Anil Moreवि. स. खांडेकरांची अमृतवेल कादंबरी वाचून झल्यानंतर दोन फार महत्त्वाच्या गोष्टी यातून समजल्या, पहिली हि की आपण जर इतरांच दुःख जाणून घेतलं व त्यांना त्यांचे दुःख कमी करण्यासाठी मदत केली, तर नक्कीच आपल्याला आपले दुःख विसरायला किंवा कमी करायला मदत होईल.
दुसरी गोष्ट ही की एका पापातून अनेक पापे जन्माला येत असतात आणि त्याचा परिणाम आपल्या जवळच्या व प्रिय व्यक्तींवर होत असतो. म्हणून आपण जे काही कर्म करतो ते केवळ चांगले आणि चांगलेच असले पाहिजे
ज्यांनी कोणी आतापर्यंत ही कादंबरी वाचलेली नाही त्यांनी ही कादंबरी एकदा नक्की वाचावी. तुम्हाला जीवन जगण्यासाठी नवीन दृष्टिकोन मिळतील.
PSI Ghanshyam Tambeदोन दिवसापूर्वीच वि स खांडेकर यांचे अमृत्वेल हे पुस्तक वाचले यामध्ये लेखकाची कल्पना व प्रतिभा उच्च कोटीची आहे मानवी जीवनामध्ये प्रेमाचा अंतरंग टिपणारे सुरेख पुस्तक आहे
सयाजी शिंदे.. सकाळ २१-२-२०२१ वि.स. खांडेकर यांची `अमृतवेल` हि कादंबरी मी आठवी-नववीत असताना वाचली. या पुस्तकाचा माझ्या जीवनावर खोल परिणाम झाला.
Dnyaneshwar Shendageआपल्या ग्रुपवर वाचकांच्या प्रतिक्रिया वाचून वि. स. खांडेकरांचे अमृतवेल वाचायला घेतले आणि पुन्हा ययाती सारखा अनुभव आला. ते खाली ठेवावेसे वाटत नाही. एवढी सुरेख शब्दांची गुंफण आणि बांधणी. प्रेमाचे अनेक रूपे आणि त्याची अमृतवेल कशी बनते.खूपच सुदंर पद्धतीने ही कादंबरी गुंफली आहे. मराठी भाषा किती समृद्ध याची प्रचिती खांडेकरांच्या लिखाणातून नेहमीच जाणवते! अप्रतिम अमृतवेल👌
Aditi Chaudhariनाव: अमृतवेल
लेखक: वि. स. खांडेकर
शैली: कादंबरी
पुस्तक खांडेकरांचे आहे म्हंटल्यावर ते कसे असावे ह्यावर संदेह घेणे फार चुकीचे आहे. अलबत पुस्तक अप्रतिम लिहिले आहे.
पुस्तक वाचताना सर्व प्रकारच्या भवनांचे प्रदर्शन घडलेले जाणवले. आयुष्यच्या प्रीती रुपी वेलीवर अनेक फुले असतात, त्यात सुख - दुःख, माया, मैत्री अशी बरीच फुले असतात. आई ची माया, बापाची न बोलता केलेली काळजी, सहजच आयुष्यात आलेल्या मुलाला आपले सर्वस्व मानणाऱ्या आणि त्याच्या अकाळी जाण्याने खचून गेलेल्या नंदाच्या आयुष्यात असे बरेच नाते आले.. त्या मध्ये प्रामुख्याने आले ते मैत्रिणीचा नवरा ( देवदत्त ) आणि त्याच्या होणाऱ्या हाल अपेष्टा आणि मैत्रिणीचे आणि तिच्या नवऱ्याचा मोडकळीस आलेला संसार सावरण्याची मदत करत असताना तिला जे ह्या जगाचे बिभास्त आणि भीषण दर्शन घडले, देवदत्त विषयी जे निर्मळ प्रेम जाणवले, एक स्त्री आणि पुरुष मधे निर्मळ मैत्री असू शकते हे स्वीकारताना, त्याच्यातील जिवंतपणा जपताना खांडेकरांनी किती कष्ट घेतले असावे ते जाणवते..
प्रेम हे कोणामधे ही असो त्याचे स्वरूप उदात्त असावे, त्या प्रेमाला नुसतीच वासनेची झालर लागली की त्याचे दुःख हे ठरलेलेच. वासना ही तर आयुष्याचे गमक आहे पण त्यासोबत उदात्तता लाभली, आणि स्वतःच्या कोषातून निघून ह्या विश्वात एकरूप होण्याचा सामर्थ्य लाभले तरच ही प्रीती खऱ्या अर्थाने फुलते. म्हणून खांडेकरांच्या लेखनितले विचार, "सत्यवानाच्या सावित्रीने केलेली पण प्रीती आणि हॅम्लेट च्या आईने केलेली पण प्रीतीच पण दोघांच्या प्रीती मधे फरक इतका की एकाची प्रीती ही आत्मसमर्पणातून आलेली म्हणून सावित्री महान झाली, आणि हॅम्लेट ची आई ( गरट्रूड ) ची प्रीती आत्मप्रिती ठरली.. आणि ती स्वतःच्या मुलाची सुद्धा दुश्मन झाली."
पंकज दातरे*📖अमृतवेल*📖
मनाचा ठाव घेणारी हि कादंबरी पुन्हा पुन्हा वाचावी अशी आहे.
वि.स.खांडेकर हे `जीवनवादी` लेखक म्हणून ओळखले जातात.या कादंबरीतूनही त्यांनी म्हटलं आहे,"माणसाचं सर्वात जास्त प्रेम जगण्यावर असतं!"
अलकनंदा एम.ए. शिकलेली हुशार, ध्येयवादी आणि गोड तरुणी. एका सुसंस्कृत आणि प्रेमळ कुटुंबात वाढलेली.अभाळासारखी माया करणारे दादा आणि जमिनिसारखं जपणारी माई,.नंदा मावशी, नंदा मावशी" म्हणणारा लहानगा मिलिंद.मिलिंदची आई वारली तेव्हा त्याच्या बाबांनी दुसरं लग्न केलेलं. सावत्र आई मिलिंदला न सांभाळणारी.माई, दादा आणि नंदा हेच त्याच विश्व!
