- Prajakta Wagh
महाश्वेता कादंबरी आजच वाचून पूर्ण झाली. कादंबरीचे reviews या ग्रुपवर वाचलेले होते, त्यामुळे त्याचवेळी ठरवलं होतं ही कादंबरी वाचायची. सुधा मूर्ती लिखित ही कादंबरी खूप आवडली, अणि मनाला पण भावली. लेखिकेने कथेच खूप छान सादरीकरण केलेले आहे अणि लिखाणच कौशल्य पण खूप छान आहे.
मला वाचताना कुठेच कंटाळा नाही आला. प्रत्येक वेळी उत्कंठा होती की पुढे काय असेल.
ही कादंबरी वाचून सुधा मूर्ती यांच्या अजून कादंबरी व कथा वाचायला नक्की आवडतील.
- Pawan Chandak
खूप दिवसापासून बहुप्रतिक्षित अशी अनेक मित्रांकडून ऐकलेली पण आजवर न वाचलेली अशी सुधा मूर्ती लिखित व उमा कुलकर्णी अनुवादित अप्रतिम कादंबरी `महाश्वेता` एका बैठकीतच वाचून झाली.
ही कादंबरी वाचल्यावर एक पुरुष म्हणून मला वारंवार काही प्रश्न पडले, मला वाटते ती प्रतिक्रिया या लिहीत आहे.
तुमच्या दृष्टीने सौंदर्य म्हणजे काय ?
संपूर्ण कादंबरी याच प्रश्नावर आणि त्याच्या उत्तरावर केंद्रित आहे असे मला वाटते आणि मला त्यातील आवडलेले काही संदर्भ येथे देत आहे
सृष्टीच सौंदर्याचा गुरु, माता ! किती प्रकारची फुलं निसर्गात फुलत असतात ! मानवाच्या कल्पनेतही येणार नाहीत इतक्या विविध रंगांची उधळण असते. किती विविध, मनाला खेचून घेणारे आकार ! निळ्या आकाशात पांढर्या शुभ्र ढगांची मनमोहक नृत्य! पावसाळ्यात सर्वत्र हिरव्या विविध रंगाची छटा ! त्यात सुंदर पशू-पक्षी-फुलपाखरे, कीटक, सगळेच माणसांच्या दृष्टीने कल्पनातीत आहे
मानव स्वतःला सौंदर्याचा उपासक मानून नटतो, पण मानवी सौंदर्य तारुण्य काळाशी सीमित आहे. भर तारुण्यात सौंदर्याच्या मस्तीत वावरणारे आणि तारुण्य सरलं की पडलेले दात, पांढरे केस, सुरकुतलेली कातडी, ओसरलेला बांधा यामुळे सौंदर्यविहिन होऊन जातात.
माणसांचं सौंदर्य त्याच्या रूपापेक्षा गुणांवर अवलंबून असतं. कुठे आणि कसे जन्मयचं, हे कुठे आपल्या हातात आहे ? तसेच गोरा रंग आणि रूप हे आपल्या हातात नाही. मग शुद्ध निष्कल्मश मन आपल्याकडे असले पाहिजे.
कथेतील नायिका अनुपमा - एक सर्वसामान्य कुटुंबातील गरीब शाळा मास्तरांची विद्याविभूषित व नाटक अभियानात तज्ञ.
तर या कथेतील डॉक्टर आनंद सौदर्योपासक, घरंदाज कुटुंबातील असा हा लक्ष्मीपुत्र.
एका नाटकात अनुपमा व आनंदाची भेट होते तिच्या सौंदर्यावर भाळून आनंद अनुपमा कडे लग्नाची मागणी घालतो. पुढे त्या दोघांचे लग्न थाटात उरकून तिला घरी आणून काही दिवसांनी उच्च शिक्षणासाठी आनंद अनुपमेला सासूबाई राधक्का कडे सोपवून लंडनला रवाना होतो. राधक्का म्हणजे जुन्या विचारांच्या घरंदाज, कर्मकांडात रमणारी स्त्री.
दुर्देवाने काही महिन्यातच अनुपमा च्या अंगावर पांढरे डाग उमटू लागतात. आजवर अनुपमाची तिचे `सौंदर्य` हाच गुण मांडल्या गेलेल्या त्या घरात अंगावरील कोड यामुळे तिची ओळखच मिटवून टाकली जाते. तिला आलेल्या पांढ-या डागाला घाबरून कीळसून तिच्या सासरच्या लोकांनी तिला घराबाहेर हाकलून अर्थात बहिष्कृत करून टाकतात.
पुढे ती माहेरी आल्यावर देखील तिची अशाच प्रकारे कुचंबणा होत राहते, घरी येणाऱ्या प्रत्येक दुःख, चढ उत्तरास, अडचणींसाठी तिलाच जबाबदार धरले जाते. पुढे तिची अशी अवस्था होते की समाजात पावलोपावली केवळ त्या पांढऱ्या डागामुळे होणाऱ्या अपमान, कुचुंबना यामुळे तिला जगावे की मरावे असा विचार येतो.
पण ती जगण्यास प्राधान्य देते आणि अर्थपूर्ण व स्वावलंबी जगण्यासाठी मुंबईत येते. ती स्वतःच्या मेहनतीवर आणि कौशल्यावर, ज्ञानावर आपले स्वतंत्र अवकाश उभारते. स्वतःच्या शिक्षणाचा आधार घेऊन ती आयुष्यात पुन्हा उभी राहते तसेच स्वतःच्या पायावर व समर्थपणे स्वतःची मित्र-मैत्रिणींचे विश्व निर्माण करते.
या संपूर्ण परिस्थितीमध्ये केवळ तिच्या अंगावर पांढरे डाग आहे म्हणून तिच्या सासू, सासरच्यांनी तिला घराबाहेर काढले नाही तितका तिला दोष दिला. इतकेच नाही तर तिचा नवरा आनंद देखील तिला स्वीकारत नाही, तिने लंडनला त्याला पाठवलेल्या पत्राचे उत्तर न देता केवळ त्या क्षुल्लक पांढऱ्या डागामुळे तिला स्वीकारत नाही.
या परिस्थितीमध्ये असेच एकदा काही काळानंतर आनंद आतल्याआत तडफडू लागतो की "तिच्या ऐवजी जर आपल्याला कोड फुटलं असतं, तर तिने देखील आपल्याला असं टाकून दिलं असतं का ? काय असते या वास्तवातील तडफड ?
काय असू शकते अशा गोष्टींचा शेवट ?
या कादंबरीत मला आवडलेले पात्र म्हणजे डॉ वसंत.
डॉ वसंत तिच्या कोडा सकट तिला स्वीकारायला तयार असूनही नवरा, प्रेम संसार निरर्थक वाटुन आधुनिक सुसंस्कृत, तडफदार नायीका साकारण्यात ती यशस्वी होते. या पुस्तकात कर्नाटक संगीत, यक्षगान, संस्कृत साहित्यातील विविध संदर्भ यामुळे या कादंबरीची कलात्मक मूल्य वाढले आहे असे मला वाटते.
आनंदला होणारी वास्तवातील तडफड,अनुपमानी स्वतःच्या मेहनतीवर उभारलेले स्वतंत्र आकाश ही सर्व परिस्थिती सुधा मूर्तींनी आपल्या लिखाणातून अप्रतिम मांडली आहे. या कादंबरीत पारंपारिक वातावरणातून आलेल्या व आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या संकटांनी घेरलेल्या तरुणीला वास्तवाचे यथोचित भान देऊन, स्वतःच्या आयुष्याला समर्थपणे आकार देण्याइतकं सक्षम केले आहे.
या लिखाणातून लेखिकेचे प्रगल्भ विचार व आधुनिक जीवनाशी समन्वय साधणारी दृष्टी यामुळे या कादंबरीला घनता प्राप्त झाले आहे.
मी काही सांगण्यापेक्षा मला वाटते आपल्या सर्वांनाच आत्मचिंतन करायला लावणारी अशी ही महाश्वेता कादंबरी एकदा वाचावी
- विनोद गजानन कारवे
`महाश्वेता` कादंबरीची नायिका अनुपमा सुंदर आहे, अभिजात अभिनयकला तिच्यात आहे, संस्कृत तज्ञ आहे. आर्थिक परिस्थिती बेताची असली तरी संस्कारांनी श्रीमंत आहे. पण दुर्दैवाने लग्नानंतर तिच्या शरीरावर कोड फुटते आणि सासरी व माहेरी, आजारामुळे तिची पुरती ओळख मिटवून टाकली जाते. ही मिटवून टाकलेली ओळख अनुपमा ज्या ताकदीने आयुष्याचा स्वीकार करत पुन्हा मिळवत जाते, त्याची ध्येर्यकथा म्हणजे `महाश्वेता` ही सुधा मूर्ती यांची कादंबरी होय.
