाविषयी.....माझ अस नेहमीच होत, वाचन संपल तरी बराच काळ ती पात्र मनात रुंजी घालतात.
Vishal Dhepe Awesome...Manala sunna karnari
Shruti PawarApratim...vicharmagn karanari
Manohar Khairnarअश्या पित्याला पण गर्व होतो ज्याच्या मुलाच्या दारी याचक म्हणुन स्वर्गपती इंद्र येतो ...मृत्युंजय
Vidya Kamble Khup chan ahe .
Ani mala hi Aathavat nhiye mi ti kiti vel vachali ahe ..
Satish Goreलेखक शिवाजी सावंत यांची महाभारतातील कर्ण या तेजस्वी पात्रावर आधारलेली मृत्युंजय कादंबरी वाचुन हातावेगळी केली. एक प्रकारचा मन सुन्न करुन टाकणारा बधिरपणा मनाला जाणवत आहे. काय वाटतय ते व्यक्त करायला शब्दच सुचत नाही......
Daily Tarun Bharat 8-1-17महाभारत हे महाकाव्य म्हणजेच महर्षी व्यासांनी लिहिलेला ‘जय नावाचा इतिहास!...’ अर्थात भारतीय जनमानसावर असलेला महाभारताचा पगडा पाहता ते एक निव्वळ महाकाव्य आहे की, तो इतिहास आहे, या वादात न पडता, बदलत्या कालखंडात त्या महाकाव्यातील व्यक्तिरेखांचा नव्याने शोध घेणे, हे नव्या पिढीच्या दृष्टिकोनातून अपरिहार्य आहे. थोर कवी राही मासूम रझा यांनी म्हटल्याप्रमाणे ‘सिखकर बिते दिनों से नये युग का करे स्वागत।’ म्हणूनच महारथी कर्णाच्या जीवनाचा वेध घेणारी ‘मृत्युंजय’ ही कादंबरी मराठी साहित्याच्या वाटचालीत महत्त्वाची ठरते. शिवाजी सावंतांची ‘मृत्युंजय’ ही कादंबरी गेली काही शतके अत्यंत लोकप्रिय असलेल्या ‘महाभारत’ या महाकाव्यातील घटनांवर आधारित आहे. मुळात प्रश्न असा पडतो की, हे महाकाव्य इतके लोकप्रिय का?... या संदर्भात जाणकारांची अनेक मते असली तरी शिवाजी सावंतांनीच म्हटल्याप्रमाणे एक प्रमुख कारण म्हणजे ‘जीवन कसं आहे, हे महाभारत सांगतं.’ एकूणच मानवी जगण्यातील गुंतागुंत आणि चांगल्या - वाईट भावनांचं यथार्थ दर्शन या महाकाव्यात होतं. भाबडा ध्येयवाद नसल्याने आयुष्यभर जगण्याची धडपड करणाऱ्या माणसांना ते आपलंसं वाटतं. तसेच राग, लोभ, हेवेदावे, कटकारस्थाने यासारख्या मानवी स्वभावाचे दर्शन त्यात आहे. माणसांच्या जगण्यातील अविभाज्य अशा नैतिकता आणि अनैतिकतेच्या खेळातील नाट्य प्रभावीपणे आलेलं आहे.
‘मृत्युंजय’ या कादंबरीत महाभारतातील एका सुंसस्कृत, सशक्त परंतु घायाळ योद्ध्याची व्यथा, घटनांचा मागोवा घेत समर्थपणे मांडली आहे. कादंबरीच्या सुरुवातीला कर्णाच्या बालपणातील घटना येतात. हस्तिनापूरला धृतराष्ट्र राजाच्या रथाचे सारथ्य करणा-या अधिरथ बाबा, राधामाता आणि बंधू शोण यांच्या घरी अतिशय प्रेमाच्या छायेत कर्ण वाढतो आहे. जन्मत:च असलेल्या कुंडलांमुळे त्याचे वेगळेपण उठून दिसते.
पहिले स्वगत संपते. कॅलिडोस्कोप फिरतो. दुसरी व्यक्तिरेखा! तिचे भिन्न आयुष्य! जगाला तिचं वैभव दिसतं; पण आयुष्यभर वाहणारी उरातील जखम दिसत नाही. राजमाता कुंतीचं निवेदन सुरू होतं.... राजघराण्यात हिचं आयुष्य गेलं. ‘तू वीरांची जननी होशील’ ही दुर्वास ऋाषींची उक्तीदेखील खरी ठरली. कुंतीच्या प्रारब्धात ऐश्वर्य आहे; परंतु समोर सामाजिक संकेताचा एक झिरमिरीत पडदादेखील आहे. हा तलम पडदा तिला तिच्या ज्येष्ठ पुत्रापासून दूर ठेवतो आहे. सामाजिक बंधनांपुढे तिचे मातृत्व हतबल आहे. एका कुमारी मातेची ही व्यथा कादंबरीत अतिशय तरलपणे येते.
महाभारतातील योद्ध्याची कथा ‘मृत्युंजय’ या कादंबरीत अतिशय प्रभावीपणे येते. कादंबरीची आलंकारिक भाषा वाचकाला मोहवते. या कथानकाच्या निमित्ताने व्यक्तिरेखांनी केलेलं चिंतन ही खूप मोठी जमेची बाजू.
साहित्यिक शिवाजी सावंत यांच्या ‘मृत्युंजय’ या कादंबरीने मराठी साहित्यविश्वातील अनेक विक्रम मोडले. मराठी भाषेत मैलाचा दगड ठरलेल्या या कादंबरीला अनेक पुरस्कार तर मिळालेच; परंतु साहित्याच्या नोबेल पुरस्कारासाठी १९९० साली या कादंबरीचं नामांकन झालं होतं, ही गोष्ट मराठी साहित्याला अभिमानास्पद आहे. अनेक भारतीय भाषांमध्ये या कादंबरीचा अनुवाद झाला आहे. गेली पन्नास वर्षे या कादंबरीवर वाचकांनी प्रेम केलं. भविष्यात देखील असेच प्रेम लाभो, हीच सदिच्छा!
sanjay kharatGood
asmita lavu gaykar
mrutunjay marathi book
sayali desaiThe best book ever. And the best person too....