एके दिवशी नंदाला घरी परतायला झालेला उशीर पाहून दादांचं काळीज काळजीने वरखाली होत होतं. नंदाच्या खोलीत ते तिची पुस्तके चाळत बसले.त्यात त्यांना नंदाने लिहलेल पत्र सापडतं. ते पत्र दादांनाच लिहिलं होतं, पण आपल्या आयुष्यातील वादळ दादांसमोर व्यक्त न करता येण्यासारखं वाटल्यामुळे मनातला अतोनात कोलाहल तिने या पत्रात लिहिला होता. दादांना कधीही न देण्यासाठी! पत्र वाचून दादा गहिवरले.त्यांनी खूप विचार केला,मन सावरलं आणि नंदाची समजूत काढणारे पत्र लिहून तिच्या टेबलावर ठेवलं.नंदा उशिरा घरी येते.झोप न आल्यामुळे पुस्तकं चाळायला गेली असता तिला दादांनी लिहिलेलं पत्र सापडतं.आधी गोंधळून गेलेली नंदा नंतर शांत होते.
दुसऱ्या दिवशी नंदा आणि दादा दासबाबू यांच्याकडे नंदाच्या पी.एच.डी च्या प्रबंधाबद्दल चर्चा करावयास जातात.त्यांच्या चर्चेचं संभाषण खांडेकरांनी एखाद्या मोत्याच्या माळेप्रमाणे विणले आहे.दासबाबू नंदाला ५-६ महिने घराबाहेर फिरून जग पाहण्याचा सल्ला देतात. विलासपूरची जहागिरदारीण वसुंधरेला एका कंपॅनियन ची गरज हवी आहे, असं दासबाबू नंदाला सांगतात. वसुंधरा दुसरी कोणी नसून आपली जुनी मैत्रीण आहे, हे कळताच नंदा लगोलग विलासपुरास जावयास तयार होते.
विलासपूरला गेल्यावर वसुंधरा आणि तिचे पती देवदत्त ए�
Dushyant Surveकाही गोष्टी या अथांग क्षितिजसमांतर विश्वात अशा रीतीने घडून जातात की त्यातील आशय आणि विषयामुळे त्यांना अमरत्व प्राप्त होते. जे पुढे एक आदर्श समाज घडविण्यासाठी आणि उत्तम जीवन जगण्यासाठी पथदर्शक ठरतात. अशीच एक उत्तम कलाकृती म्हणजे वि.स. खांडेकरांची "अमृतवेल" ही कादंबरी. खांडेकरांना "ययाती"साठी साहित्यातील सर्वोच्च सन्मान "ज्ञानपीठ" मिळालेला आहे. ययाती नंतरची त्यांची सर्वोत्तम कलाकृती म्हणून "अमृतवेल" ची गणना केली जाते. अमृतवेल जरी 1967 ला प्रकाशित झालेली असली तरी त्यातील आशय आणि उत्तम भाषाशैलीने आजही कित्येक वाचकांच्या मनावर तिने अधिराज्य गाजवले आहे. निरभ्र आकाशातील असंख्य चमकणाऱ्या ताऱ्यांमध्ये तेजस्वी शुक्र तार्या प्रमाणे मराठी साहित्य विश्वात तिचे स्थान अग्रगण्य आहे. मनुष्याच्या आयुष्यात कित्येक प्रकारची दुःखे असतात मात्र त्यांना कवटाळून बसण्यापेक्षा त्यावर मात करून कसे जगावे हे अमृतवेल उत्तम रित्या शिकविते.
या विश्वात दुःख मनुष्याच्या पाचवीला पुजलेलं आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात ते निरनिराळे रुपं घेऊन प्रकट होतं. "स्वप्नभंग" हा माणसाचा कायमचा सोबती आहे पण माणसाचं मोठेपण आपल्या वाट्याला आलेले सारे दुःख सहून नवीन स्वप्न पाहण्यात आहे. दुःखाच्या पिंजऱ्यात स्वतःला बंदीवान करून न घेता त्या पिंजर्याचे दार उघडून, पंख पसरून आकाशात गगन भरारी घ्यायला लावीत जीवनाचा अर्थ सांगणारी कादंबरी म्हणजे "अमृतवेल".
ही गोष्ट आहे एका उच्चशिक्षित स्वप्नभंग झालेल्या नंदाची. विमान अपघातात तिच्या प्रियकराचा म्हणजे शेखरचा मृत्यू होतो हे दुःख असह्य झाल्याने नंदा जीव देण्यासाठी निघते. मात्र , समुद्रात उडी घेताना तिला तिच्या आई ,वडील ,मिलिंद ची आठवणीने ती थांबते आणि माघार घेते. माघारी आल्यास जे काही घडलं ते वडिलांना पत्र लिहून कळवते. नंदाच्या पत्रास तिच्या वडिलांनी दिलेली साद म्हणजे मला प्रस्तुत कादंबरीचा सार वाटतो तो म्हणजे, " भग्न स्वप्नांच्या तुकड्यांना कवटाळून बसण्यासाठी मनुष्य जन्माला आलेला नाही! मानवाचं मन केवळ भूतकाळाच्या साखळदंडांनी करकचून बांधून ठेवता येत नाही! त्याला भविष्याच्या गरुडपंखांचं वरदानही लाभलेलं आहे. एखादं स्वप्न पहाणं , ते फुलवणं,ते सत्यसृष्टीत उतरावं , म्हणून धडपडणं, त्या धडपडीतला आनंद लुटणं आणि दुर्दैवानं ते स्वप्न भंग पावलं, तरी त्याच्या तुकड्यांवरून रक्ताळलेल्या पायांनी दुसर्या स्वप्नामागे धावणं , हा मानवी मनाचा धर्म आहे. मनुष्याच्या जीवनाला अर्थ येतो तो यामुळं!"