कादंबरीची सुरुवात आनंद आणि अनुपमा यांच्या विवाहाने होते. अनुपमा अत्यंत सुंदर, पण एका शाळा मास्तरची मुलगी आणि आनंद अत्यंत हुशार, गर्भश्रीमंत डॉक्टर. विषम आर्थिक परिस्थितींमुळे दोघांचं लग्न होणे कठीण; पण सर्वांचा विरोध असूनही त्यांचं लग्न होतं. तीन महिन्यांनंतर पुढील शिक्षणासाठी आनंद इंग्लंडला रवाना होतो. तो गेल्यावर सर्वस्वी एकट्या अनुपमाला ऐश्वर्याचा गर्व असलेली सासू व नणंद यांच्याकडून मिळणारी वागणूक अपमानाची असते. त्यातच पायावर निखारा पडल्याचे निमित्त होते आणि अनुपमाच्या पायावर पांढरा डाग उमटतो. तो वाढतच जातो नि कोड फुटल्याचे निदान डॉक्टर करतात. त्यामुळे अनुपमाला सासरी तुच्छ लेखले जाऊ लागते. या सगळ्यात तिला आशा असते पती आनंदकडून; पण तिच्या पत्राला आनंदकडून जराही प्रतिसाद मिळत नाही. अनुपमा माहेरी परतते. तिच्या व्यंगामुळे तिच्या बहिणीचे ठरलेले लग्नही मोडते. त्यामुळे वडिल-बहिणही अंतरतात.
सर्वांकडून अपमानित झालेली अनुपमा मुंबईत येते. मैत्रिणीकडे राहून एका कॉलेजात संस्कृत विषयाची प्राध्यापक म्हणून नोकरी करु लागते. हळूहळू अनुपमा स्वतःला सावरून आपलं स्वतंत्र विश्व निर्माण करते आणि इतरांना जगण्याची नवी दिशा देते. पुढे तिला पती आनंद न्यायला येतो, तिची माफी मागतो, तिच्या व्यंगासकट तिला स्वीकारु पाहतो. पण आता कोडाने `महाश्वेता` झालेल्या अनुपमाला ओढ असते ती फक्त तिच्या कलेची, अभिनयाची. घर-संसार यापासून मनाने दूर झालेली अनुपमा आनंदला चांगलंच सुनावते व त्याच्यासोबत जाण्यास नकार देते.
`महाश्वेता` कादंबरीचे प्रत्येक पान आपल्याला बांधून ठेवते. भाषा भारदस्त असून अलंकारिक सुवचने, उपमांचा वापर यांमुळे कादंबरी वाचनीय झालेली आहे. या पुस्तकातील अनुपमा व डॉ. सत्यप्रकाश आणि अनुपमा व आनंद यांच्यातील संवाद केवळ अप्रतिम आहेत.
- श्री. विनोद गजानन कारवे (टिटवाळा)
- Priyanka Shah Sancheti
एका स्त्रीला लग्नानंतर शारिरीक व्यंग उद्भवल्यास त्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन आणि त्याचे भोगावे लागलेले परिणाम व तिने त्याला कसं तोंड दिले... याचे वर्णन.. अप्रतिम कादंबरी...
- Shrijeevan Tondale
कॉम्पुटर सायन्स मध्ये एम.टेक केलेल्या आणि पुणे मध्ये टेल्को कंपनी मध्ये पहिल्या स्री अभियंता म्हणुन निवडल्या गेलेल्या अत्यंत हुशार आणि मनाने,विचाराने आणि रहाणीमानाने ही अत्यंत साध्या असणाऱ्या,प्रत्येक तरुण-तरुणीच्या प्रेरणा स्थानी असणाऱ्या अशा आदरणीय सुधा मूर्ती यांनी लिहून अभिजात केलेली कादंबरी म्हणजे महाश्वेता.
या कादंबरीचा संधर्भ मला त्यांच्या एक पुस्तका मधुन म्हणजेच वाईज अँड अदरवाईज या कादंबरीच्या एका कथेतुन मिळाला ती कथा मी जेव्हा वाचली तेव्हा त्या कथेने माझे मन भरून गेलं आणि त्या कथे मध्ये या महाश्वेता कादंबरीचा उल्लेख आहे. बस मग मनाशी ठरवलं आणि लगेचच दुसऱ्या दिवशी हि कादंबरी वाचायला घेतली.
नुसत्या १५० पानाची ही कादंबरी एका दिवसात वाचुन पूर्ण केली. कादंबरी इतकी जबरदस्त आहे कि कादंबरी हातात घेतली कि हातातून सोडवत नाही.कादंबरीच प्रत्येक पान आपल्याला तिच्या सोबत बांधून ठेवत. कादंबरीच्या मुखपृष्ठावर हातामध्ये पांढरी फुलं घेतलेल्या एका सुंदर मुलीचं चित्र आहे. ती हातामधील फुलाकडे शांतपणे बघत आहे आणि ती मनात कोणत तरी दुःख दाबून धरून आहे. त्या सुंदर मुलीचं सौंदर्य तिच्या हातावर आणि तोंडावर असणाऱ्या कोडाच्या पांढऱ्या डागांनी तिचं सौंदर्य नष्ट केलं आहे.तिला महाश्वेता बनवलं आहे.
कादंबरीची सुरवात आनंद आणि अनुपमा यांच्या प्रेमाने होते, अनुपमा अत्यंत सुंदर पण एका शाळा मास्तर ची मुलगी आणि आनंद अत्यंत हुशार घरंदाज गर्भश्रीमंत डॉक्टर. दोघांचं लग्न होणे अत्यतं कठीण पण सर्वांचा विरोध असुन सुद्धा त्यांचं लग्न होते, आणि मग लग्ना नंतर काही महिन्यात एक अनिष्ट घडत. अंगावर कोड उठणे म्हणजे काय मोठा गुन्हा नाही, आणि त्यामुळे समाजने बहिष्कृत करणे ही त्या समाजाची अंत्यंत लाजिरवाणी गोष्ट. अनुपमाच्या सुखी जीवनात ते वादळ येत त्यात ती बिचारी होरपळून जाते इतकी कि सासर आणि माहेर या दोन्ही मधुन ती परकि होते अगदी तिला बाजूला उचलून फेकून दिलं जाते पण स्वतःला सावरून आपल स्वतंत्र विश्व निर्माण करते. पण ते विश्व निर्माण करताना सुद्धा असंख्य संकटांशी दोन हात करत ती उभी रहाते आणि इतराना जगण्याची नवी दिशा देते.
अनुपमा,आनंद,वसंत,सत्या,डॉली आणि इतर काही कॅरेक्टर्स मध्ये या कादंबरीची कथा खेळत रहाते.सुप्रसिद्ध संस्कृत नाटककार भास यांच्या नाटकावर आधारित या कादंबरीचा विषय आहे. कादंबरी वाचते वेळी आपण कधी कधी स्वतःला आनंदच्या जागी बघतो आणि विचार करतो कि आपण आनंदच्या जागी असतो तर हेच केले असते का...? तर कधी आपण स्वतःला वसंत च्या जागी बघतो आणि विचार करतो कि आपण अनुपमाचा स्वीकार केला असता...?
अंगावर कोड उठणे म्हणजे काय मोठा गुन्हा नाही, आणि त्यामुळे समाजने बहिष्कृत करणे ही त्या समाजाची अंत्यंत लाजिरवाणी गोष्ट. कादंबरीच्या शेवटी नाटकातील एक संवाद दिला आहे तो वाचताना आपण स्वतःच अनुपमा आहोत असा भास होतो.स्वतःला असंख्य प्रश्न करणारी आणि त्याची उत्तरे शोधायला लावणारी अशीही सुधा मूर्ती लिखित कादंबरी महाश्वेता.
कादंबरीचे मराठी अनुवाद खुपचं छान प्रकारे उमा कुलकर्णी यांनी केले आहे. मेहता पब्लिकेशनने कादंबरीचे प्रकाशन केले आहे. वाचनीय आणि विचार करायला आणि नितळ,निपक्ष प्रेम करायला शिकवणारी कादंबरी सुधा मूर्ती लिखित महाश्वेता. प्रत्येकाने जरूर वाचावी अशी हि कादंबरी..
- Sachin Shewale
सकारात्मक प्रेरणादायी पुस्तक
- NEWSPAPER REVIEW
स्वत:च्या आयुष्याला हवा तसा आकार देण्याचे आत्मबळ प्रकट करणारी मनस्विनी...