कशाततरी मन गुंतून घ्यावे म्हणून नंदा पीएचडी करण्याचा निर्णय घेते आणि त्यासाठी दासबाबूंकडे जाते. तेथील पेंटिंग मधील वेलीचा अर्थ समजावत दास बाबूंनी "प्रीतीचा" सांगितलेला अन्वयार्थ वाचताना मन प्रसन्न होऊन जाते. नंतर नंदा तिची महाविद्यालयीन मैत्रीण वसुंधरा गुप्ते जी आता जहागीरदारीन आहे (देवदत्तची पत्नी) तिची Companion म्हणून विलासपूर ला जाते. वसू ची मुलगी मधुराला फिट येत असतात तिची काळजी घेण्यासाठी आणि एकाकी पडलेल्या वसूला सोबतीन म्हणून नंदा तिच्यासोबत Companion म्हणून जाते. व्यसनांच्या आहारी गेलेल्या देवदत्त चे अफाट वाचन आणि चौफेर व्यासंग पाहून नंदाला देवदत्त वर प्रेम होते. मात्र , प्रेम असणं आणि प्रेमात पडणं म्हणजे नेमकं काय ते तुम्हाला सदर कादंबरी वाचतांना उमगेल.
पूर्वार्धात देवदत्तच्या वडिलांनी आत्महत्या केली आणि देवदत्त ची आई म्हणजे, वासनांध ह्याम्लेट च्या आईप्रमाणे भासते. मात्र , तुम्ही जसे कादंबरीच्या शेवटाकडे जाल तस् - तसे एकेक पत्ते उलगडत जाऊन पूर्ण चित्र स्पष्ट होत जाते. ते वाचताना खूप मजा येते. या कादंबरीतील सर्व पात्र म्हणजे नंदा ,वसु ,दादा ,माई, मिलिंद ,मधुरा, देवदत्त, देवदत्त चे आई-वडील ,बापू ,सावित्री,मोहन,दासबाबू इत्यादी आजही आपल्या भोवती आहेत हे "अमृतवेल" वाचताना याचा साक्षात्कार पदोपदी होतो.
सुरुवातीला अल्लड असणारी नंदा नंतर धीर खचलेल्या देवदत्तला मार्ग दाखवते आणि त्याला आत्महत्येपासून परावृत्त करते त्यातून तिची प्रगल्भता जाणवते. वसू आणि देवदत्तचा संसार कशा रीतीने ती फुलवले हे जाणून घ्यायचे असल्यास अमृतवेल नक्की वाचा. आयुष्यात दुःख सर्वांनाच आहे , सर्वांनाच संघर्ष करावा लागतो. मात्र खरा संघर्ष ईश्वराशी नाही, समाजाशीही नाही तर तो स्वतःशीच आहे हे "अमृतवेल" उत्तमरीत्या दाखवून देते.
थोडक्यात काय तर अमृतवेल म्हणजे, सुरुवातीला अल्लड मात्र नंतर प्रगल्भ बनलेल्या नंदा ची कहाणी आहे ,दादा आणि माईचे नंदा वरील प्रेम आहे ,लहान मिलिंद आणि मधुरा चे प्रेम आहे ,देवदत्त आणि वसूचे नंदाने केलेले मनपरिवर्तन आहे , बापूचे आपल्या पत्नीवरील प्रेम आहे , देवदत्तला मोहनची साथ आहे, नंदाचे देवदत्त वरील प्रेम आहे , दास बाबूंचे आणि दादांचे नंदा साठी मार्गदर्शन आहे मुक्या प्राण्यांविषयी दया आहे, आणि भग्न स्वप्नांच्या तुकडयांना तिलांजली देत हे सुंदर आयुष्य जगण्याची एक नवी उमेद आहे.
- दुष्यंत सुर्वे
Swati Khedekar Borkarकाल अमृतवेल वाचली. या कादंबरीविषयी लिहिण्याचा माझा छोटासा प्रयत्न...
मी पहिल्यांदा हे सुचवेल की.... अमृतवेल वाचताना ती एकाच बैठकीत वाचून संपवायला पाहिजे कारण ... मी ती अर्धी वाचली आणि.. आता पुढे काय???...... अशी प्रचंड हुरहुर मनाला लागून राहिली. ...म्हणजे अगदी झोपच आली नाही कादंबरी उठून वाचावी की काय असे वाटत होते.
कारण कादंबरीचा आशयच असा आहे. कादंबरी ची खरी नायिका नंदा आहे परंतु मला तर नंदा ...वसु... देवदत्त ...नंदा चे वडील दादा ...बापू देवदत्त ची आई ...एवढेच काय तर ते मुके जनावर चंचल ...सुद्धा या कादंबरीचे नायक वाटतात.
बऱ्याच वेळा आपण समोरच्या व्यक्तीला केलेल्या चुकीबद्दल गुन्हेगार ठरवून मोकळे होतो आणि त्याला माफ करत नाही ...अगदी कायमचं ....परंतु कधीही एकांगी विचार न करता समोरच्याच्या जागी उभे राहून विचार करा असा मेसेज ही कादंबरी देते .
विशिष्ट व्यक्ति एखाद्या परिस्थितीत असं विचित्र का वागली याचं कारण तिच्या जागी येऊन विचार केला तर आपल्या ला नक्कीच त्याच्या वागण्याचा अन्वयार्थ लावता येऊ शकतो. आणि पुढची नाती आपण वाचवू शकतो.
बऱ्याच वेळा आपल्या खूप छोट्याशा दुःखाला आपण खूप मोठं करतो .. कवटाळून बसतो आणि आयुष्यातील खूप चांगल्या .. छान ...सुंदर गोष्टींना हरवून बसतो ...मुकुन बसतो. परंतु जेव्हा आपण जगातील इतरांचे दुःख पाहण्याचा... जाणण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपलं दुःख आपल्याला खूप शूद्र वाटतं आणि इतरांचा जगण्याचा संघर्ष पाहून आपल्यालाही जगणं जगावसं वाटतं.
सुरुवातीला कादंबरी मला शोकांतिका वाटली परंतु जो सकारात्मक संदेश शेवटी लेखकाने दिला आहे तो खरच अप्रतिम आहे . .....आजकाल आपण आजूबाजूला पाहतो तेव्हा आयुष्यात थोडं संकट आलं तरी माणसे ... सगळं संपलं असं समजून लगेच आत्महत्येचा पर्याय निवडतात परंतु जेव्हा अमृतवेल वाचतो तेव्हा कितीही विचित्र परिस्थिती आली तरी आपण जगण्याला सुंदर करू शकतो ते आपल्या आणि आपल्याच हातात आहे हे आपल्याला नक्की च समजतं . ही कादंबरी वाचल्यानंतर इतरांकडे पाहण्याचा मानवीय दृष्टिकोन नक्कीच दृढ होतो. आदरणीय वि .स .खांडेकर सरांना मानाचा मुजरा.
Vaishnavi Vaidya
वि.स खांडेकरांची एक अलंकारिक, तरलभाव्य कादंबरी
वाचायला हाती घेतली तेव्हा थोडं दडपण होतं कारण `ययाती` सारख्या `ज्ञानपीठ` विजेत्या साहित्य लेखकाची ही कांदबरी किती झेपेल माहित नव्हतं. पण अशा साहित्यप्रेमी लेखकांचं लिखाण केव्हातरी वाचावं ही उत्सुकता होती. माझ्या मनात सतत कुतूहल असायचे की अशी कुठली जादू या लेखकांच्या लेखणीत असते? अलंकारीक शब्दरचना ही फक्त शब्दसांप्रदाय वाढवणारी असू शकत नाही. एखाद्या प्रसंगाला किंव्हा व्यक्तिला आपण भरपूर विशेषणं दिली की ते लेखन समृद्ध होत नाही. त्या लेखनात, वाचकाच्या मनात शिरून ते भावविश्व उभं करण्याची शक्ती हवी.
या कांदबरीत ज्या मुलीची गोष्ट आहे ती वेगवेगळ्या टप्प्यातून जाते. एका स्त्रीच्या आयुष्याला किती वेगवेगळे पदर असतात! काळानुरूप आजच्या स्त्री चे रहाणीमान बदलले असले तरी समाजाचा तिच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन मात्र बदललेला नाही. एकटी बाई म्हणून जगात वावरत असताना येणार्या अडचणी मात्र बदलेल्या नाहीत. आणि त्या एकट्या बाईला जगण्यासाठी तक धरून राहताना येणार्या व्यथा ही बदलेल्या नाहीत. प्रेम ही भावना स्त्री-पुरूषाच्या नात्यात सगळ्यात आधी कायम वासनेच्या रूपातचं येते आणि दिसते हे समाज म्हणून आपलं अपयश आहे. याच पार्श्वभूमिवर कादंबरीतलं एक वाक्य खूप भावलं- `या वासनेला जेव्हा भावनेची जोड मिळते तेव्हा ही प्रीती अमृतवेल होते.`
शरिर सुखाच्या पलिकडे जेव्हा आपण मनं जुळवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा प्रेमाचा खरा अर्थ आपल्याला कळतो. पण हीच भावना एखाद्या स्त्री च्या मनात आली आणि तिच्या एकट्या पडलेल्या मनाचं नंदनवन झालं तर त्याला समाज नैतिक आणि अनैतिकतेच्या पारड्यात का मोजत असेल?
स्त्री च्या मनात प्रेमाची भावना देवघरातल्या निरांजनासारखी असते. ती उजळली की संपूर्ण घर पवित्र होतं. जी व्यक्ती आपल्याला माणूस म्हणून अधिकाधिक उच्च पातळीवर नेत असेल त्याच्या बद्दल ही पवित्र भावना निर्माण झाली तर काय बिघडलं?
ही कादंबरी असे अनेक प्रश्न मनात निर्माण करते. त्याची उत्तरं देखील त्याच्यातच आहे... आपण शोधली तर... पण ती लादलेली नाहीत. तरीही ती आपल्याला पटतात... हीच या लेखणीची कमाल आहे.
प्रेम या भावनेवर आतापर्यंत वाचलेलं उत्कृष्ट असं तरलं साहित्य!
Shimpi Sagar*"पुन्हा एकदा....."*
कितवं पारायण नक्की माहीत नाही,
पण सगळयात जवळची वाटणारी कादंबरी
Manesh Deshmukhबर्याच दिवसांनंतर आज वि. स. खांडेकरांची "अम्रुतवेल" वाचून संपवलं, खांडेकरांचं हे मी वाचलेलं फक्त दुसरंच पुस्तक आहे, खरंतर ही कादंबरी जवळजवळ निम्मी होईपर्यंत फार काही समजलीच नाही, पण अर्धवट सोडायची नव्हती म्हणुन पुर्ण केली, पुढे पुढे मात्र मानवी मनाचा, मानवी भावनांचा कल्लोळ आहे नुसता. मानवाची मानवाशी असलेली अनेक नाती अगदी कोळ्याच्या जाळ्यासारखी व्यवस्थीत गुंफली आहेत, कादंबरी समजायला थोडी अवघड आहे पण वाचकाने चिकाटी सोडली नाही तर मात्र पुर्ण पैसे वसूल करुन समाधान पावते, (पूर्वी खांडेकरांची ययाति अशीच लवकर न समजल्यामुळे मी अर्धवट सोडलेली आहे) अम्रुतवेलमधुन एक महत्वाचा संदेश मात्र पुन्हा मिळालाय. "या जन्मावरं, या जगण्यावरं शतदा प्रेम करावे......🙏🙏
Harshada Bharat Darwatkarकधीतरी वेगळं काहीतरी शोधून वाचत असताना संग्रही असलेलंच वाचायचं राहून जात...! आणि हातात असूनही अजून कस वाचलं नाही याच आश्चर्य वाटत....!
वि.स. खांडेकर यांची ही कादंबरी....
खाली दिलेल्या कादंबरी मधीलच एका उताऱ्यावरून कादंबरी ची ताकद लक्षात येईल.
"भग्न स्वप्नाच्या तुकड्यांना कवटाळून बसण्यासाठी मनुष्य जन्माला आलेला
नाही ! मानवाचे मन केवळ भूतकाळाच्या साखळदंडांनी करकचून बांधून ठेवता येत नाही!
त्याला भविष्याच्या गरुड्पंखांचं वरदानही लाभलेलं आहे.