इन्फोसिस या अग्रगण्य सॉफ्टवेअर कंपनीचे प्रवर्तक नारायण मूर्ती यांच्या पत्नी डॉ.सुधा मूर्ती यांनी कानडी साहित्यात स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. त्यांचा जन्म धारवाडचा. वडील डॉक्टर. माहेरचे आडनाव कुलकर्णी. लहानपणची तीन चार वर्षे त्यांनी कोल्हापूर - कुरुंदवाड मध्ये काढली आहेत. पुढेही टेल्कोमधील नोकरीच्या निमित्ताने आठ वर्षे त्यांचे वास्तव्य पुण्यात होते. पुण्यातच नारायण मूर्ती यांच्याशी स्नेह जुळला आणि पुण्यातच ‘इन्फोसिस’ च्या स्थापनेसाठी त्यांनी आपले दागिनेही दिले.
मातृभाषा कानडी असली तरी मराठी त्यांना चांगली अवगत आहे. परंतु त्यांचे लेखन मूळ कानडीतच होते. कानडी कादंबरीक्षेत्रात एम.के.इंदिरा आणि त्रिवेणी या दोन लेखिका लोकप्रिय गणल्या जातात. त्या मागोमाग आता सुधा मूर्ती यांनी स्थान पटकावले आहे.
डॉलर बहू, महाश्वेता, तुमुला, अहिरीक्ते, अव्यक्ते, यशस्वी, रूना या त्यांच्या कादंबऱ्या व समानयरर्ली असमानयास हा कथासंग्रह याद्वारे त्यांनी समकालीन मध्यमवर्गीय व उच्चभ्रू कुटुंब जीवनातील पडझडीचा वेध वेगवेगळ्या पैलूंमधून घेतला आहे.
‘डॉलर बहू’ या कादंबरीवर तर दूरचित्रवाणीवर एक मालिकाही सादर करण्यात आली. वाईझ अँड अदरवाईझ हा लेखसंग्रहही इंग्रजीत प्रसिद्ध झाला असून, त्यांच्या बहुतेक पुस्तकांची भाषंतरे इंग्रजी व अन्य भाषांमध्ये झालेली आहेत. संगणकाची मूलतत्त्वे, इंटरनेट, ई कॉमर्स यावरील त्यांची पुस्तकेही बेस्ट सेलर ठरली आहेत. इन्फोसिस फाउंडेशनद्वारे त्या लाखो रुपयांचा निधी समाजोपयोगी उपक्रमांसाठी उपलब्ध करून देतात. गाव तेथे ग्रंथालय या उपक्रमाद्वारे कर्नाटकातील शेकडो गावात त्यांनी वाचन संस्कृती परिवर्धित केली आहे.
महाश्वेता या कादंबरीची नायिका अनुपमा ही लग्नानंतर अंगावर पांढरे डाग दिसू लागल्याने ‘सासर’ ला मुकते आणि मुंबईत येऊन स्वावलंबी जीवन निर्धाराने जगते. या नायिकेच्या रूपाने कोडग्रस्त स्त्रीच्या जीवनातील ताणतणाव दाखवण्यात आले आहेतच; पण त्यापेक्षाही अधिक प्रकाशझोत हा अशा व्यक्तींबाबत कुटुंबातील व समाजातील वेगवेगळे घटक जी पूर्वग्रहदूषित दृष्टी दाखवतात तिच्यावर टाकला गेला आहे. जुन्या वळणाची सनातनी सासू आणि ग्रामीण परिसरातील माणसे आजही ‘कोड’ झालेल्या व्यक्तीकडे तुच्छतेने पाहतात. कोड हे आनुवंशिक नव्हे हे लक्षात न घेता कोडग्रस्त व्यक्तीला वाळीत टाकल्यासारखे वागवतात. कोडग्रस्तांना संततीही तशीच होईल असे भय बाळगतात. देवघरात जाण्यास मज्जाव करतात. त्यांच्या हातचे काही खाण्यापिण्याचे टाळतात. जगणे अशक्य करून सोडतात. हे जनमानसातले समज-गैरसमज सुधा मूर्ती यांनी केंद्रीभूत ठेवून अनुपमा या नायिकेची व्यक्तिरेखा उभी केली आहे आणि मुंबईच्या महानगरीत अशा व्यक्तीलाही सन्मानाने जगता येते असे दाखवून, दिलासा दिला आहे.
‘कोड’ वगळले तर अनुपमा ही खरोखर एक सौंदर्यसंपन्न, सुशिक्षित व कार्यक्षम आहे. दिसायला अत्यंत सुंदर, गौरवर्णीय, अभ्यासात हुशार. सर्वांना प्रिय. संस्कृत नाटकांची आवड असणारी. कोणावरही प्रथमदर्शनीच छाप पाडणारी.
तिचे वडील साधे शाळामास्तर. गरीब. घरी सावत्र आई व सावत्र बहीण.
डॉ. आनंद हा गडगंज श्रीमंत तरुण तिला पाहतो आणि तिच्यासाठी वेडा होतो. त्याची आई राधक्का - आणि बहीण गिरिजा - दोघेही आपल्या श्रीमंतीचा दिमाख मिरवणारे. रुपाया नारळावर आपल्या मुलाने एका गरीब मुलीशी लग्न करावे हे त्यांना आरंभी रुचतच नाही; पण मुलाच्या हट्टापुढे त्यांचे काही चालत नाही. गरीब सुनेचा सतत पाणउतारा करण्यातच त्यांना धन्यता वाटते.
डॉ.आनंद लग्नानंतर लगेचच पुढील शिक्षणासाठी इंग्लंडला जातो. अनुपमाला नंतर पाचसहा महिन्यांनी बोलावून घेईन असे म्हणतो. तोपर्यंत सासरी राहण्यावाचून गत्यंतरच नसते. तशात एके दिवशी पायावर निखारा पडून तिला भाजते. जखम बरी होते पण पायावर पांढरा डाग राहतो. तो वाढतच जातो तेव्हा अनुपमा धास्तावते. सासूच्या नकळत त्वचा रोगतज्ज्ञाकडे जाते. ‘हे पांढरे कोडच आहे’ यावर शिक्कामोर्तब होते. उपचार सुरू होतात... एके दिवशी सासू राधक्काच्या लक्षात ते येते आणि तिचा छळ सुरू होतो. लग्नाआधीचाच हा डाग असणार, तू आम्हाला फसवलेस म्हणून दोषारोप सुरू होतात. तिच्या वडलांना तार पाठवून बोलवण्यात येते.‘‘या पांढऱ्या डागाच्या मुलीला आपल्या घरी घेऊन जा’’ असे सांगण्यात येते.
आणि अनुपमाला आपल्या माहेरी परत येणे भाग पडते.
ती नवऱ्याला पत्र लिहिते. पण त्याचे उत्तरच येत नाही.
तिच्या सावत्र बहिणीचे जमत आलेले लग्न तिच्या कोडामुळे मोडते. त्यामुळे तिची सावत्र आईही तिच्यावर रुष्ट असते.
आपण बी. एड. करून शिक्षिका व्हावे असा विचार ती करते. पण सुमन नामक मैत्रिणीच्या सांगण्यावरून ती मुंबईला येते. एका ऑफिसमध्ये ती रिसेप्शनिस्ट म्हणून नोकरीला लागते. मैत्रिणीकडेच काही दिवस राहते. सुमन परगावी गेली असताना तिचा नवरा हरीप्रसाद अनुपमाशी लगट करू पाहतो तेव्हा ती ऑफिसमधल्या डॉली नावाच्या मैत्रिणीच्या घरी पेइंग गेस्ट म्हणून राहू लागते. डॉलीबरोबर तिची आई राहत असते. तेथे राहत असताना एका कॉलेजमध्ये संस्कृतच्या प्राध्यापकाची नोकरी तिला मिळते. डॉली लग्न करून नवऱ्याबरोबर परदेशी जाते; पण आपली जागा अनुपमाला राहण्यासाठी ठेवून जाते. आम्ही परत येईतो तू येथेच राहा असे सांगून जाते.
एकदा अनुपमाला रस्ता क्रॉस करताना टॅक्सीचा धक्का लागतो. पायाला फ्रॅक्चर होते. डॉ. वसंत व डॉ. सत्यप्रकाश हे दोघे तिच्यावर इलाज करतात. त्यांच्याशी तिची घसट वाढते. ते दोघेही अविवाहित असतात... आपल्या खेड्यात जाऊन लोकांना वैद्यकीय सेवा द्यावी असे ध्येयवादी डॉ. वसंताला वाटत असते. तो तिला विचारतो, ‘‘तू माझ्याबरोबर खेड्यात राहू शकशील का?’’ पण ती मला महिनाभर विचार करू दे असे सांगून त्याच्या प्रश्नाचे उत्तर देणे टाळते...
डॉ. आनंद भारतात परत आल्यावर अनुपमाचा शोध घेतो. आई त्याला सांगते, ‘‘कोड बरे झाल्याशिवाय अनुपमाला मी घरात पाऊल टाकू देणार नाही.’’ उलट ती दुसरं लग्न कर म्हणून त्याच्या मागे लागते. पण तो तिला धुडकावून लावतो.
अनुपमाचे वडील बदलून दुसऱ्या गावी जातात. त्यामुळे आनंदला त्यांचा ठावठिकाणा शोधणे अवघड जाते. परंतु तो एका वैद्यकीय परिषदेसाठी मुंबईला येतो तेव्हा एका संस्कृत नाटकात अनुपमाला पाहतो आणि तिला भेटतो. अनुपमाला तो म्हणतो, ‘‘माझं चुकलं असेल तर मला क्षमा कर, जे घडलं ते विसरून जा.’’ तेव्हा अनुपमा त्याला अनेक प्रश्न विचारते. ‘‘मला कोड आलं यात माझा दोष काय? गरिबाघरची मुलगी करून घेऊन तिच्या गरिबीची टर उडवणं यात कुणाची चूक? मला लग्नाआधी कोड नव्हतं हे तुम्हाला ठाऊक होते. पण तुम्ही आईला तसं का नाही कळवलं?’’ त्यावेळी मला आपुलकीच्या दोन शब्दांची गरज होती... मी तुमच्या पत्राची चातकासारखी वाट पहात होते.’’
त्यावर डॉ. आनंद म्हणतो, ‘‘तू म्हणतेस ते खरं आहे. पण आमचाही विचार कर... हा रोग पुढच्या पिढीत आला तर अशी आईला भीती वाटत होती.’’
‘‘पण हे जर लग्नानंतर तुमच्या बाबतीत झालं असतं तर?... केवळ मला कोड आलं म्हणून मी माणूस आहे हेच तुम्ही विसरला... तुम्हाला कोड झाले असते तर मी तुम्हाला अशी वाऱ्यावर सोडून गेले असते का?’’...
डॉ. आनंद तिला पुन्हा आपण एकत्र राहू या असे सुचवतो. तेव्हा मात्र ती त्याला साफ नकार देते. आता मला नवरा, प्रेम, माया, सर्व निरर्थक वाटतं. मला माझ्या जीवनाचं ध्येय गवसलं आहे. मला आता कुठल्याही आधाराच्या काठीची गरज नाही. मुंबईसारख्या महानगरानं मला अपार संरक्षण दिलं आहे. पण सगळ्या महाश्वेतांची परिस्थिती माझ्यासारखी नाही. ज्यासाठी आपण कुठल्याही अर्थी जबाबदार नाही, त्यासाठी परित्यक्तेचं जीवन वाटचाल आल्यामुळे माझं मन आक्रंदून उठतं...’’
आणि ‘परस्त्रीला एकेरी नावानं हाक मारणं योग्य नव्हे’ असे म्हणून ती त्याला धुडकावून लावते.
डॉ. वसंतलाही ती सांगते, ‘‘मला हा संसार, नवरा, घर, मुलं, आई, भावंडं ही सगळी नाती खोटी वाटताहेत. मला संसाराच्या जंजाळात अडकण्याची मुळीच इच्छा नाही... तुम्ही तुमच्या गावी जा... मला मुंबईच प्रिय आहे. इथं केवळ माणुसकीची ओळख पटते. जाती, पंथ, भाषा यापेक्षाही डॉलीनं माझ्यावर विश्वास ठेवला, हे घर माझ्यावर सोपवून ती निघून गेली. हे इतर कुठल्या गावात शक्य आहे?... माझी आवडती शिक्षिकेची नोकरी, माझे विद्यार्थी, माझी आवडती रंगभूमी... माझा हाच स्वर्ग आहे... मी फार पुढचा विचारच करीत नाही... आपल्या दोघांमधला स्नेह लग्नात रूपांतरित होऊन संपून जायला नको...’’
अनुपमा आपल्या महाविद्यालयीन जगात व नाटकाच्या जगात आपलं सर्वस्व गवसल्याप्रमाणे रमण्याचा निर्धार प्रकट करून स्वत:च्या संसाराची कल्पना फेटाळून लावते.
...सुधा मूर्ती यांनी अनुपमाच्या रूपाने एका आत्मनिर्भर, सत्वशील मानिनीची व्यक्तिरेखा पेश केली आहे. कोड झाल्यामुळे ती पती, सासर, यांना दुरावते... तरीही ती स्वत:च्या जीवनाचा मार्ग शोधून काढते आणि त्यावर ठाम पाय रोवून उभी राहते.
पती वा मुलेबाळे यात तिला नंतर स्वारस्य उरत नाही सर्व नातीच निरर्थक व भुसभुशीत वाटू लागतात. त्यापेक्षा मैत्रीचे नाते हेच तिला अधिक विशुद्ध व आश्वासक असल्याचे जाणवते.
सुधा मूर्ती यांनी अनुपमाला एका विशिष्ट चौकटीत आधी जखडून नंतर मुंबईसारख्या महानगरीतच खऱ्या मुक्ततेचे वातावरण मिळवून देऊन स्वत:चा आत्मसन्मान प्रस्थापित करण्यास अवसर दिला आहे.
लग्न, नवरा, संतती या सर्वांना धुडकावून लावून, आपला स्वतंत्र पण एकाकी मार्ग अनुपमा चोखाळू पाहते.
‘कोड’ हे दुराव्याचे एक निमित्त होते. कोडा ऐवजी अन्य काहीही कारण येऊ शकते; आणि त्यामुळे पतिपत्नीमध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो. अशा वेळी स्त्रीने आपल्या आत्मप्रतिष्ठेचा मार्ग चोखाळण्याची हिंमत दाखवायला हवी, असा संदेश ही कादंबरी देऊ पाहते. कौटुंबिक सुरक्षिततेचा बाऊ न करता किंवा शारीरिक संबंधांची अपेक्षा न धरता आपल्या आवडीच्या क्षेत्रात स्वत:ला झोकून देऊ पाहणाऱ्या आधुनिक स्वयंसिद्ध महिलांची प्रतिनिधी म्हणून अनुपमा ही नायिका वाचकांना अंतर्मुख करीत राहील.
- DAINIK SAKAL 17-11-2002
समर्थ जीवनाची कहाणी...
कन्नड साहित्यातील श्रेष्ठ लेखिका सुधा मूर्ती यांच्या ‘महाश्वेता’ कादंबरीचा हा अनुवाद उमा कुलकर्णी यांनी केला आहे. एका पूर्णपणे वेगळ्या विषयावरील ही कादंबरी अनेक भाषांमध्ये अनुवादित झाली आहे. कादंबरीची नायिका अनुपमा ही नावाप्रमाणेच सुंदर, बुद्धिमान व अभिनयकुशल तरुणी आहे. एका प्राथमिक शिक्षकाची ती मुलगी. घरचे वातावरण काहीसे सनातनी. सावत्र आई आणि दोन बहिणी सुमार रूपागुणांच्या अनुपमाला स्कॉलरशिपमुळे होस्टेलवर राहून शिक्षण घेणे शक्य होते. ‘महाश्वेता’ नाटकातील तिच्या भूमिकेमुळे तिची व डॉ. आनंदची ओळख होते आणि दोघेही परस्परांकडे आकर्षित होतात.
डॉ. आनंद हा देखणा, घरंदाज, लक्ष्मीपुत्र, मुलाचे मन दुखवायचे नाही म्हणून त्याची विधवा भाई राधाक्का नाईलाजाने त्यांच्या लग्नाला संमती देते. गरीबाघरची मुलगी आपल्या आज्ञेत राहील, अशी आशा तिला वाटत असते. हा विवाह म्हणजे अनुपमाच्या दृष्टीने सुंदर स्वप्नासारखाच असतो. लग्नानंतर तीनच महिन्यांनी आनंद उच्च शिक्षणासाठी परदेशी जातो आणि अनुपमाला एकटेपण खायला उठते. पासपोर्ट, व्हिसा मिळाल्यानंतर तीही आनंदकडे जाणार असते. तोपर्यंत देवधर्म, व्रतवैकल्ये, सणसमारंभ यात मन गुंतविण्याचा ती प्रयत्न करते. लक्ष्मीपूजेच्या वेळी धूपदानातील निखारा पावलावर पडल्याचे निमित्त होऊन पायावर कोडाचा डाग उमटल्याचे तिच्या लक्षात येते आणि तिचे विश्वच बदलून जाते. मैत्रिणीकडे जाण्याचे निमित्त सांगून ती सगळ्यांच्या नकळत त्वचातज्ज्ञ डॉक्टरांकडे जाऊन येते पण एकदा राधाक्का तिला दवाखान्यातून येताना बघतात. तिच्या आयुष्यातील वादळाला प्रारंभ होतो! लग्नाआधीच कोड फुटलेले असेल ते लपवून तू माझ्या भोळ्या मुलाला नादी लावलेस, असा आरोप त्या करतात. तिच्या वडिलांना बोलावणे पाठवतात. नकोशी वस्तू कचराकुंडीत फेकावी, तसे तिला माहेरी पाठविले जाते.