एखाद स्वप्न पहाणं, ते फुलविणं,ते सत्यसृष्टीत उतरावं म्हणून धडपडणं,
त्या धडपडीतला आनंद लुटणं आणि दुर्दैवानं ते स्वप्न जरी भंग पावलं तरी
त्याच्या तुकड्यावरून रक्ताळलेल्या पायांनी दुसर्या स्वप्नामागनं धावणं,
हा मानवी मनाचा धर्म आहे. मनुष्याच्या जीवनाला अर्थ येतो तो यामुळं!"
नक्की वाचा....
Prem Jaiswalकाही तरी चांगलं वाचावं म्हणून खूप दिवसांपूर्वी हे पुस्तक विकत घेतलं होतं. तीन चार पान वाचल्यानंतर मोहात पडावं असं काही वाटलं नाही मग सहा महिने पुस्तक कपाटात पडून होतं. आपलंच काही तरी चुकतंय असं समजून बाजूला ठेवून दिलं. काल हे पुस्तक पुन्हा हातात घेतलं आणि पूर्वग्रह बाजूला सारून वाचायला सुरुवात केली. सुरुवातीला कच्च्या रस्त्यावर धीम्या गतीने गाडी चालावी तसा अनुभव आला. थोडं पुढे वाचत गेल्यावर मात्र गाडी गडकरींच्या एक्सप्रेस वेला लागल्यासारखा अनुभव आला. ७ तासात संपूर्ण १५० पान वाचून पुस्तक हाता वेगळं केलं.
श्रीमंतांच्या घरात न बघलेल बरं, श्रीमंतांच्या घरात न बोललेलं बरं, श्रीमंतांचे उपद्व्याव न ऐकलेले बरे अशा काही घटना या पुस्तकात आहेत. मुख्यतः दुःख, प्रेम, भावना, वासना आणि तुटलेला संसार या विषया भोवती हि कादंबरी फिरते. जो पर्यंत आपण दुसऱ्याचे दुःख अनुभवत नाही तो पर्यंत आपण आपले दुःख चघळत बसतो, हा हि बोध या पुस्तकातून होतो. तसं ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त वि.स.खांडेकरांच्या कादंबरीबद्दल अभिप्राय देऊन आमच्या सारख्या पामरानी अकलेचे तारे न तोडलेले बरे. मला भाषा खूपच आवडली, काहीसा मृत्युंजय वाचल्यासारखा अनुभव होतो. सर्वांनी वाचावं अशी कादंबरी.
Prashant Avhadआयुष्यात शाश्वत जर काही असेल, तर ते आहे दुःख. तापलेल्या जमिनीला काही काळ ओलावा देणाऱ्या पावसाच्या चार थेंबांइतकंच काय ते स्थान सुखाचं असावं.
`अमृतवेल` ही वसुंधरा, देवदत्त आणि नंदा यांची कहाणी. कहाणी सुखाची आणि दुःखाची.
आई-वडिलांच्या प्रेमास मुकलेली वसुंधरा जन्मभरासाठी जोडीदाराची साथ-संगत मिळेल या आशेने देवदत्तशी लग्न करते. परंतु केवळ तिच्या सौंदर्याचं देणं असलेलं हे नातं तिच्या दुःखातच भर घालणारं ठरतं.
वसुंधरेकडे सहानुभूतीची साद घालणाऱ्या, तिच्याकडे मदतीचा हात मागू पाहणाऱ्या देवदत्तला तिच्या दुःखाची यत्किंचितही जाणीव नसते.
सुखाबरोबर दुःखातही साथ देणारी माणसंच जगण्याची उमेद कायम ठेवतात. दुर्दैवाने देवदत्त आणि वसुंधरेच्या आयुष्यात अशी माणसं नव्हती. जिथे स्वतःचं दुःख पचवणंच कठीण तिथे ते पचवून दुसऱ्याच्या दुःखात भागीदार होण्याचा मोठेपणाही त्यांच्या अंगी नव्हता.
देवदत्त आणि वसुंधरेच्या आयुष्यात जणू त्या दोघांना जोडणारा दुवा म्हणून नंदा येते.
ऐन तारुण्याच्या उंबरठ्यावर उभे राहून भावी संसाराचे स्वप्न पाहणाऱ्या नंदाचे सुख नियतीनेे, अलगद हिरावून घेतलेले असते.
परंतु देवदत्त आणि वसुंधरेशी ओळख झाल्यानंतर नंदाचा स्वतःकडे तसेच इतरांकडेही पाहण्याचा दृष्टीकोन बदलतो.स्वतःच्या दुःखाआडच लपून बसलेल्या सुखाचा तिला नव्याने शोध लागतो.
आणि, शेवटी वसुंधरा, देवदत्त आणि नंदा या तिघांना एका आशादायी वळणावर आणून `अमृतवेल` संपते.
DAINIK SAKAL (SAPTAHIK) 08-02-2020अमृतवेल-न सुटलेल्या निरगाठी...
वि.स. खांडेकरांची ‘दोन ढग’ ही रूपककथा पाठ्यपुस्तकात वाचली होती. ‘अमृतवेल’ कादंबरी पहिल्यांदा नकळत्या वयात आठवीत असताना वाचली होती. या एका कादंबरीसाठी खांडेकर तत्कालीन कथाकारांपेक्षा काकणभर अधिक आवडत राहिले आहेत. कारण इतर कथा-कादंबरीकारांच्या नायक-नायिकेच्या नात्यात पडलेली सुरगाठ शेवटच्या प्रकरणात लीलया सुटून शेवट गोड होतो. खांडेकरांच्या या कादंबरीत नायक-नायिका-इतर पात्रांच्या नात्यातली निरगाठ सुटायला कठीणच आहे. ‘ययाति’मध्ये कच एखाद्या बॉलिवूडपटातल्या सहनायकाप्रमाणे येऊन सर्व गुंते सोडवतो. पण ‘अमृतवेल’मध्ये तसे होत नाही. ती आजदेखील आजची कादंबरी आहे. त्यातील नायक, नायिका, इतर पात्रे अटळ शोकांताकडे फरफटत जातात.