सावत्र आई घालून पाडून बोलते. खेड्यातील माणसे जगणे नकोसे करतात, धाकट्या बहिणीचे ठरलेले लग्नही मोडते. अनुपमाने खरी हकीकत सांगणारे पत्र आनंदला पाठवलेले असते पण तो उत्तर पाठवायचीही तसदी घेत नाही. त्याचे आतापर्यंतचे जीवन कोणीही हेवा करावा असेच असते. यश आणि लक्ष्मीची कृपा असणारा सौंदर्योपासक आनंद - कोडाने भरलेल्या अनुपमाची कल्पनाच करू शकत नाही. पुढच्या पिढीत हा रोग आला तर ही शंकाही मनात असतेच. भारतात परतल्यावर काय करायचे ते पाहू, असा विचार करून तो स्वत:ला कामात गुरफटून घेतो. भारतात परतणे पुढे ढकलतो. प्रेमविवाह केलेल्या पत्नीवर उपचार करायचे सोडून भेकडासारखा तोंड लपवून बसतो. बहिणीच्या लग्नासाठी भारतात येऊनही तो अनुपमाला भेटत नाही.
अनुपमाच्या मनात आत्महत्येचे विचार येऊ लागतात पण परिस्थितीचे आव्हान स्वीकारून ती जीवनाला सामोरी जाते. मुंबईत मैत्रिणीकडे राहून आधी क्लार्कची व नंतर संस्कृतच्या प्राध्यापिकेची नोकरी करते. रस्ता ओलांडताना झालेल्या अपघातात तिची व डॉ. वसंत यांची ओळख होते. ओळखीचे रूपांतर मैत्रीत होते. तिला कोड आहे, हे माहीत असूनही तिचे रूप, गुण, स्वभाव लक्षात घेऊन तो तिच्याशी विवाह करण्याची इच्छा व्यक्त करतो पण ती नकार देते. तिच्या मनाची घुसमट फार चांगली रेखाटली आहे. इकडे भारतात परतलेल्या आनंदला आपल्या वागणुकीचा पश्चाताप होतो. अनुपमाऐवजी आपल्याला कोड फुटले असते तर तिने आपला त्याग केला असता का? या विचाराने तो व्याकुळ होतो. ती परित्यक्तेचे जीवन कसे जगत असेल, याची चिंता करतो. तिला परत घरी आणायचे ठरवून, तिचा शोध घेत मुंबईत पोहोचतो. अनुपमा त्याची निर्भत्सना करते आणि त्याच्याबरोबर परत जाण्याचे नाकारते. तिला नवरा, प्रेम संसार सारे निरर्थक वाटत असते. तिच्या जीवनाचे ध्येय तिला समजले असते. कोणाच्याही आधाराची गरज तिला वाटत नाही. आधुनिक विचारांची सुसंस्कृत तडफदार नायिकाच साकार करण्यात लेखिका यशस्वी झाली आहे. कर्नाटकी लोकांचे संगीत व नाट्यप्रेम, यक्षगान परंपरा, संस्कृत साहित्यातील संदर्भ यामुळे कादंबरीचे कलात्मक मूल्य वाढले आहे. कादंबरी धैर्याने समर्थ जीवन जगू पाहणाऱ्या कोडग्रस्त स्त्रियांना अर्पण केली आहे. चंद्रमोहन कुलकर्णी यांचे आकर्षक मुखपृष्ठ कादंबरीची रंगत वाढवते.
- DAINIK SAMANA 20-10-2002
महाश्वेता ही सुमती क्षेत्रमाडे यांची कादंबरी आठवते? त्याच कादंबरीची आठवण व्हावी अशी कादंबरी सुधा मूर्ती यांनी कन्नड भाषेत लिहिली असून तिचा मराठी अनुवाद उमा कुलकर्णी यांनी केला आहे. लग्नानंतर अंगावर कोडाचा डाग उमटल्यामुळे एका तरुणीच्या आयुष्याची होणारी फरफट हा या कादंबरीचा विषय आहे. अनुपमा ही कलासक्त तरुणी डॉ. आनंदच्या प्रेमात पडते. दोघांचे लग्न होते. तो दोन वर्षांसाठी परदेशात जातो. इथे अनुपमाच्या अंगावर कोडाचा डाग पडतो. अगदी योगायोगाने तो सासू वगैरेंना दिसतो. कोड आणि कुष्ठरोग यातील फरक आजही लोकांना माहीत नाही. अनुपमाच्या बाबतही हेच घडते. कोड फुटल्याचे कळताच तिला घरातून अतिशय वाईट पद्धतीने हाकलून दिले जाते. पुढे ती मुंबईत येऊन अनेक संकटांना तोंड देत स्वत:च्या पायावर उभी राहते. शेवटी वसंत नावाच्या ध्येयवादी डॉक्टर तिच्याशी लग्न करण्याची इच्छा करतो. आनंदलाही आपली चूक कळते. तोही तिला परत नेण्यासाठी येतो. पण ती कोणाचबरोबर जात नाही. स्वत:ची प्राध्यापकी करीत स्वतंत्रपणे जगण्याचा निर्णय घेते. पारंपरिक वातावरणातून आलेल्या आणि कोडामुळे एका अर्थाने बहिष्कृत ठरलेल्या तरुणीला लेखिकेने खंबीर बनवले आहे. त्यामुळे रडत न बसता किंवा शेवटीही भावनेच्या आहारी न जाता निर्णय घेते. लेखिकेच्या प्रगल्भ विचारांचे दर्शनही कादंबरीत घडते. अनेक भाषात अनुवादित झालेली ही कादंबरी आता मराठीतही आली असून वाचकांना ती आवडेल अशी आहे.
- DAINIK LOKMAT 20-10-2002
विषय एकच, प्रकृती भिन्न...
या अनुवादित कादंबरीचे शीर्षक व मध्यंतरी दूरदर्शन मालिकेवर गाजलेल्या डॉ. सुमती क्षेत्रमाडे यांच्या मराठी कादंबरीचे शीर्षक एकच आहे- ‘महाश्वेता’. दोघींचा विषय एकच आहे, ‘कोड उठलेली स्त्री’. त्याही पुढे जाऊन बरीच साम्य स्थळे या दोन लेखनात सापडतात. मात्र, सुधा मूर्तींची नायिका ही फार काळ परित्यक्ता जिण्याखाली कोलमडत नाही. स्वत:च्या शिक्षणाचा आधार घेऊन ती आयुष्यात पुन्हा उभी राहते. स्वत:च्या पायावर व समर्थपणे स्वत:चे मित्र-मैत्रिणींचे वर्तुळ निर्माण करते. याउलट क्षेत्रमाडे यांची नायिका हृषीकेशसारख्या धर्मस्थळी जाते, तिथे प्रेमात पडते; पण ज्याने पूर्वी सर्वार्थाने दगा दिला, असा नवरा असहाय अवस्थेत सामोरा आल्यावर स्त्रीसुलभ त्यागाने नवं आयुष्य नाकारते. सुधा मूर्तींची नायिका मात्र स्वत:ची चूक समजल्यामुळे जरी नवरा दाराशी आला असला, तरी स्वत: प्राप्त केलेले आत्मबळ गमावत नाही. पण मराठी कादंबरी माहीत असेल, तर ही कादंबरी वाचताना मनाचा अडथळा येतो.
- DAINIK LOKSATTA 13-07-2003
दर्दभरी दास्तां...
अन्य भाषिक साहित्यकृतींच्या अनुवादामुळे नव्या लेखकांचा परिचय होतो. त्यांच्या साहित्याचे स्वरूप, जाणिवा, त्यांचे सामाजिक प्रश्न, दृष्टिकोन यांच मागोवा घेताघेता साहित्याचा तुलनात्मक आढावा घ्यायलाही दिशा मिळते. सुधा मूर्ती या कन्नड लेखिकेच्या ‘महाश्वेता’ कादंबरीचा मराठी अनुवाद उमा कुलकर्णी यांनी केला आहे.
कुठल्याही समाजात स्त्रीला सासरी अनंत प्रकारच्या तडजोडी करत स्वत:चं अस्तित्व सिद्ध करावं लागतं. आजही स्त्रियांचे तिच्या सासरी गेल्यानंतरचे प्रश्न संपलेले नाहीत, ते बदलले इतकेच. ‘महाश्वेता’ची नायिका अनुपमा सुंदर आहे, अभिजात अभिनयकला तिच्यात आहे, आर्थिक परिस्थिती बेताची असली तरी संस्काराचे देणे मोठे आहे. लग्नानंतर मात्र अनुपमाचं फक्त ‘सौंदर्य’च तेवढं विचारात घेतलं जातं- तिला अभिनय दूरच ठेवावा लागतो. दुर्दैवानं तिच्यात अचानक एक व्यंग निर्माण होतं आणि ती विद्रुप होऊन जाते. तिचा सौंदर्य हाच गुण मानला गेलेल्या त्या घरात या व्यंगामुळे तिची ती ओळखच मिटवून टाकली जाते. ही मिटवून टाकलेली ओळख अनुपमा ज्या ताकदीने आयुष्याचा स्वीकार करत मिळवत जाते, त्याची ही कथा आहे.
आनंद आणि अनुपमा एकमेकांकडे आकर्षित होतात. आनंदच्या आईचा-राधाक्कांचा या लग्नाला असलेला विरोध फार न ताणता हे लग्न होते. तीनएक महिन्यांनतर पुढील शिक्षणासाठी आनंद इंग्लंडला रवाना होतो. तो गेल्यावर सर्वस्वी एकट्या अनुपमाला घरी मिळणारी वागणूक अर्थातच अपमानाची असते. यातच पायावर निखारा पडल्याचे निमित्त होते आणि अनुपमाच्या पायावर पांढरा डाग उमटतो. तो वाढतच जातो नि कोड फुटल्याचे निदान डॉक्टर करतात. अनुपमाला अस्पृश्य, तुच्छ लेखले जाऊ लागते. या सगळ्यात तिला आशा आहे आनंदकडून; पण तिच्या पत्राला आनंदकडून जराही प्रतिसाद मिळत नाही. अनुपमा माहेरी परतते. या व्यंगामुळे तिच्या बहिणीचे ठरलेले लग्नही मोडते. वडील-बहीणही अंतरतात. सगळीकडून अपमानित झालेली अनुपमा मुंबईत येते. मैत्रिणीकडे राहून नोकरी करू लागते. हळूहळू ही मुंबईच तिला स्वत:ची ताकद, आत्मविश्वास जागवून देत राहते. पुढे तिला डॉ. वसंत भेटतो, जो तिच्या व्यंगासकट तिला स्वीकारू पाहतो, पण आता कोडाने ‘महाश्वेता’ झालेल्या अनुपमाला ओढ आहे ती फक्त तिच्या कलेची. घर-संसार यापासून मनाने दूर झालेली अनुपमा वसंतला नकार देते, परंतु मित्रत्वाचे सुंदर नाते मनात जपूनच.
अनुपमा उद्ध्वस्तेतून घडत जाते. ज्या समाजाने तिचे आयुष्य विस्कटून टाकले आहे, त्याच समाजात या व्यंगासकट तिला स्वीकारण्याची दृष्टीही अनुपमा मिळवते. कादंबरीतील वातावरण, व्यक्तिरेखा यांचा विचार करता आजच्या काळाशी या कादंबरीचे नाते पूर्णपणे जुळते, असे नाही. कोडाकडे बघण्याची, तो एक त्वचारोग आहे, हे समजून घेण्याइतका आज दृष्टिकोण बदलला आहे. या कादंबरीला लाभलेली पार्श्वभूमी विचारात घेतली, की सबंध कादंबरी त्या स्तरावरून समजून घेणे सोपे जाते. एकूणच जुन्या वळणाने कादंबरीची मांडणी केलेली आहे, हे जाणवत राहते. त्यामुळेच योगायोगाचे काही वेळा असंभाव्य वाटतील, असे बरचे प्रसंग कादंबरीत येतात. उदाहरणार्थ आनंदची बहीण गिरीजा तिची पर्स विसरते, जी पर्स सहज म्हणून अनुपमा उघडून बघते, त्यात तिला गर्भरोधक गोळ्या सापडतात. व्यक्तिचित्रणावर देखील लेखिकेने फारसा भर दिलेला दिसत नाही. एक तर कादंबरीतील काही पात्रं पूर्णत: गडद काळी दाखवलेली आहेत. काही पूर्णत: चांगली-वाईट माणसं कायमच वाईट वागताना दिसतात. बहुतेक व्यक्तिरेखांच्या स्वभावछटा, मनोवस्था अधोरेखित होतात, त्या वरवरच्या. त्यात खोली जाणवत नाही. काही व्यक्तिरेखा एखाद्या प्रसंगापुरत्याच येतात, पुढे लुप्तच होऊन जातात. खुद्द आनंदचे आयुष्य लेखिका अधोरेखित करत नाही. राधाक्का, गिरीजा कायम वाईटच असतात. उलट वसंत, सत्या, अनुपमाची मैत्रीण सुमन, डॉली ही माणसं पहिल्यापासूनच अनुपमाला सर्वार्थाने समजूनच घेतात. मानवी स्वभावाचे वास्तववादी दर्शन कादंबरीत होत नाही.
कादंबरीतील अनेक प्रसंगात नाट्यात्मकता आहे, परंतु हे प्रसंग बऱ्याच अंशी एकांगीपणे आणि ढोबळपणे चित्रित होतात, त्यामुळे त्यांचा परिणाम वाचकांच्या मनावर उमटत नाही. राधाक्कांचा या लग्नाला असलेला विरोध आकार न घेता एक-दोन वाक्यांच्या निवेदनातून व्यक्त होतो वा सुमनचा नवरा हरी, एका क्षणी अनुपमावर शारीरिक अत्याचार करू पाहतो हा प्रसंग... असे महत्त्वाचे प्रसंग कादंबरीच्या आशयाला मिती देणारे असूनही ते ठसठशीतपणे साकारले जात नाहीत.
या मर्यादा जाणूनही कादंबरी मनात उत्सुकता निर्माण करत राहते, कारण त्यात वाचनीयता आहे. वाचकांना ती गुंतवून ठेवते.
अनुपमा सोशिक, सात्विक असूनही ती आधुनिक, प्रगल्भ विचार करणारी आहे, हा तिच्या व्यक्तिमत्त्वातला धागा फार महत्त्वाचा आहे. अनुपमाला कोणीतरी या कोडापासून मुक्ती मिळवण्यासाठी देवीचे दर्शन घ्यायचा उपाय सुचवतो. देवळातलं वातावरण बघितल्यावर तिच्या मनात येतं, देवी बरची कामं करते तर... कोड कमी करणं, बदली घडवणं, डोंगरावर एकटी उभी असलेली देवी सगळ्यांचं समाधान कशी करते?... अनुपमाचा शेवटचा निर्णय देखील तिच्या प्रगल्भ विचारांचेच प्रतिनिधित्व करतो. इतक्या वर्षांनी परतलेल्या आनंदालाही विचारते, ‘तुम्हाला कोड झालं असतं तर? कोड फुटलं तरी मीही एक माणूस आहे.’ तिचे हे विचारणे तिच्या आत्मनिर्भरतेचे प्रतीक ठरते.
कादंबरीची भाषा भारदस्त आहे. काही ठिकाणी ती अधिक अलंकारिक होते, उपमांचा अनावश्यक वापरही जाणवतो. परंतु ती कादंबरीच्या एकूण मांडणीला शोभते, हेही खरे.
कादंबरीचा शेवट मात्र संपूर्ण कादंबरीला एक उंची देऊन जातो. ‘महाश्वेता’ या बाणभट्टाच्या कादंबरीची नायिका महाश्वेता हिच्याशी नातं जोडून ही कादंबरील लेखिकेने संपवली आहे. ही महाश्वेता पुंडरिकाच्या-एका मुनीपुत्राच्या प्रेमात पडते, ज्याचा पुढे मृत्यू होतो. पांढरी वस्त्रं परिधान करून महाश्वेता त्याला मिळवण्यासाठी कठोर तपश्चर्या करते, तिचा निर्धार ढळत नाही. अनुपमा आता ‘महाश्वेता’ झाली आहे ती कोडाने. पण तीही निर्धारानेच उभी आहे.