नंदा प्रगल्भ आणि कणखर आहे. ती दु:खांचे आघात सहन करूनही अचल राहते. तिची समंजस प्रेमळ प्रतिमा वाचकाला जवळची हवीहवीशी वाटते. ज्याच्याशी लग्न ठरलेले आहे तो शेखर अपघातात निधन पावल्यानंतर ती दु:ख विसरण्यासाठी स्वत:ला संस्कृत-आंग्ल कलाकृतींमध्ये गुंतवण्याचा प्रयत्न करते. जिवलग मैत्रिणीने कॉलेजात असताना गायलेल्या लता मंगेशकरांच्या ‘ओ सजना, बरखा बहार आयी’ गाण्याचे सूर तिला हळवे करतात आणि दिलासादेखील देतात. दादांना नंदाच्या खोलीत हॅम्लेटची प्रत, सावित्रीचे आख्यान आणि रोजनिशीत एलिझाबेथ ब्राउनिंगची प्रेमकविता आढळते.
ही १९६७ मधली कादंबरी अतिशय धीट आहे. काळाची चौकट ओलांडून पुढे पाऊल टाकू बघते. नंदाचे प्राध्यापक दासबाबू तिला समजावतात, की सावित्री आणि हॅम्लेटची आई या दोघी खऱ्या आहेत. एका चर्चेच्या ओघात म्हणतात, ‘‘वासनेची किंमत मी कमी मानत नाही. साऱ्या संसाराचा आधार आहे ती. पण तिला जेव्हा खोल भावनेची जोड मिळते तेव्हा तिची अमृतवेल होते.’’ ‘ययाति’कार किंवा ‘सुखाचा शोध’कार खांडकर असे अनेकदा त्यांच्या पात्रांच्या तोंडून बोलतात!
नवऱ्याशी बिनसलेल्या वसुंधरेला सोबत म्हणून नंदा तिच्याकडे राहायला जाते. तिची मुलगी मधुरा आजारी आहे. पती देवदत्त मद्यपी, शिकारी आणि कविमनाचा आहे. अतिशय मनस्वी आहे. स्वत:च्या दिवंगत आईबद्दल नको ते समजल्यामुळे हॅम्लेटप्रमाणेच आई या संकल्पनेपासूनच पूर्ण दुरावला आहे. नंदा दोघांतला पूल व्हायचा प्रयत्न करताना नकळत गुरफटत जाते. गुंता अधिक वाढतो. पहिल्या भेटीत देवदत्त तिला नंदाताई संबोधतो. पण त्यांचे सूर मित्र-मैत्रिणींप्रमाणे जुळत जातात. देवदत्तला हॅम्लेटची कथा, हेमिंग्वेची मनस्वी वृत्ती आणि बेधडक आत्महत्या, विवेकानंद यांच्याविषयी अपार आकर्षण आहे पण मित्र म्हणून जवळ यायला दोघांना वाव नाही. दोघांमध्ये मैत्री व्यक्त करण्याचे अगदी मोजके क्षण येऊन जातात. दोघे जवळ येऊ लागतात. ज्या काळात मराठी साहित्यात समवयस्क तरुण-तरुणीत प्रियकर-प्रेयसी किंवा मानलेले भाऊ-बहीण असलीच नाती जास्त करून रंगवली जात, त्या काळात खांडेकरांनी ही मैत्री कुठेही अतिशयोक्ती न करता रंगवली आहे.
कादंबरीत अनेकदा दादा आणि नंदा, देवदत्त आणि नंदा एकमेकांशी समोरासमोर न बोलता पत्र रूपाने संवाद साधतात. एका प्रसंगी देवदत्तने लिहिलेले एक स्वैर चिंतन नंदा वाचते. उत्तररामचरित वाचून देवदत्त म्हणतोय, ‘सीता रावणाच्या कैदेत असताना यज्ञाच्या वेळी वशिष्ठ ऋषी सीतेची सुवर्ण मूर्ती करून घेतात. ती पाहून रामाला काय वाटलं असेल?’
एका चिंतना ‘वसू माझ्या जीवनात येण्याआधी नंदा का आली नाही?’ असे देवदत्तने लिहिलेले वाक्य नंदाच्या वाचनात येते. नंदासाठी तो मद्यपान सोडतो. पण पुन्हा सुरू करतो तेव्हा नंदाची माफी मागतो. देवदत्त आणि नंदाची मैत्री, सलगी वसुंधराला सहन होत नाही. ती नंदाची हकालपट्टी करते. रागाच्या भरात वसुंधरा देवदत्तने पाळलेल्या हरणीला विष पाजून ठार करते. तो सूड घेण्यासाठी तिच्या अंगावर धावून जातो. बाकीचे लोक तिला वाचवतात. पण नंतर ती आत्महत्येचा प्रयत्न करते. रुग्णालयात दाखल होते. भेटायला आलेल्या नंदाला हाकलून लावते.
देवदत्तचा निरोप घेताना तो तिला विचारतो, ‘तुझं माझ्यावर प्रेम आहे?’ ती होकार देताना पुढे म्हणते, ‘स्त्री-पुरुषांच्या शुद्ध मैत्रीची कल्पना ज्यांना करता येत नाही अशा समाजाच्या समाधानासाठी मी तुम्हाला वाऱ्यावर सोडून जाऊ? ते शक्य नाही’ पण पुढे नंदा लगच म्हणते, ‘मी माझ्या वाटेने पुढे जाईन. कुणाच्या प्रेमात पडले तर त्याच्याशी लग्न करीन... मुलगी झाली तर तिचं नाव मधुरा ठेवीन. एखाद्या भाऊबिजेला तुम्हाला आग्रहानं बोलावीन. आणि तुमच्यापाशी अशा ओवाळणीचा हट्ट धरीन.’
रात्री देवदत्त अज्ञात स्थळी निघून जातो. सकाळी नंदा त्याचे निरोपाचे पत्र घेऊन घरी परतायला निघते. वसुंधरा, देवदत्त, मधुरा... कोणाचेच गुंते सुटलेले नाहीत. सगळ्या निरगाठी तशाच आहेत.