- DAINIK LOKSATTA 13-07-2003
दर्दभरी दास्तां...
अन्य भाषिक साहित्यकृतींच्या अनुवादामुळे नव्या लेखकांचा परिचय होतो. त्यांच्या साहित्याचे स्वरूप, जाणिवा, त्यांचे सामाजिक प्रश्न, दृष्टिकोन यांच मागोवा घेताघेता साहित्याचा तुलनात्मक आढावा घ्यायलाही दिशा मिळते. सुधा मूर्ती या कन्नड लेखिकेच्या ‘महाश्वेता’ कादंबरीचा मराठी अनुवाद उमा कुलकर्णी यांनी केला आहे.
कुठल्याही समाजात स्त्रीला सासरी अनंत प्रकारच्या तडजोडी करत स्वत:चं अस्तित्व सिद्ध करावं लागतं. आजही स्त्रियांचे तिच्या सासरी गेल्यानंतरचे प्रश्न संपलेले नाहीत, ते बदलले इतकेच. ‘महाश्वेता’ची नायिका अनुपमा सुंदर आहे, अभिजात अभिनयकला तिच्यात आहे, आर्थिक परिस्थिती बेताची असली तरी संस्काराचे देणे मोठे आहे. लग्नानंतर मात्र अनुपमाचं फक्त ‘सौंदर्य’च तेवढं विचारात घेतलं जातं- तिला अभिनय दूरच ठेवावा लागतो. दुर्दैवानं तिच्यात अचानक एक व्यंग निर्माण होतं आणि ती विद्रुप होऊन जाते. तिचा सौंदर्य हाच गुण मानला गेलेल्या त्या घरात या व्यंगामुळे तिची ती ओळखच मिटवून टाकली जाते. ही मिटवून टाकलेली ओळख अनुपमा ज्या ताकदीने आयुष्याचा स्वीकार करत मिळवत जाते, त्याची ही कथा आहे.
आनंद आणि अनुपमा एकमेकांकडे आकर्षित होतात. आनंदच्या आईचा-राधाक्कांचा या लग्नाला असलेला विरोध फार न ताणता हे लग्न होते. तीनएक महिन्यांनतर पुढील शिक्षणासाठी आनंद इंग्लंडला रवाना होतो. तो गेल्यावर सर्वस्वी एकट्या अनुपमाला घरी मिळणारी वागणूक अर्थातच अपमानाची असते. यातच पायावर निखारा पडल्याचे निमित्त होते आणि अनुपमाच्या पायावर पांढरा डाग उमटतो. तो वाढतच जातो नि कोड फुटल्याचे निदान डॉक्टर करतात. अनुपमाला अस्पृश्य, तुच्छ लेखले जाऊ लागते. या सगळ्यात तिला आशा आहे आनंदकडून; पण तिच्या पत्राला आनंदकडून जराही प्रतिसाद मिळत नाही. अनुपमा माहेरी परतते. या व्यंगामुळे तिच्या बहिणीचे ठरलेले लग्नही मोडते. वडील-बहीणही अंतरतात. सगळीकडून अपमानित झालेली अनुपमा मुंबईत येते. मैत्रिणीकडे राहून नोकरी करू लागते. हळूहळू ही मुंबईच तिला स्वत:ची ताकद, आत्मविश्वास जागवून देत राहते. पुढे तिला डॉ. वसंत भेटतो, जो तिच्या व्यंगासकट तिला स्वीकारू पाहतो, पण आता कोडाने ‘महाश्वेता’ झालेल्या अनुपमाला ओढ आहे ती फक्त तिच्या कलेची. घर-संसार यापासून मनाने दूर झालेली अनुपमा वसंतला नकार देते, परंतु मित्रत्वाचे सुंदर नाते मनात जपूनच.
अनुपमा उद्ध्वस्तेतून घडत जाते. ज्या समाजाने तिचे आयुष्य विस्कटून टाकले आहे, त्याच समाजात या व्यंगासकट तिला स्वीकारण्याची दृष्टीही अनुपमा मिळवते. कादंबरीतील वातावरण, व्यक्तिरेखा यांचा विचार करता आजच्या काळाशी या कादंबरीचे नाते पूर्णपणे जुळते, असे नाही. कोडाकडे बघण्याची, तो एक त्वचारोग आहे, हे समजून घेण्याइतका आज दृष्टिकोण बदलला आहे. या कादंबरीला लाभलेली पार्श्वभूमी विचारात घेतली, की सबंध कादंबरी त्या स्तरावरून समजून घेणे सोपे जाते. एकूणच जुन्या वळणाने कादंबरीची मांडणी केलेली आहे, हे जाणवत राहते. त्यामुळेच योगायोगाचे काही वेळा असंभाव्य वाटतील, असे बरचे प्रसंग कादंबरीत येतात. उदाहरणार्थ आनंदची बहीण गिरीजा तिची पर्स विसरते, जी पर्स सहज म्हणून अनुपमा उघडून बघते, त्यात तिला गर्भरोधक गोळ्या सापडतात. व्यक्तिचित्रणावर देखील लेखिकेने फारसा भर दिलेला दिसत नाही. एक तर कादंबरीतील काही पात्रं पूर्णत: गडद काळी दाखवलेली आहेत. काही पूर्णत: चांगली-वाईट माणसं कायमच वाईट वागताना दिसतात. बहुतेक व्यक्तिरेखांच्या स्वभावछटा, मनोवस्था अधोरेखित होतात, त्या वरवरच्या. त्यात खोली जाणवत नाही. काही व्यक्तिरेखा एखाद्या प्रसंगापुरत्याच येतात, पुढे लुप्तच होऊन जातात. खुद्द आनंदचे आयुष्य लेखिका अधोरेखित करत नाही. राधाक्का, गिरीजा कायम वाईटच असतात. उलट वसंत, सत्या, अनुपमाची मैत्रीण सुमन, डॉली ही माणसं पहिल्यापासूनच अनुपमाला सर्वार्थाने समजूनच घेतात. मानवी स्वभावाचे वास्तववादी दर्शन कादंबरीत होत नाही.
कादंबरीतील अनेक प्रसंगात नाट्यात्मकता आहे, परंतु हे प्रसंग बऱ्याच अंशी एकांगीपणे आणि ढोबळपणे चित्रित होतात, त्यामुळे त्यांचा परिणाम वाचकांच्या मनावर उमटत नाही. राधाक्कांचा या लग्नाला असलेला विरोध आकार न घेता एक-दोन वाक्यांच्या निवेदनातून व्यक्त होतो वा सुमनचा नवरा हरी, एका क्षणी अनुपमावर शारीरिक अत्याचार करू पाहतो हा प्रसंग... असे महत्त्वाचे प्रसंग कादंबरीच्या आशयाला मिती देणारे असूनही ते ठसठशीतपणे साकारले जात नाहीत.
या मर्यादा जाणूनही कादंबरी मनात उत्सुकता निर्माण करत राहते, कारण त्यात वाचनीयता आहे. वाचकांना ती गुंतवून ठेवते.
अनुपमा सोशिक, सात्विक असूनही ती आधुनिक, प्रगल्भ विचार करणारी आहे, हा तिच्या व्यक्तिमत्त्वातला धागा फार महत्त्वाचा आहे. अनुपमाला कोणीतरी या कोडापासून मुक्ती मिळवण्यासाठी देवीचे दर्शन घ्यायचा उपाय सुचवतो. देवळातलं वातावरण बघितल्यावर तिच्या मनात येतं, देवी बरची कामं करते तर... कोड कमी करणं, बदली घडवणं, डोंगरावर एकटी उभी असलेली देवी सगळ्यांचं समाधान कशी करते?... अनुपमाचा शेवटचा निर्णय देखील तिच्या प्रगल्भ विचारांचेच प्रतिनिधित्व करतो. इतक्या वर्षांनी परतलेल्या आनंदालाही विचारते, ‘तुम्हाला कोड झालं असतं तर? कोड फुटलं तरी मीही एक माणूस आहे.’ तिचे हे विचारणे तिच्या आत्मनिर्भरतेचे प्रतीक ठरते.
कादंबरीची भाषा भारदस्त आहे. काही ठिकाणी ती अधिक अलंकारिक होते, उपमांचा अनावश्यक वापरही जाणवतो. परंतु ती कादंबरीच्या एकूण मांडणीला शोभते, हेही खरे.