खांडेकरांनी नंदाला पंख दिले आणि ऐन भरारी घेताना असे अडवले. शुद्ध प्रेमाची आणि मैत्रीची भावना बोलून दाखवतानाच ती देवदत्तला घाईघाईने भाऊबिजेचे आमंत्रण देऊन ठेवते. त्या काळाची ती गरज असू शकते. पण तरी अमृतवेल ही माझ्या अतिशय आवडत्या कादंबऱ्यांपैकी एक आहे. नंदामध्ये गौरी देशपांडे आणि आशा बगे यांच्या नायिकांच्या गडद छटा जाणवतात, म्हणून असेल कदाचित.
– विजय तरवडे
Savita Ghule`अमृतवेल`...वि स खांडेकर
20 वर्षानन्तर पुन्हा कादंबरी वाचत असताना ,नव्याने वाचत असल्यासारख वाटल जीवनात पुलाखालून बरच पाणी वाहून गेल असल्याने 20 वर्षा च्या आपल्या विचारांचा ,भावनाचा नव्याने विचार केला शिवाय वि स न ची पुस्तक वचल्याने त्यांच्या शैलीचा ही अभ्यास झाल्यासारख वाटल
शेवटी समदुःखि जीव अथवा समविचारी जीवांच्या तारा लवकर जुळतात आनि त्यातून सुरेल धुन तयार होते
पूजा गायकर खुप खुप सुदंर कादंबरी आहे , मी 3 ते 4 वेळेस हि कादंबरी वाचली आहे , खरंच अप्रतिम आहे ....!!
Vikas Dhokeया चित्रातल्या वेलीवर नाना रंगांची फुले उमलली आहेत. प्रीती ही ह्या वेली सारखीच आहे, बाळ प्रीती म्हणजे केवळ योवनाच्या च्या प्रेरणेतून उद्भवणारी वासना नव्हे! त्या वासनेची किंमत मी कमीत मानत नाही. साऱ्या संसाराचा आधार आहे ती! पण या वासनेला जेव्हा खोल भावनेची जोड मिळते, तेव्हाच प्रीती ही अमृतवेल होते. मग या वेलीवर करुणा उमलते, मैत्री फुलते. मनुष्य जेव्हा जेव्हा आपण प्रेरणेचे कवच फोडून बाहेरच्या विश्वाशी एकरूप होतो, तेव्हा - प्रीती चा खरा अर्थ त्याला जाणवतो. या बाहेरच्या विश्वात रौद्र - रम्य निसर्ग आहे, सुष्ट दुष्ट माणसा आहेत. साहित्यापासून संगीता पर्यंतच्या कला आहेत, आणि महारोग्याच्या सेवेपासून विज्ञानातल्या संशोधना पर्यंतची आत्म्याची तीर्थक्षेत्र आहेत. ` पण हीच प्रीती नुसती आत्मकेंद्रित झाली, आत्मा पूजेशिवाय तिला दुसरे काही सुचेनासं झालं, म्हणजे केवळ मनुष्य इतरांचा शत्रू होत नाही; तो स्वतःही वैरी बनतो! मग या वेलीवर विषारी फुलांचे झुबके लटकु लागतात ...`
Vijaya Hiremathमाझीही आवडती कादंबरी...
Nilima Nandurkarमस्तच कादंबरी ..खूप आवडती .
Chintamani Mogheवि.स.खांडेकरांची अमूतवेल हातात घेतली.आणि सलग वाचून काढली.कथेत पुढे काय होईल? काय होईल?असे वाटत होते.
मनुष्य जीवनभर आपल्या स्वप्नांच्या मागे असतो.स्वप्न पूर्ण व्हावे ह्यासाठी तो प्रयत्न करत असतो.जर आपली स्वप्ने पूर्ण झालीच नाहीत.तर तो पूर्णता दु:खी होतो.मग परत तो स्वप्नामागे लागतो.पून्हा एकदा स्वप्न पूर्ण करण्याच्या आशेने.
असेच आपल्या भावी नवऱ्याबद्दल पाहिलेले स्वप्न नंदाचे अर्धवट राहते.ती कोलमडते.पण कर्तव्यामुळे आत्महत्या करू शकत नाही.ह्यातून बाहेर पडावे असे तिच्या अण्णांना वाटत असते.
मग ती बाहेर पडते.तिच्या जीवन प्रवासात तिची मैत्रीण वसू;तिचा नवरा देवदत्त; तिची मुलगी मधुरा येतात.मैत्री; मैत्रीमधील विश्वास;लहान मुलांवरील प्रेम; स्त्री पुरूषामधील मैत्री;त्या मैत्रीला समाजमान्यता नसणे.देवदत्त नंदाच्या मैत्रीवर घेतलेली शंका ; इतर अनेक भावभावनांचा खेळ वि.स.खांडेकरांनी आपल्या ओघवत्या शैलीत लिहीले आहे.एक नातेसंबंधावर आधारलेली मस्त कांदबरी सर्वानी नक्की वाचावी.
Rahul Deshmukhभग्न स्वप्नांच्या तुकड्यांना कवटाळून बसण्यासाठी मनुष्य जन्माला आलेला नाही. मानवाचे मन केवळ भूतकाळाच्या साखळदंडांनी करकचून बांधून ठेवता येत नाही. त्याला भविष्याच्या गरुडपंखांचं वरदानही लाभला आहे. एखादं स्वप्न पाहणं, ते फुलवणं, ते सत्यसृष्टीत उतरावं म्हणून धडपडणं, त्या धडपडीतला आनंद लुटणं आणि दुर्दैवानं ते सत्य भंग पावलं, तरी त्याच्या तुकड्यांवरून रक्ताळलेल्या पायांनी दुसऱ्या स्वप्नामागनं धावणं, हा मानवी मनाचा धर्म आहे. मनुष्याच्या जीवनाला अर्थ येतो, तो यामुळं!
Sushil Kaleस्वप्नभंग हा माणसाचा कायमचा सोबती आहे; पण माणसाचं मोठेपण, आपल्या वाटेला आलेलं सारं दु:ख पाहून नवी स्वप्न पाहण्यात आहे... हलाहल पचवून अमृताचा शोध घेण्यात आहे.