कादंबरीचा शेवट मात्र संपूर्ण कादंबरीला एक उंची देऊन जातो. ‘महाश्वेता’ या बाणभट्टाच्या कादंबरीची नायिका महाश्वेता हिच्याशी नातं जोडून ही कादंबरील लेखिकेने संपवली आहे. ही महाश्वेता पुंडरिकाच्या-एका मुनीपुत्राच्या प्रेमात पडते, ज्याचा पुढे मृत्यू होतो. पांढरी वस्त्रं परिधान करून महाश्वेता त्याला मिळवण्यासाठी कठोर तपश्चर्या करते, तिचा निर्धार ढळत नाही. अनुपमा आता ‘महाश्वेता’ झाली आहे ती कोडाने. पण तीही निर्धारानेच उभी आहे.
- DAINIK DESHONNATI 03-11-2002
नायिकेभोवती फिरणारी : महाश्वेता...
महाश्वेता ही सौ. सुधा मूर्ती यांची कन्नड भाषेतील कादंबरी. अनुवादिका उमा कुलकर्णी यांनी त्याचा मराठी अनुवाद करून एका उत्तम कादंबरीची भर मराठी साहित्यात घातली आहे. सौ. मूर्ती या नावाजलेल्या प्रतिभावान कन्नड साहित्यिका आहेत. कादंबरी मूळ भाषा किंवा त्यातील आशय आणि भाव यांना धक्का न लागता जशीच्या तशी अनुवादित करणे हे काम तसे अवघडच आहे, पण हे अनुवादाचे शिवधनुष्य उमा कुलकर्णी यांनी मोठ्या ताकदीने पेललेले आहे.
कादंबरीचा विषय तसा वेगळा नाही. अनुपमा नावाची एक अनुपमेय लावण्यवती. तिच्या विवाहानंतर तिला कोड फुटतं आणि यातून तिची दर्दभरी कहाणी सुरू होते. गरीब अगतिक वडील, सावत्र आई आणि सावत्र बहिणीकडून सदैव उपेक्षित ठरते ती अनुपमा. सौंदर्याबरोबर मोहित होऊन गर्भश्रीमंत घराण्यातील डॉ. आनंद हा तिला मागणी घालतो आणि तिच्याशी विवाह करतो. काही कालाने तिच्या अंगावर कोड फुटतं तेव्हा आनंद परदेशी असतो, पण त्याच्या अपरोक्ष तिच्यावर ठपका ठेवून तिची सासू तिला वडिलांबरोबर आपलं नशीब अजमावण्याकरिता मुंबईला मैत्रिणीकडे जाते. तिथे थोड्याश प्रयत्नांनंतर तिच्या विचारांना नवी चालना मिळते. तिला एक नवी दिशा मिळते आणि तोच धागा पकडून ती आपलं एकाकी जीवन अभिनय आणि नोकरी या माध्यमातून जगणे स्वीकारते.
अनुपमा या एका पात्राभोवती संपूर्ण कादंबरी फिरती ठेवलेली आहे, सावत्र बहिणी, लाचार वडील, वडिलांचे ममतेने वागणारे मित्र त्यांच्या पत्नी, तिच्या मैत्रिणी जवळची मैत्रिण सुमन, तिचा नवरा, शिवाय अनुपमाचा नवरा, त्याची जुनाट विचाराने बुसरटलेली पण आपल्या गर्भ श्रीमंतीचा ताठा तोलणारी आई राधाक्का, रंग उधळणारी पण देखणी बहीण गिरीजा इ. व्यक्तिरेखा तेवढ्या ठळकपणे वावरत नाहीत. फक्त नायिकेला पाठिंबा म्हणा किंवा अडथळा म्हणून म्हणा तेवढ्या पुरत्या येतात आणि जातात. त्यांचे विशेष अस्तित्व कादंबरीत म्हणावे तितक्या प्रमाणात जाणवत नाही. डॉ. आनंद हा एक हुशार, तल्लख, चिकित्सक, मेहनती, प्रामाणिक, देखणा, उमदा पण आईच्या ताटाखालचे मांजर. हा नायक म्हणून तितका प्रभावशाली ठरत नाही. त्याचा उल्लेख फक्त कारणापुरताच ठेवलेला आहे. हे कळत नाही. इतका सुशिक्षित इतका अंधश्रद्ध कसा? याचे कोडे उलगडत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे डॉक्टर झाल्यानंतर पुढील शिक्षणाकरीता तो परदेशी गेलेला आहे. त्याचा विवाह त्याच्या मर्जीप्रमाणे झालेला असूनही तो केवळ पत्नीला कोड फुटलंय म्हणून आईच्या सांगण्यानुसार पत्नीचा त्याग करून रिकामा झालेला आहे. ही त्यांची व्यक्तिरेखा तितकीशी बोलकी आणि स्पष्ट झालेली नाही.
नायिका प्रधान कादंबरी राहिल्यामुळे फक्त नायिकेची व्यक्तिरेखा स्पष्ट झालेली आहे. बाकीची पात्रे येतात आणि जातात, एवढेच त्यांचे वैशिष्ट्य म्हणता येईल. आपल्या शारीरिक व्यंगावर मात करून आपले जीवन आपल्या पद्धतीने जगण्याचे शेवटी नायिका ठरवते. डॉ. वसंत यांच्यारूपाने तिच्या जीवनात आणखी एक जण प्रवेश करतो. तशा अवस्थेत तो तिला स्वीकारायचे ठरवतो, तसे तो तिला सांगतोही पण विवाह, संसार, मुले या घटनाचक्रात पुन्हा न पडता ती वेगळी वाट पत्करते. नायक नायिकेचे मनोमिलन उच्च पातळीवर झालेले नाही. कारण विवाहानंतर काही महिन्यात नायक परदेशी जातो त्यामुळे तो आपल्या पत्नीला तितकेसे समजून घेऊ शकलेला नाही, हे कच्चे दुवे कादंबरीत प्रकर्षाने जाणवतात. नायिकेचे इतरांशी असलेले कोणतेच नाते ठळकपणे उमटलेले दिसत नाही. एक केवळ नायिका सर्वांना पुरून उरलेली दिसत आहे. पात्रांचा वावर सहज आहे पण कारणापुरता. प्रत्येकाची भावरेखा पुसटशी येते आणि जाते. संवादातून कथानक पुढे सरकते पण नायिका केंद्रबिंदू धरून तिथेच थबकते. निदान पती, सासू, नणंद या पात्रांना आणखी उठाव द्यायला हवा होता. त्यामुळे नायिकेचा स्तर अधिक उंचावला असता, पण मूळात नायिका सज्जन, सोज्वळ, सालस, बहुगुणी अशी व्यक्तीरेखा पहिल्यापासूनच ठेवलेली असल्याने बाकीची पात्रे ठिगळ लावल्याप्रमाणे वावरतांना दिसतात. उमा कुलकर्णी यांनी केलेला अनुवाद मात्र चांगला झालेला आहे. दोन्हीही भाषेची उत्तम जाण असल्यामुळे पहिल्या पासून शेवटपर्यंत वाचक खिळून राहतो. माहिती असूनसुद्धा पुढे काय होणार? ही उत्कंठा अनुवादिकेने शेवटपर्यंत टिकवून ठेवलेली आहे. आपण कन्नड भाषेतील कादंबरी वाचत आहोत हे ही लक्षात येत नाही, इतका सरस मराठी अनुवाद उमा कुलकर्णीच्या लेखणीतून उतरलेला आहे.
-जगन्नाथ कुलकर्णी, कोल्हापूर
- NEWSPAPER REVIEW
सुखरूप, कलासक्त आणि संवेदनाशील मनाच्या अनुपमेची हृदयस्पर्शी कथा. देखणा, सुशिक्षित, आणि श्रीमंत पती लाभला तरी, कोडाचा स्पर्श झाल्यामुळे तिच्या जीवनात खळबळ माजते. ऐश्वर्याचा गर्व असलेली सासू, कजाग सावत्र आई, माहेरची गरीबी, चरित्रहिन नणंद यांच्याशी झगडा देणं अनुपमेला अशक्य नाही– पण ज्याच्या खांद्यावर विश्वासानं मान ठेवून साऱ्या जगातली आव्हाने पेलायची, त्या पतीकडून होणारी प्रतारणा तिला वास्तव जगाचं भान देतं.
हे भान इतकं दृढ आहे, की त्यानंतर जीवनात आलेल्या वसंतासारख्या सहृदय मित्रांच्या आधाराचीही अपेक्षा न धरता ती आपलं जीवन ताठ मानेनं जणू शकते!
अशा समर्थ (पण बंडखोर नव्हे!) अनुपमेची कथा भारतातील अनेक भाषांमध्ये चांगल्या प्रकारे स्विकारली गेली. तिला सौ. उमा वि. कुलकणी यांच्या समर्थ लेखणीनं मराठी साज चढवला आहे.