२. कुणी देव म्हणो, कुणी दैव म्हणो, कुणी निसर्ग म्हणो, कुणी योगायोग म्हणो! पण जिला माणसाच्या सुखदु:खाशी काही कर्तव्य नाही, अशी एक अंध, अवखळ शक्ती माणसाला माणसाशी जोडत असते. कधी रक्ताच्या नात्याने, कधी भावनेच्या नात्याने, कधी गरजेच्या नात्याने! वादळी समुद्रात फुटक्या फळकुटांच्या आधाराने तरंगणारी माणसे जशी लाटांमुळे जवळ येतात. तसेच या अफाट जगात घडते.
३. जगात दोन जाती आहेत माणसांच्या. एक मनस्वी मनांची आणि दुसरी मुर्दाड मनांची. मुर्दाड माणसं अष्टौप्रहर जगण्याची केविलवाणी धडपड करत राहतात. ती कुणाच्याही लाथा खातील, सोम्यागोम्यापुढे लोटांगण घालतील. उकिरड्यावर उष्ट्या अन्नांनी पोट भरतील; पण काही करून कुडीत जीव राहील, अशी काळजी घेतील. त्यांना सर्वात मोठं भय वाटतं ते मरणाचं! मनस्वी मनं तशी नसतात. मनानं आणि अभिमानानं जगता आलं, तरच ती जगतील. ती धुंदीत जगतील, मस्तीत जगतील; पण ती दुसऱ्याला शरण जाणार नाहीत. ईश्वराशीसुद्धा तडजोड करणार नाहीत. त्यांची स्व:तशी तर सदैव झुंज चाललेली असते.
४. आपलं घरटं सोडून बाहेर गेल्याशिवाय पाखराला आकाशाचा अर्थ कळत नाही.
निलिमा नंदुरकर#अमृतवेल हे खांडेकर यांचे पुस्तक अगदी पंचविशीत मला वाचायला मिळाले. माझ्या मनावर खूप छान ठसा उमटवला होता या पुस्तकाने. मी बरेच काही या पुस्तकातून, लिहून काढले होते. आता मला परत वाचायला मिळाले हे पुस्तक पन्नाशीत, योगायोगाने वाचनालयात.
विवाहाची सुखद स्वप्ने पाहात असतानाच भावी पती आणी प्रियकर शेखर च्या अपघाती निधनाने विदीर्ण झालेली हताश आणी सैरभैर नंदा प्रथम आपल्याला भेटते.
आपल्या दुःखात असताना तिला संधी मिळते, तिच्या मैत्रिणीची सोबती म्हणुन जाण्याची, नंदाची मैत्रीण वसु.. एक अनाथ पण सुंदर गोड गळ्याची मुलगी.. जहागिरदार घराण्यात लग्न होऊन जाते.
वसुचा पती देवदत्त, मनस्वी... मद्यपी.. विवाहाच्या दिवशी मध्यरात्री, मद्यपान करून आलेला.,..तो असा का झाला हे अजिबात समजून न घेता त्याच्याशी फटकून वागणारी वसु... वयाच्या दहाव्या वर्षी स्वताच्या मुलाच्या हातात मद्याचा प्याला देऊन स्वतःत मश्गुल असणारी देवदत्त ची आई... देवदत्त चे वडील थोरले सरकार जहागीरदार घराण्यात दत्तक आलेले.. दत्तक पत्र कायद्याच्या कचाट्यात अडकल्याने, कायम आर्थिक असुरक्षिततेची मना मध्ये भीती घेऊन गुप्त धनाच्या हव्यासापायी कुटुंबाकडे घराकडे दुर्लक्ष करणारे....एकटी पडलेली देवदत्त वसू यांची भेदरलेली मुलगी मधुरा...
या सर्वामध्ये आपले दुःख बाजूला सारून इतराना सावरणारी नंदा आपल्यावर मोठा प्रभाव टाकते.
प्रेम हा सौदा नाही, ते ईश्वरी वरदानच आहे...... प्रकाशा सारख पावसासारख.. एकमेकाना समजुन घेतले तर जीवन सोपे होते, हे सांगणारी नंदा.. खूप भावते मनाला.. बाकी सर्व व्यक्ती रेखा जीवनाचे बीभत्स आणी भीषण रूप दर्शवतात. प्रकाशा सारख पावसा सारखं प्रेम करणारी नंदा देवदत्त वर प्रेम करते, पण त्याच्या प्रेमात पडत नाही, हीच तिच्या प्रेमाची खासियत. माणसाने दुबळे होऊन, मनोविकारांच्या आधीन होऊन न जगता.. एकमेकाना समजून घेऊन जगायला शिकवते, खंबीर होऊन सारासार बुद्धी वापरुन, इतरांच्या दुःखात सामील व्हायला, शिकवते #अमृत वेल. स्वताच्या दुःखात जगाच मोठ दुःख मिसळले की त्याच सुख होत.. अगदी खरंय.
Rohini Choudharyखुप अप्रतिम....कितीही वेळा वाचल्या तरी मन भरत
नाही .
Saurabh Kulkarniप्रेम या विषयावर आवडलेलं साहित्य
Manisha Mane खुप छान आहे
Dhanashree Bomble Khup divsanpurvi vachleli... Khupch Chan Ahe
Shital Anay One of my favorite...
Vandita Shiral-Kadam Mi char vela vachli tari man bharle naahi. Mast aahe
Santosh Butte छान आहे.
Ravindra Chavan नवीन लिखाण सुरुवात करू ईच्छीणारे ह्यांनी अवश्य आणि सावकाश वाचावे असे साहित्य , शब्द शृंगार ,शब्द अलंकार ,शब्द वैभव . . आपल्याला खुपच उपयुक्त होते . . निबंध ,प्रबंध साठी नक्की वाचन करण्यासारखे साहित्य
Kavita Dilip Mahale Khup sundar ,mazaya wachnala mi 18varshapuravi surwat keli mi wachlele pahil book
निशा राकेश Khandekaranchi alankarik shabddrachana asleli kadambari
Rajendra Bhosale छान. अलंकारीक भाषाशैलीमुळे पुस्तक हातातुन खाली ठेवावेसे वाटत नाही
NandkumarLove to read this book always.. ‘त्यागातच सुख असते’